HW News Marathi
महाराष्ट्र

अनंत गीते म्हणाले, पवार आमचे गुरू होऊ शकत नाही, तर तटकरे म्हणतात…!

रत्नागिरी। शिवसेना नेते अनंत गीते यांनी शरद पवार आमचे गुरू होऊच शकत नाही, असं विधान केलं आहे. गीते यांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी पलटवार केला आहे. महाविकास आघाडी झाली तेव्हा अनंत गीतेंनी पवारांच्या पायाला हात लावला होता. पवारांच्या पाया पडले होते. आणि आघाडी केल्याबद्दल आभारही मानले होते, असा गौप्यस्फोट सुनील तटकरे यांनी केला आहे. अनंत गीते यांनी थेट शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन गीते यांच्या आरोपाचा समाचार घेतला. अनंत गीते दोन वर्षे अज्ञातवासात की विजनवासात होते हे माहीत नाही. परंतु, महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधीमंडळ नेतेपदी निवड होत असताना बांद्रा परिसरातील एका हॉटेलमध्ये अनंत गीते आले होते. त्यावेळी त्यांनी आदरणीय पवारसाहेबांना अतिशय वाकून नम्रपणे पायाला हात लावत केलेल्या आघाडीबद्दल आभार मानले. या घटनेचा मी साक्षीदार आहे, असं तटकरे यांनी सांगितलं.

पवारसाहेब हे देशाचे नेते आहेत

अलीकडच्या काळात अनंत गीते यांची अवस्था राजकीयदृष्टया ‘सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही’ अशापध्दतीची झाल्यामुळेच वैफल्यग्रस्त भावनेतून त्यांनी वक्तव्य केल्याची जोरदार टीकाही त्यांनी केली. अनंत गीते बोलल्याने काही फरक पडत नाही. परंतु सूर्यावर थुंकण्याचा हा प्रकार आहे. पवारसाहेब हे देशाचे नेते आहेत. आघाडीचे जनक आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वच्छपणाने राज्याचे काम करत आहेत. कोविडसारख्या महामारीचा मुकाबला महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करतोय याची प्रशंसा होत असताना अडगळीत पडलेल्या नेत्यांना या सार्‍या कृतीचं भान राहिलेलं नाही, असाही टोला त्यांनी लगावला आहे.

गीते नेमकं काय म्हणाले?

श्रीवर्धन तालुक्यात सरपंच आणि उपसरपंच पक्ष प्रवेश सोहळा होता. यावेळी अनंत गीते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांशी जाहीर बोलताना, त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीबाबत भाष्य केलं. मी शिवसेनेचा नेता म्हणून बोलतोय. शिवसेना काय आहे हेच फक्त सांगणार आहे. राज्यात आपलं सरकार आहे. आपलं कशासाठी म्हणायचं तर मुख्यमंत्री आपले आहेत. पण बाकी काँग्रेस-राष्ट्रवादी आपले नव्हेत. आघाडीचं सरकार आहे. शिवसेनेचं नाही. सरकार आघाडी सांभाळेल. सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील. तुमची-माझी जबाबदारी गाव सांभाळायची आहे. आपलं गाव सांभाळात असताना आघाडीचा विचार करायचा नाही. आम्हाला फक्त शिवसेनेचा विचार करायचा आहे, असं त्यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Vidhansabha2019 : ३७० कलम हटवून न्याय, ३७० ध्वजांची सलामी

News Desk

#Coronavirus : आणखी काही पत्रकारांना कोरोनाची लागण

News Desk

हिंगणघाट जळीत कांडातील आरोपीने कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा

swarit