HW News Marathi
Covid-19

साखर उद्योगातून ऑक्सिजन निर्मिती ! देशातील पहिल्या प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन

उस्मानाबाद । राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाण चिंताजनक आहे. अशावेळी राज्यातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा मोठा तुटवडा भासतोय. त्यामुळे राज्याला ऑक्सिजन उत्पादनात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी मिशन ऑक्सिजनची अंमलबजावणी करीत आहोत. अशावेळी साखर उद्योगाने ऑक्सिजन निर्मितीच्या क्षेत्रांत पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांनी आज (१४ मे) देशातील पहिल्या साखर उद्योगात ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या उस्मानाबादच्या कळंब तालुक्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यातील प्रकल्पाचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उदघाटन केले आहे.
“ऑक्सिजन निर्मितीमध्ये स्वावलंबी व्हायला हवे. कोरोनाविरुद्धचा पहिला लढा तर आपण जिंकला आहे. पहिल्या लाटेत आपण मोठ्या प्रमाणावर टेस्टींग लॅब उभारल्या, कोविड केअर सेंटर उभारले, बेडची क्षमता वाढवली. पण दुसऱ्या लाटेचं आव्हान मोठं आहे. मात्र, आता राज्याच्या विविध भागातून येणारे अहवाल पाहिले तर या लाटेवरही आपण मात करू शकू”, असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. पण त्यासाठी आपण ऑक्सिजन निर्मितीमध्ये स्वावलंबी व्हायला हवे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले.

आपल्याला 3000 मेट्रिक टन निर्मिती करायची ! | मुख्यमंत्री

“आपल्या राज्यात 1200 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्माण होतो. आपली गरज साधारणतः 1700 मेट्रिक टन आहे. पण आपल्याला 3000 मेट्रिक टन निर्मिती करायची आहे. तरच आपण स्वावलंबी होऊ शकू. राज्यातील विविध महानगरपालिकांना ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आता सहकार, उद्योग क्षेत्राने यामध्ये पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. साखर कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पात काही फेरबदल करुन विकसित करण्यात आलेला हा प्रकल्प कोरोनाविरुद्धच्या लढ्यात अतिशय महत्वाचा आहे. यापासून इतर उद्योग आणि सहकारी साखर कारखान्यांनी प्रेरणा घ्यावी”, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते विकास आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख-पाटील व्हीसीव्दारे सहभागी झाले. यावेळी कारखाना स्थळावर खासदार ओमराजे निबांळकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार कैलास पाटील, कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील आदी उपस्थित होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातही तोक्ते वादळ आले मग महाराष्ट्राबाबत पंतप्रधानांचा भेदभाव का? पंतप्रधानांच्या गुजरात दौऱ्यावर राष्ट्रवादी भडकली !

News Desk

प्रताप सरनाईकांच्या पत्रावर चंद्रकांत पाटील म्हणतात, आम्ही हेच सांगत होतो !

News Desk

राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते आणि विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन

News Desk