HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीस संभाजीराजेंना म्हणाले,”मराठा आरक्षणासाठी मी कोणासोबतही बसायला तयार पण…”

मुंबई | मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन सध्या राजकीय वातावरण तापले आहे. अशात खासदार संभाजीराजे महाराष्ट्रभर दौरा करत मराठा समाजाच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यात आता भाजपच्या इतर नेत्यांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मी कोणासोबतही चर्चा करण्यासाठी तयार आहे. पण समोरच्यांनी राजकारण करु नये, असे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

संभाजीराजे छत्रपती सध्या आरक्षणासाठी राज्यभरातील नेत्यांच्या भेटी घेत आहेत. त्यामध्ये काहीही गैर नाही. ते मलादेखील भेटले होते. त्यावेळी मी संभाजीराजेंना इतकंच सांगितलं की, आम्ही मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी कोणासोबतही चर्चेला बसायला तयार आहोत. केवळ समोरच्यांनी राजकारण करु नये, एवढीच आमची अपेक्षा असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीस यांनी आज (३१ मे) मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संभाजीराजेंच्या भूमिकेचे स्वागत केले. संभाजीराजे मराठा आरक्षणासाठी राज्यातील सर्व नेत्यांना एकत्र आणायचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी भाजपचा पाठिंबाच आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

ठाकरे सरकारने 15 महिने काहीच न केल्याने ओबीसी आरक्षण रद्द

ठाकरे सरकार सत्तेत आले तेव्हाच सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी समाजाच्या अतिरिक्त आरक्षणासंदर्भात काही आदेश दिले होते. त्यावेळी न्यायालयाने राज्य मागासवर्ग आयोग तयार करण्यात आदेश दिले होते. मात्र, 15 महिन्यांच्या काळात ठाकरे सरकारने काहीच हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला मुदतवाढ देण्यास नकार दिला, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते सोमवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते.

ठाकरे सरकारच न्यायालयात ओबीसी आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याची कबुली देऊन बसले. तसेच त्यांनी घटनापीठाने दिलेल्या आदेशाच्यादृष्टीनेही कोणतीही कार्यवाही केली नाही. परिणामी आमच्या काळात अध्यादेश काढून मिळवलेले ओबीसी आरक्षण न्यायालयाने रद्द केले. आता राज्य सरकारने तातडीने हालचाली केल्या तर किमान 50 टक्क्यांच्या आतमधील आरक्षण तरी वाचवता येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

काही मंत्री खोटं बोलतायत

काही मंत्री केवळ खोटं बोलत आहेत. जगात खोटे बोलण्याची स्पर्धा झाली तर पहिल्या दहामध्ये राज्यातील मंत्रीच येतील. मराठा आरक्षणावर मंत्री खोटं बोलत होते. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही खोटं बोलत आहेत. या सरकारने ओबीसी आरक्षणाबाबतचा ऑर्डिनन्स लॅप्स होऊ दिला. मराठा आरक्षणासाठी मागासवर्ग आयोग गठीत करावा लागेल, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार सांगत आहेत. मी पाच पत्रं देऊन तेच तर सांगत होतो. मी 15 महिन्यांपासून हेच करतोय… आता तरी जागे व्हा, आता तरी डाटा जमवा.. पण सरकारने अजून काहीच केलं नाही, असं त्यांनी सांगितलं आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना मराठा आरक्षणाबाबतची भाजपची भूमिका नेमक्या शब्दात स्पष्ट केली. मराठा आरक्षण लगेच मिळावं, मराठा समाजाला सवलती मिळाव्यात यासाठी जो जो व्यक्ती संघर्ष करेल. त्याच्याबरोबर आम्ही आहोत. हे आम्ही दहावेळा सांगितलं आहे. संभाजीराजे हे आमचे राजे आहेत. राजेंनी आरक्षण मिळालं पाहिजे, पण संघर्ष न करता मिळालं पाहिजे, असं स्पष्ट केलं आहे. आरक्षणासाठी संघर्ष करायचा की नाही हे कोविड संपल्यावर बघू असं त्यांनी सांगितलं आहे. हे आम्हाला मान्य नाही. संभाजीराजेंच्या मागण्यांना आमचा पाठिंबा आहे. पण त्यांची कृती सरकारला सहकार्य करण्याची असेल आणि कोविडमुळे शांत बसण्याची त्यांची भूमिका असेल तर आम्हाला ती मान्य नाही. त्यांची कृती सरकारच्या मानगुटीवर बसून आरक्षण घेण्याची असेल तर आम्ही खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत आहोत, असं पाटील यांनी स्पष्ट केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

News Desk

अजित पवारांच्या हस्ते पुणे मेट्रोला हिरवा झेंडा!

News Desk

अर्णब आमचा पोपट नाही, आम्ही पोपट वगैरे पळत नाही –  चंद्रकांत पाटील

News Desk