HW News Marathi
देश / विदेश

कोरोना व्हायरसशी लढण्यास भारत सज्ज

मुंबई | देशभरात कोरोना व्हायरसमुळे भीतीचे सावट निर्माण झाले आहे. दरम्यान, केंद्रिय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन आणि महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी देश सज्ज असल्याचा आणि आवश्यक तितके रिसोर्स उपलब्ध असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीमुळे सर्वसामान्यांनी प्रतिबंधासाठी मास्कऐवजी स्वच्छ धुतलेला रुमाल वापरावा. जगभरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण केवळ २.५ ते ३ टक्के असून या विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यशासनाने आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत. समाजमाध्यमांवर चुकीचे संदेश पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश सायबर क्राईमला दिले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत एकही संशयीत रुग्ण आढळला नाही. नागरिकांनी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. सर्वांनी एकत्रितपणे या विषाणूचा मुकाबला करुया, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानपरिषदेत केले.

आतापर्यंत मुंबईत आलेल्या ५५१ आंतरराष्ट्रीय विमानातील ६५ हजार १२१ प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग केले आहे. राज्यात बाधित देशातून ४०१ प्रवाशी आले असून आतापर्यंत १५२ प्रवाशांना विविध रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांची दोन वेळेस प्रयोगशाळा चाचणी केली. त्यापैकी १४९ लोकांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. त्यापैकी 143 जणांना घरी सोडले आहे. सध्या ६ जण दाखल असून पुणे येथे दोन जण नायडू आणि मंगेशकर रुग्णालयात निरिक्षणाखाली आहेत तर मुंबई येथे ४ जण कस्तुरबा आणि हिंदुजा रुग्णालयात दाखल आहेत.

महाराष्ट्रातील सर्व बंदरांवर येणाऱ्या जहाजांमधील प्रवाशांची देखील तपासणी केली जात आहे. आतापर्यंत ३० जहाजांमधील ६७६ प्रवाशांची तपासणी केली त्यात संशयीत रुग्ण आढळून आला नाही. केंद्र शासनाच्या सुचनेनुसार चीनसह १२ देशांमधून येणाऱ्या विमानातील प्रवाशांची तपासणी केली जात आहे. आता मात्र सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी केली जात असून प्रत्येकाला स्वघोषणापत्र देणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रवाशाने कुठल्या देशातून प्रवास केला व कुठे जाणार आहे, संपर्क क्रमांक आदी माहिती देणे गरजेचे आहे. देशात सध्या केरळ, दिल्ली आणि तेलंगणा येथे अनुक्रमे तीन व प्रत्येकी एक असे पाच रुग्ण स्थानिक रुग्णालयांनी केलेल्या चाचणीनुसार पॉझीटीव्ह आढळून आले आहेत. मात्र पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडून त्यांचा अहवाल येणे बाकी आहे.

कोरोनाची जणांना बाधा आणि किती जणांचा मृत्यू?

कोरोनाची जागतिकस्तरावरील सद्यस्थिती स्पष्ट करताना आरोग्यमंत्री म्हणाले, चीनमध्ये ८० हजार जणांना कोरोनाची बाधा झाली असून २ हजार ९१५ जणांचा मृत्यू झाला आहे. जपानमध्ये २८० जणांपैकी १२ जणांचा मृत्यू झाला असून इराणमध्ये १००० जणांना बाधा होऊन ६६ जणांचा मृत्यू झाला आहे तर इटलीमध्ये २००० जण बाधित असून ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण कोरियामध्ये बाधितांची संख्या ४ हजार ३०० असून २६ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई येथे कस्तुरबा, राजावाडी, कुर्ला, वांद्रे, बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केयर येथे विलगीकरण कक्षाची सुविधा करण्यात आली आहे. त्याचबरोबर सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये किमान १० खाटांचे विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत.

कोरोनाची लक्षणे आणि कोणती काळजी घ्याल?

कोरोनाच्या सर्दी, ताप, खोकला या लक्षणांनुसार उपचार केले जात आहेत. त्याचबरोबर रोग प्रतिकार शक्ती वाढविण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले जात आहे. शिंकणे, खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या थुंकीच्या वाटे या विषाणूचा प्रसार होतो. त्यामुळे नागरिकांनी सामाजिक शिष्टाचार पाळणे आवश्यक असून खोकतांना, शिंकताना नाका तोंडावर रुमाल ठेवावा, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.

कोरोना व्हायरसशी लढण्यास भारत सज्ज

केंद्रशासनाच्यावतीने डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात येत असून ६ मार्चला त्याचे पहिले सत्र दिल्ली येथे होणार आहे. राज्यातील काही डॉक्टर त्यात सहभागी होणार असून त्यांच्या माध्यमातून राज्यातील अन्य डॉक्टरांना प्रशिक्षीत केले जाईल. राज्यात पर्सनल प्रोटेक्शन कीट, एन-९५ मास्क, ट्रीपल लेअर मास्क ही आवश्यक साधनसामुग्री मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध असून त्याची कमतरता भासणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

या विषाणूच्या प्रतिबंधासाठी नागरिकांची जाणीवजागृती करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेण्यात येत आहे. त्यामध्ये बॅनर्स, पोस्टर्स, होर्डींग, दृकश्राव्य माध्यमांवर जाहिराती, चित्रपटगृहांमधून संदेश प्रसारण आदी उपक्रम हाती घेण्यात येत आहे. सोशल मीडियातून अधिकृत संदेश पोहचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यासंदर्भात सध्या सोशल मीडियातून जो चुकीचा प्रचार केला जात आहे. तो रोखण्याकरिता सायबर क्राईमच्या अतिरिक्त महासंचालकांशी चर्चा करण्यात आली आहे. अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अरविंद केजरीवाल यांचे ट्विटरवरुन केले अभिनंदन

swarit

कोर्टाच्या निर्णयावर राष्ट्रपती ट्रम्प संतप्त 

News Desk

मुंबई उच्च न्यायालयाकडून अनिल देशमुखांना दिलासा, फेटाळली ‘ही’ याचिका

News Desk