HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेस आता अ‍ॅक्शन मोडमध्ये, २ दिवसांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली!

मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर रोज नवनवीन राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरू आहे. एकीकडे राज्यातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा महाविकास आघाडी सरकारसाठी डोकेदुखी ठरत असतानाच कायदा-सुव्यवस्थेबाबतही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकारिणीची दोन दिवसीय महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेना नेते संजय राठोड यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण अधिवेशनात मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण तसंच निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि त्यानंतर तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमविर सिंह यांची उचलबांगडी, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पैसे वसुलीचं टार्गेट देण्याचे झालेले आरोप, या सगळ्या घडामोडींमुळे राज्य सरकारची प्रतिमा मलीन झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी दोन दिवसाची बैठक होत असून महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश प्रभारी एच के पाटील हे आजपासून २ दिवसाच्या दौऱ्यावर आले आहेत.

काय होणार बैठकीत?

काँग्रेसच्या दोन दिवसाच्या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि मुंबई प्रदेश काँग्रेस अशा दोन पातळीवरील नेत्यांशी चर्चा होणार आहे. राज्यातील सध्याची महाविकास आघाडीमधील राजकीय परिस्थितीचा रिपोर्ट काही दिवसांपूर्वीच दिल्लीत काँग्रेस हायकमांडने मागवून घेतला होता. त्यावर आज एच के पाटील हे राज्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या मोठ्या कार्यकारणी समवेत पदाधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठक होणार होती. पण सध्याची कोरोना रुग्णसंख्या पाहता काही मोजक्याच काँग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यां समवेत पाटील चर्चा करणार आहेत. या बैठकीला महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तसंच सरचिटणीस या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत काँग्रेस राजकीय परिस्थितीचा आढावा तर घेणारच आहे, त्याच वेळी राज्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने देखील विचार मंथन करणार आहे. दुसरीकडे, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रदेश कार्यकारणीला काँग्रेस नेतृत्व राजकीय अजेंडा देण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीनही पक्ष एकत्र असले तरी मुंबई महापालिकेत काँग्रेसला स्वतःचं अस्तित्व दाखवणे गरजेचे आहे. या अनुषंगाने देखील काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रदेश पातळीवर काही महत्त्वपूर्ण कार्यक्रम दिले जातील, तसंच राज्यातील काँग्रेस मंत्र्यांच्या कामाचा आढावाही राज्य प्रभारी एच के पाटील हे घेणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कोरोना’मुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर राजकीय दृष्ट्या मोठे संकट ?

News Desk

यवतमाळमध्ये भीषण अपघात, १० जण जागीच ठार

News Desk

राणे 27 ऑगस्टला भाजपात प्रवेश करणार

News Desk