HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्राचे गडकिल्ले आणि कॅम्पस प्लॅस्टिक प्रदूषणाला आळा घालण्यास सज्ज

मुंबई | दर वर्षी संयुक्त राष्ट्र संघाकडून जून ५ रोजी साजरा होणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनाचे यंदाच्या वर्षी यजमानपद भारताकडे आले असून , “प्लॅस्टिक प्रदूषणाला आळा” (beat plastic pollution) असे घोषवाक्य आहे. या संदर्भात साधारण महिन्याभरापूर्वी पुणे स्थित तेर पॉलिसी सेंटरने सामाजिक प्रसार माध्यमांवर प्लॅस्टिक मुक्त गडकिल्ले अशी एक प्रचार मोहीम उघडली. याला जवळपास ५० हुन अधिक संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्रातल्या ७५ हुन अधिक किल्ल्यांवर स्वच्छता केली आहे. किल्ल्यासोबतच पायथा आणि घेरा परिसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न या सर्व सहभागी संस्थांनी केला आहे. तेर पॉलिसी सेंटरचे अध्यक्ष व संयुक्त राष्ट्र संघाचे माजी संचालक राजेंद्र शेंडे यांनी “प्लॅस्टिक मुक्त गडकिल्ले” तसेच “प्लॅस्टिक मुक्त कॅम्पस” हे उपक्रम राबविण्याची संकल्पना मांडली. अनेक स्वयंसेवी संस्था, किल्ले संवर्धन संस्था व शाळा-महाविद्यालयांनी सहभागी होऊन हा उपक्रम यशस्वी करण्यात हातभार लावत आहेत.

“रायगड विकास प्राधिकरण”चे अध्यक्ष, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सदर उपक्रमाला पाठिंबा दिला आहे. प्राधिकरणाच्या माध्यमातून पूर्वीच खासदार संभाजीराजांनी रायगड व घेरा रायगड परिसरातील २१ गावे प्लॅस्टिक मुक्त करण्याचा मानस बोलून दाखवला आहे. त्यामुळे, जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या या अनोख्या मोहिमेला त्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. “प्लॅस्टिक मुक्त कॅम्पस” चे धोरण कर्जत नगरपालिकेचे मुख्य अधिकारी रामदास कोकरे यांनी ठरवले आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, महाराष्ट्र सरकार आणि पुणे महानगरपालिकेने या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या शत्रूंना निर्णायकरित्या नामोहरम करून रयतेला सुखी केले. तीच प्रेरणा घेऊन, आपण महाराष्ट्राचे गडकिल्ले प्लॅस्टिकमुक्त करून त्यांना या प्लॅस्टिक रुपी शत्रू पासून मुक्त करूया, असे शेंडे म्हणाले.

हा उपक्रम केवळ जून ५ पर्यंत मर्यादित न राहता आपण सर्वांनी हे एक जीवनक्रम बनवून, शिवकाळा प्रमाणे गडकिल्ले पुन्हा ग्रामीण जीवनाचे केंद्रबिंदू बनवूया व आपला परिसर आणि सार्वजनिक वास्तू कायमस्वरूपी प्लॅस्टिक कचऱ्यापासून मुक्त करूया, या भावनेने मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांनी पण केला आहे. छत्रपती शिवरायांचे वंशज असलेले खासदार संभाजीराजे यांच्या पाठबळामुळे या कार्याला खूप हुरूप मिळाला आहे. त्यांच्या सकारात्मक व कृतीशील कार्यामुळे या उपक्रमाला गती प्राप्त झाली. जागतिक दर्जाला अनुसरून आपले गडकिल्ले व महाराष्ट्राचे जनजीवन पर्यावरणाशी सुसंगत करूया, असे ते म्हणाले.

या उपक्रमाच्या प्रसाराची जबाबदारी आनंद खर्डे यांनी सांभाळली असून, सर्व संस्थांशी समन्वय साधण्याचे कार्य सनी ताठेले यांनी केले आहेत. हा उपक्रमचा यशस्वी समन्वय करण्यामध्ये भास्कर गोडबोले, अजिंक्य जाधव आणि दीना गेंगमेई यांनी मेहनत घेतली. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व संस्था, शाळा, महाविद्यालये व चमू ना “तेर पॉलिसी सेंटर” तर्फे एक सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्र ही देण्यात येणार आहे. जून ५ ही जागतिक पर्यावरण दिनाची सांगता असली, तरी गडकिल्ल्यांसाठी व शहर आणि ग्रामीण परिसर कायमस्वरूपी स्वच्छ ठेवण्यासाठी ही नवीन बदलाची नांदी असेल.

Related posts

विदर्भाच्या दौऱ्यावेळी मुख्यमंत्र्यांचा ताफा प्रकल्पग्रस्तांनी रोखला

swarit

“या PI लगडचा बाप कोण आहे, ते आम्ही शोधून काढू”, चित्रा वाघ कडाडल्या 

News Desk

महाराष्ट्राचा आकडा १९३ वर, एकूण ७ नवे कोरोना पॉझिटव्ह रुग्ण

swarit