HW News Marathi
महाराष्ट्र

निर्णय प्रक्रियेत स्थान मिळायलाच हवे, आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलू !

मुंबई | राज्यातील महाविकासआघाडी सरकारमधील काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडी सरकारमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु असल्याचे चित्र आहे. महाविकासाआघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या मंत्र्यांना योग्य ते महत्त्व मिळत नसल्याने ही नाराजी असल्याचे म्हटले जाते. याच पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी आज (११जून) महाराष्ट्र काँग्रेसची तातडीची बैठक झाली. दरम्यान, या बैठीकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली.

“नक्कीच काही मुद्दे आहेत. काँग्रेसला सरकारच्या निर्णय प्रक्रियेत स्थान मिळायला पाहिजे. ही गोष्ट आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालू”, अशी प्रतिक्रिया यावेळी राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली. दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या घरी झालेल्या या बैठकीत बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, सतेज पाटील हे सरकारमधील मंत्रीही उपस्थित होते.

“आमचे काही प्रश्न आहेत. हे तीन पक्षांचे सरकार आहे. आमच्याही काही मागण्या आहेत. निर्णय प्रक्रियेत आम्हाला सहभागी करून घेणे अपेक्षित आहे. आम्ही त्याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलू”, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या तुलनेत काँग्रेसच्या नेत्यांना तसेच मंत्र्यांना आवश्यक ते महत्त्व मिळत नसल्याने महाराष्ट्र काँग्रेसमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अंतर्गत धुसफूस असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे, अधिकारी वर्गावर देखील काँग्रेसचे मंत्री नाराज असल्याचे म्हटले जात आहे. अनेकदा मंत्र्यांना न विचारता अधिकारी वर्गाकडून परस्पर निर्णय घेतले गेल्याने काँग्रेसचे मंत्री नाराज असल्याचे म्हटले जात आहे. मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि मंत्र्यांमध्ये यामुळे वाद निर्माण झाल्याची माहिती मिळते.

राहुल गांधींचे ‘ते’ सूचक वक्तव्य

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र काँग्रेसबाबत एक अत्यंत मोठे वक्तव्य केले होते. “महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेसला निर्णय घेण्याचे अधिकार नाही”,असे राहुल गांधी यावेळी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. “महाराष्ट्रामधील सरकारला काँग्रेसने समर्थन दिले आहे. मात्र, महाराष्ट्रात काँग्रेसला निर्णय घेण्याइतके अधिकार नाही”, असे राहुल गांधी म्हणाले. “महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा जास्त आहे. राज्यात तुमचे सरकार आहे. काय सांगाल ?” असा प्रश्न पत्रकाराने विचारला असता राहुल गांधींनी हे उत्तर दिले. “महाराष्ट्रातील सरकारला आम्ही समर्थन दिले आहे. पण महाराष्ट्रात काँग्रेसला मोठे निर्णय घेण्याइतके अधिकार नाहीत. एखादे सरकार चालविणे आणि सरकारला पाठिंबा देणे ह्यात मोठा फरक आहे. आमच्याकडे पंजाब, छत्तीसगढ व राजस्थानमध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे”, असे राहुल गांधी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सत्ताधारी शिवसेनेची ही धमकी योग्य नाही, आम्ही कंगनाला संरक्षण देऊ !

News Desk

इम्तियाज जलील यांनी लॉकडाऊन रद्द होताच केला जल्लोष, कोरोनाचे मोडले नियम

News Desk

मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

Aprna