HW News Marathi
Covid-19

मुंबईतील मृत्युदर अत्यंत चिंताजनक, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना आणखी एक पत्र

मुंबई | देशातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातच सुरुवातीपासूनच देशातील राज्यांच्या कोरोनास्थितीचा विचार करायचा झाला तर महाराष्ट्राला कोरोनाची सर्वाधिक झळ बसली आहे. याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील मृत्युदराबाबत चिंता व्यक्त करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (२० जून)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोनाची हाताबाहेर जात असलेली स्थिती, ऑक्सिजनअभावी रूग्णांचे मृत्यू आणि कोरोना मृत्यूसंख्या दाखविण्यात अद्यापही पारदर्शितेचा अभाव याबाबींकडे लक्ष वेधण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याचे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.

देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात असे म्हणतात कि, “मुंबई व महाराष्ट्रातील करोनाची स्थिती दिवसेंदिवस हलाखीची होत आहे. १९ जून रोजी महाराष्ट्रात आतापर्यंतचे सर्वाधिक ३,८२७ रुग्ण आढळून आले आहेत. याचदिवशी मुंबईतील सर्वाधिक बळींची संख्या ११४ इतकी नोंदवली गेली. १८ जूनपर्यंतच्या आकडेवारीचा विचार केला, तर राज्यातील एकूण करोना रुग्णांच्या संख्येत ५२.१८ टक्के वाटा एकट्या मुंबईचा आहे. मुंबई व एमएमआर क्षेत्राचा विचार केला, तर हा वाटा ७३.८५ टक्के इतका आहे. मुंबईचा मृत्यूदर हा ५.२७ टक्क्यांवर पोहोचला आहे.”

“जून महिन्यातील गेल्या १८ दिवसांचा विचार केला, तर राज्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांच्या संख्येत ४३.८६ टक्के रुग्ण या १८ दिवसात वाढले आहे. मुंबईत ३६.८८ टक्के रुग्ण या १८ दिवसात वाढले आहेत. गेले तीन महिने सातत्यानं करोना बळींची संख्या लपविली जात होती. त्याबाबत आपल्याला सूचित केल्यानंतर एकाच दिवशी राज्यभरातील बळीची संख्या १३२८ इतकी वाढली. ही एक दिवसाची वाढ विचारात घेतली नाही, तरी बळींच्या संख्येत जूनच्या या १८ दिवसांत महाराष्ट्रात ३७.१६ टक्क्यांनी वाढ झाली असून, मुंबईत ती वाढ ३५.१६ टक्के इतकी आहे”, अशी चिंता फडणवीसांनी व्यक्त केली आहे.

“एकीकडे ही सर्व परिस्थिती असताना अजूनही मुंबईत करोना बळींची संख्या दडवली जात असल्याचं मी सातत्यानं आपल्या निदर्शनास आणून दिले आहे. माझी विनंती आहे की, याबाबत अतिशय पारदर्शीपणे आकडेवारी राज्यातील जनतेसमोर मांडली पाहिजे. मुंबई महापालिकेतील आकडेवारीबाबत तातडीनं लक्ष घालून मुंबईतील परिस्थितीबाबत स्पष्ट व पारदर्शी माहिती जनतेसमोर आणणे गरजेचे आहे”, अशीही मागणी फडणवीसांनी केली आहे.

“आणखी एका गंभीर विषयाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. मुंबईतील केईएम रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सुमारे १० रुग्णांचा ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यानं मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली आहे. करोनाच्या काळात ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या यंत्रांची निगा राखणे अतिशय आवश्यक आहे. यापूर्वीसुद्धा मे महिन्यात जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात १२ जणांना ऑक्सिजनच्या यंत्रणेतील बिघाडामुळे प्राणास मुकावे लागले. हे आरोग्य यंत्रणेतील गंभीर दोष दाखवितात. आपण स्वतः या सर्व प्रकारांत लक्ष घालावे आणि हे दोष दूर करावेत”, अशी मागणी फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खतांच्या वाढत्या किमती विरोधात बच्चू कडू करणार टाळी आणि थाली बजाओ आंदोलन !

News Desk

‘फक्त भो भो करू नका ,आरोप सिद्ध करा !’ सिद्ध झाले तर राजकारणातून निवृत्त होईन…महापौरांचा सौमय्यांवर पलटवार …

News Desk

देशातील  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्स

News Desk