HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणेंवर आता ‘मिशन 114’ची जबाबदारी, महापालिका निवडणुकीसाठी भाजपची तयारी !

मुंबई। केंद्रात मंत्रिपद मिळालेल्या चारही नेत्यांची भाजपने जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. नव्या मंत्र्यांनी जनतेशी संवाद साधावा या हेतूने ही यात्रा काढल्याचं सांगितलं जातं. मात्र, या यात्रेच्या माध्यमातून भाजपने महापालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केल्याचं उघड झालं आहे. भाजपने केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्याकडे मुंबई महापालिकेसाठी ‘मिशन 114’ सोपवल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेला जनतेचा कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर, राणेंच्या या यात्रेमुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

पहिल्याच दिवशी ते विमानतळ ते कुलाबा असा प्रवास करणार

नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा येत्या 19 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्या दिवशी राणे सकाळी 10 वाजता विमानतळावर पोहोचतील. तिथूनच त्यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू होईल. मुंबई आणि कोकण पट्ट्यात ही यात्रा राहणार आहे. पहिल्याच दिवशी ते विमानतळ ते कुलाबा असा प्रवास करणार आहेत, त्यामुळे त्यांच्या यात्रेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

त्यांच्याकडे मिशन 114 सोपवलं आहे

दिल्ली नेतृत्वाने राणेंकडे कोकण आणि मुंबईची जबाबदारी दिली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक पुढच्या वर्षी होत असल्याने त्यांच्याकडे मिशन 114 सोपवलं आहे. मुंबई महापालिकेत 114 जागा किंवा त्याहून अधिक जागा निवडून आणण्याची जबाबदारी राणेंवर देण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत हे मिशन यशस्वी करा, असे आदेशच राणेंना देण्यात आले आहेत. शिवसेनेला शह देण्यासाठी राणेंकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेनेविरोधात राणेंच्या ताकदीचा पुरेपूर वापर करून घेण्याचं भाजप श्रेष्ठीने ठरवलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे राणेंच्या या मिशन 114 ला किती यश मिळतं हे आगामी काळातच सिद्ध होणार आहे. मात्र, महापालिका निवडणुकीत राणेंची एन्ट्री झाल्याने ही निवडणूक शिवसेनेसाठी अत्यंत संघर्षाची ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई व कोकण भागात त्यांची जन आशीर्वाद यात्रा होणार

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची 7 दिवस यात्रा होणार आहे. एकूण 170 हून अधिक भागांना राणे भेट देणार आहेत. मुंबई व कोकण भागात त्यांची जन आशीर्वाद यात्रा होणार आहे. राणे यांच्या यात्रेचे प्रमुख म्हणून प्रमोद जठार व सहप्रमुख म्हणून आमदार सुनिल राणे काम पाहणार आहेत. या यात्रेत भाजपसह स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्तेही भाग घेणार आहेत. 19 तारखेच्या यात्रेसाठी आतापर्यंत 500 गाड्यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे 19 ऑगस्ट रोजी मुंबईत राणेंचं मोठं शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सचिन वाझेला खासगी रुग्णालयात उपचारासाठी कोर्टाची परवानगी!

News Desk

“…तर आम्हाला आत्महत्या करायला परवानगी द्या”‘ मुख्यमंत्र्यांकडे धक्कादायक मागणी!

Ruchita Chowdhary

तुमचं ऐकलं, आता आमचं ऐका…किंबुहना ऐकाच!

News Desk