HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षण | संघर्ष न करता सरकारला सहकार्य करण्याची संभाजीराजेंची भूमिका अमान्य!

मुंबई | मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राजकारण सध्या तापलं आहे. यावरुनच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत भाष्य केले आहे. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी कोणता मार्ग हाताळायचा यावरून भाजपचे खासदार संभाजी छत्रपती आणि भाजपमध्ये मतभेद असल्याचं समोर आलं आहे.

संघर्ष न करता सरकारला सहकार्य करण्याची संभाजी छत्रपती यांची भूमिका आम्हाला अमान्य आहे, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पाटील यांच्या या भूमिकेमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात असून या मुद्दयावरून भाजपमध्ये संभाजी छत्रपती एकाकी पडल्याचं चित्रंही निर्माण झालं आहे.

आरक्षणासाठी संघर्ष करायचा नाही हे आम्हाला मान्य नाही

चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना मराठा आरक्षणाबाबतची भाजपची भूमिका नेमक्या शब्दात स्पष्ट केली. मराठा आरक्षण लगेच मिळावं, मराठा समाजाला सवलती मिळाव्यात यासाठी जो जो व्यक्ती संघर्ष करेल. त्याच्याबरोबर आम्ही आहोत. हे आम्ही दहावेळा सांगितलं आहे. संभाजीराजे हे आमचे राजे आहेत. राजेंनी आरक्षण मिळालं पाहिजे, पण संघर्ष न करता मिळालं पाहिजे, असं स्पष्ट केलं आहे.

आरक्षणासाठी संघर्ष करायचा की नाही हे कोविड संपल्यावर बघू असं त्यांनी सांगितलं आहे. हे आम्हाला मान्य नाही. संभाजीराजेंच्या मागण्यांना आमचा पाठिंबा आहे. पण त्यांची कृती सरकारला सहकार्य करण्याची असेल आणि कोविडमुळे शांत बसण्याची त्यांची भूमिका असेल तर आम्हाला ती मान्य नाही. त्यांची कृती सरकारच्या मानगुटीवर बसून आरक्षण घेण्याची असेल तर आम्ही खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत आहोत, असं पाटील यांनी स्पष्ट केलं.

कोविड आणि आरक्षणाचा काय संबंध?

कोविडचा आणि आरक्षणाचा काहीही संबंध नाही. जनजीवन व्यवस्थित सुरू आहे. भ्रष्टाचार सुरू आहे. दोन हाताने खाणं सुरू आहे. तरीही मराठा समाजाने रुग्णसंख्या शून्यावर येईपर्यंत थांबायचे का? हे आम्हाला मान्य नाही. संभाजीराजेंच्या इतर गोष्टी मान्य आहेत. पण ही भूमिका अजिबात मान्य नाही, असं ते म्हणाले आहेत.

तर पवारांच्यामागेही उभा राहीन

परवा मी पाच मागण्या केल्या होत्या. त्याच मागण्या संभाजीराजेंनी मांडल्या आहेत. जो कोणीही मराठा आरक्षणासाठी आंदोलन करेल तो याच मागण्या पुढे रेटेल, असं सांगतानाच संघर्ष करून मराठा समाजाला न्याय मिळून देण्याची भूमिका शरद पवार किंवा अजित पवारांची असेल तर त्यांच्यामागे पहिला शिपाई म्हणून मी उभा असेल असं मी आधीच सांगितलं आहे, असंही ते म्हणाले.

4 तारखेला याचिका दाखल करा

येत्या 4 जूनला मराठा आरक्षणावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. 4 तारखेला पुनर्विचार याचिका दाखल केली नाही तर कोर्टाकडे तारीख मागावी लागेल. त्यावेळी कोर्ट तारीख देईल की नाही माहीत नाही. तसेच पुनर्विचार याचिका उशिरा दाखल केल्याबद्दल कोर्ट सरकारला जाबही विचारेल. त्यामुळे येत्या 4 तारखेला याचिका दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

संभाजीराजेंच्या त्या वक्तव्यावर नो कमेंट्स

संभाजी छत्रपती यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याचे आणि खासदारकीचा राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? असा सवाल पाटील यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी बोलण्यास नकार दिला. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर बोलण्याची गरज नाही, असं पाटील म्हणाले.

…नाहीतर बाळासाहेब ठाकरे संजय राऊतांच्या थोबाडीत मारतील

खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना चंद्रकांत पाटील यांनी, “संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेसमोर शांतपणे बसावे. अन्यथा ते त्यांना थोबाडीत लावतील,” असा टोला लगावला. “जागतिक स्तरावर इंधनाची दरवाढ झाल्यामुळे देशातही दरवाढ होत आहे. काही राज्यांनी आपले कर कमी केल्याने तेथे दर कमी आहेत. महाराष्ट्रातील आघाडी सरकारने कर कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा. त्यांनी टीका करू नये,” असा पलटवार चंद्रकात पाटील यांनी यावेळी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात कोरोना बाधितांची संख्या २०४ वर, तर  मृतांचा आकडा २० वर पोहोचला 

News Desk

विलासराव नावाचं विद्यापीठ 

News Desk

राज्यातील ऊसतोड कामगारांना १०० कोटींचे पॅकेज जाहीर करण्याची सरकारकडे मागणी | सुरेश धस

swarit