HW News Marathi
देश / विदेश

“छत्रपती शिवाजी महाराज नसते तर तुम्ही दिल्लीच्या तख्तावर टेकू शकला असतात?”, मुख्यमंत्र्यांचा सवाल

मुंबई । मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पूर्वसंध्येला आयोजित परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. “मराठी ही महाराष्ट्राची भाषा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते,तर तुम्ही दिल्लीच्या तख्तावर टेकू शकत आहात, ते टेकू शकला असतात? बसू शकत आहात, ते बसू शकला असतात? एवढं जरी कळलं, तरी अभिजातच काय, सर्वोत्तम सर्वोच्च दर्जा देण्यासाठी एवढी एकच गोष्ट पुरे”, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी थेट केंद्राला सुनावले आहे. दरम्यान, या समारंभाच्या निमित्ताने आज (२६ फेब्रुवारी) मुख्यमंत्री नेमके काय म्हणाले ? जाणून घ्या त्यांच्याच शब्दांत.

पुढच्या मराठी भाषा दिनापर्यंत अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे हे ध्येय !

मुख्यमंत्री म्हणून माझा हा दुसरा गौरवदिन आहे. गेल्या वर्षी प्रत्यक्ष भेटून आणि जास्त उत्साहात हा दिवस साजरा झाला. यंदा मात्र आपल्याला कल्पना आहे, की कोरोना संकटामुळे थोडी पंचाईत झाली आहे. कारण ऑनलाइनला पर्यायी मराठी शब्द काय इथपासून सुरुवात आहे. काही जण त्याला आभास म्हणतात.

पण हा आभास नाही. मराठी भाषेविषयी वाटणारं प्रेम, तळमळ हा काही आभास नाही. आपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हा कार्यक्रम साजरा करतोय, असं म्हणूयात. पण मला नेहमी असं वाटतं, की या एका दिवशी मराठीचं प्रेम उचंबळून आलेलं असतं.

दिल्ली दरबारी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून आपण प्रयत्न करतोय. परवानगी देणारी सर्वात वरची अधिकारी व्यक्ती किंवा कमिटी असेल, तर त्यांच्याकडे हा विषय प्रलंबित आहे. आपल्याला एवढ्या विनवण्या का कराव्या लागत आहेत?

वर्षामागून वर्ष जात आहेत. अजून मान्यता मिळत नाहीये. गेल्या वर्षी मी उद्वेगाने म्हटलं, जे दिल्लीत दर्जा देणारे किंवा नाकारणारे बसले आहेत, त्यांच्या लक्षात एक गोष्ट आणून द्यायला हवी किंवा अगदी खडसावून सांगितलं पाहिजे, ही आमची मातृभाषा आहे व आम्हाला तिचा अभिमान आहेच.

पण ही महाराष्ट्राची भाषा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते,तर तुम्ही दिल्लीच्या तख्तावर टेकू शकत आहात, ते टेकू शकला असतात? बसू शकत आहात, ते बसू शकला असतात? एवढं जरी कळलं, तरी अभिजातच काय, सर्वोत्तम सर्वोच्च दर्जा देण्यासाठी एवढी एकच गोष्ट पुरे.

इंग्रजी आली पाहिजे असं सगळे म्हणाहेत. पण ते स्वीकारताना माझी मातृभाषा कमजोर पडता कामा नये. पारतंत्र्यात सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हा अग्रलेख मराठी भाषेच्या पुत्राने, मराठी भाषेतच लिहिला. त्यानंतर सरकारचं डोकं फिरलं आणि त्यांनी टिळकांना तुरुंगात टाकलं. ही ताकद मराठी भाषेत आहे.

जर्मनी,फ्रान्स,चीन अशा देशांमध्ये मातृभाषेचा अभिमान आढळतो. मातृभाषेतून काही बोलणं, विचार करणं, व्यक्त करणं त्यांना कमीपणा वाटत नाही. आपल्याला तो कमीपणा वाटतो. आपला हा न्यूनगंड जात नाही तोपर्यंत आपण कितीही आकांत केला तरी मराठी भाषेला अभिजात किंवा आणखी काय दर्जा मिळणार नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेतील फारसी शब्द कमी करून मराठी राजभाषाकोश तयार केला.आपणही मराठी भाषाकोश सोप्या भाषेत का नाही करत?पुढच्या मराठी भाषा दिनापर्यंत अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे हे ध्येय प्रत्येक मराठी सुपुत्र व कन्येने बाळगलं तर कोणाची हिंमत आहे न देण्याची.

कोणी करायचं, काय करायचं याचं उत्तर शोधण्याची गरज नाही. आपणच करायचं आहे. ‘हॅप्पी मराठी भाषा डे’ असे संदेश नाही आले म्हणजे मिळवलं. फक्त भाषा दिनानिमित्त कविता म्हणून, शुभेच्छा देऊन काहीच होणार नाही. त्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करावे लागतील.

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. कुसुमाग्रजांना वंदन करतो. स्वातंत्र्यवीरांना वंदन करतो आणि एवढंच म्हणतो, की तुम्ही जे काही आम्हाला देऊन गेला आहात, ते आम्ही वाढवू जरी शकलो नाही, तरी नक्की आणि नक्की, जपूच जपू एवढीच एक भावना व्यक्त करतो.

जय हिंद! जय महाराष्ट्र!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महात्मा गांधी आणि त्यांचे विचार अमर आहेत, त्या विचारांवर चालण्यासाठी दृढसंकल्प करुया! – अजित पवार

Aprna

“आज बॅरिकेड हटवले उद्या तीन्ही कृषी कायदे हटवले जातील”-राहूल गांधी

News Desk

अमित शहाच्या मुलाविरोधातील केस प्रशांत भूषण लढणार

News Desk