HW News Marathi
देश / विदेश

“काही मिनिटांतच जमिनीचा भाव कसा दोन कोटींवरुन 18.5 कोटी कसा काय होऊ शकतो?”, सेनेचा सवाल

मुंबई | अयोध्येतील राममंदिर हे रामभक्तांचा त्याग, संघर्ष व बलिदानातून उभे राहिले. हाच इतिहास आहे. एखाद्या घोटाळय़ाचा डाग त्या मंदिरावर पडत असेल तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल अशी मागणी शिवसेनेने सामना संपादकीयमधून केली आहे. यावेळी शिवसेनेने कोणी जाणीवपूर्वक बदनामी करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. आजच्या (१५ जून) सामना अग्रलेखातून सेनेनं चांगलचं सुनावलं आहे.
काय लिहिले आहे अग्रलेखात?

अयोध्येतील राममंदिर उभारणीचे काम व त्यामागचा व्यवहार पारदर्शक, प्रामाणिक पद्धतीने व्हावा. रामभक्तांच्या श्रद्धेस तडा जाईल असे काही घडू नये ही अपेक्षा असतानाच जमीन व्यवहाराचे संशयास्पद प्रकरण समोर आले. ते खरे की खोटे याचा लगेच खुलासा झाला तर बरे! राममंदिर कार्य हे राष्ट्रीय अस्मितेचे कार्य आहे. या कार्याची कोणी जाणीवपूर्वक बदनामी करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. अयोध्येतील राममंदिर हे रामभक्तांचा त्याग, संघर्ष व बलिदानातून उभे राहिले. हाच इतिहास आहे. एखाद्या घोटाळय़ाचा डाग त्या मंदिरावर पडत असेल तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल.

अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर व्हावे ही तर जगभरातील तमाम हिंदूंचीच इच्छा आहे. त्या राममंदिरासाठी हिंदूंना मोठा लढा त्यांच्याच हिंदुस्थानात द्यावा लागला. अयोध्येच्या भूमीवर साधू, संत, करसेवकांनी रक्त सांडले. शरयू नदी हिंदूंच्या रक्ताने लाल झाली. बाबरीचे घुमट शिवसैनिकांनी तोडताच मुंबईसह देशातील अनेक भागांत दंगली उसळल्या. त्यातही असंख्य हिंदूंना प्राण गमवावे लागले. गुजरातमधील साबरमती एक्सप्रेसवर हल्ला झाला. ते पुढे ‘गोध्राकांड’ म्हणून इतिहासात नोंदले गेले. त्या गोध्राकांडानंतरही अयोध्येहून परतणाऱया असंख्य रामसेवकांचे मृत्यू झाले.
मुंबईत 93 सालात भीषण बॉम्बस्फोट मालिका घडवून धर्मांध पाकडय़ांनी शेकडो निरपराधांचे प्राण घेतले. हा अयोध्या लढय़ाचाच बदला होता. अशा असंख्य हिंदूंच्या त्यागातून, बलिदानातून, प्रदीर्घ कायदेशीर संघर्षातून सर्वोच्च न्यायालयाच्या कृपेने अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामाचे मंदिर उभे राहत असतानाच एक नवीनच घोटाळा बाहेर आला आहे. राममंदिराची उभारणी व्हावी यासाठी केंद्र सरकारने एक ‘न्यास’ म्हणजे विश्वस्त संस्था स्थापन केली. राममंदिर निर्माणसंदर्भातील सर्व आर्थिक व्यवहार हा ‘न्यास’च करणार होता व या संस्थेतील सर्व लोक हे प्रखर हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी असल्याने कोणत्याही शंकेला जागा नाही, पण ‘आप’ पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी एक धक्कादायक माहिती समोर आणली आहे.
फक्त 10 मिनिटांपूर्वी दोन कोटींना घेतलेली जमीन राममंदिर निर्माण न्यासाने 18.5 कोटींना विकत घेतल्याचा स्फोट संजय सिंह यांनी केला. या सर्व प्रकरणाची सीबीआय आणि ईडीकडून चौकशीची मागणी समोर आल्याने राममंदिर निर्माणामागे नक्की काय गडबड सुरू आहे, असा संशयाचा धूर निघाला आहे. खासदार संजय सिंह म्हणतात की, ‘‘भगवान श्रीराम यांच्या नावाने कोणी घोटाळा करू शकेल याची कल्पनाही करू शकत नाही, पण माझ्या हाती पुराव्याची सबळ कागदपत्रे आहेत. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने जमीन व्यवहारात कोटय़वधी रुपयांचा घोटाळा केला आहे. दहा मिनिटांपूर्वी दोन कोटींना विकत घेतलेल्या जमिनीचा भाव प्रत्येक सेकंदाला साडेपाच लाखाने वाढत गेला.
हिंदुस्थानात काय, तर जगात कुठल्याच जमिनीचा भाव इतक्या वेगाने वाढत नाही. हा प्रश्न देशातील कोटय़वधी रामभक्तांसह राममंदिराच्या निर्माणासाठी आपल्या कष्टाने कमावलेले पैसे मंदिरासाठी देणाऱयांच्या विश्वासाचाही आहे.’’ अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर साधारण साठ एकर परिसरात उभे राहात आहे. त्यासाठी जमीन संपादन करावी लागत आहे. अयोध्येतील अनेक आश्रम, मठ, धार्मिक संस्थांच्या जमिनी त्यासाठी ताब्यात घेतल्या जात आहेत व त्या जमिनीचा मोबदला मूळ मालकांना दिला जात आहे. ज्या जमिनीचा संशयास्पद व्यवहार समोर आणला आहे. तो प्रकार समजून घेतला पाहिजे.
बाबा हरिदास यांनी ही जमीन सुलतान अन्सारी आणि रवी मोहन तिवारी यांना विकली. त्यानंतर त्यांनी ही जमीन रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला विकली. हा व्यवहार फक्त दोन-पाच मिनिटांत झाला. बाबा हरिदास यांनी ही जमीन दोन कोटींना विकली. पुढच्या काही मिनिटांत हीच जमीन राममंदिर ट्रस्टला 18.5 कोटींना विकली. काही मिनिटांतच जमिनीचा भाव दोन कोटींवरून 18.5 कोटी कसा काय होऊ शकतो? अयोध्येचे महापौर ऋषिकेश उपाध्याय व ट्रस्टचे विश्वस्त अनिल मिश्रांच्या उपस्थितीत हा व्यवहार झाला. मुख्य म्हणजे 17 कोटी रुपये संबंधितांच्या खात्यावर जमा करण्यात आले. हे सर्व प्रकरण नक्की काय आहे? त्याविषयी संभ्रम आहे.
तो संभ्रम दूर करण्याचे काम रामजन्मभूमीचे प्रमुख महासचिव चंपत राय यांनाच करावे लागेल. रामजन्मभूमी स्थानावर मंदिर निर्माण करावे यासाठी रामलल्लांच्या नावाने अयोध्येत बँक खाते उघडण्यात आले असून त्या खात्यावर जगभरातील कोटय़वधी श्रद्धाळूंनी शेकडो कोटी जमा केले आहेत. अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री योगी महाराजांच्या हस्ते संपन्न होताच विश्व हिंदू परिषदेचे चार हजारांवर स्वयंसेवक देशभरात घरोघर फिरून सामान्यांकडून राममंदिर निधीसाठी पावत्या फाडत होते. त्यातूनही कोटय़वधी रुपये जमा झाले.
शिवसेनेनेही एक कोटीचा निधी मंदिर कार्यासाठी दिलाच आहे. अयोध्येतील राममंदिर उभारणीचे काम व त्यामागचा व्यवहार पारदर्शक, प्रामाणिक पद्धतीने व्हावा. रामभक्तांच्या श्रद्धेस तडा जाईल असे काही घडू नये ही अपेक्षा असतानाच जमीन व्यवहाराचे संशयास्पद प्रकरण समोर आले. ते खरे की खोटे याचा लगेच खुलासा झाला तर बरे! राममंदिर कार्य हे राष्ट्रीय अस्मितेचे कार्य आहे. या कार्याची कोणी जाणीवपूर्वक बदनामी करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. अयोध्येतील राममंदिर हे रामभक्तांचा त्याग, संघर्ष व बलिदानातून उभे राहिले. हाच इतिहास आहे. एखाद्या घोटाळय़ाचा डाग त्या मंदिरावर पडत असेल तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदीला ट्विटरवरून धमकी

News Desk

दिल्लीत स्वामी ओम बाबांना मारहान

News Desk

शेतकऱ्यांना बळ आणि तरुणांना नव्या संधी देणारा अर्थसंकल्प! – प्रितम मुंडे

Aprna