HW News Marathi
देश / विदेश

लोकसभेत तरी मोहन डेलकरांना न्याय मिळेल काय? – सामना

मुंबई | दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात त्यांचा दबदबा होता.मोहन डेलकर हे सात वेळा लोकसभा निवडणूक जिंकले. एक हिंमतबाज लढवय्या नेता अशी त्यांची ओळख असताना डेलकरांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली. त्यांचा मृत्यू संशयास्पद आहे. लोकसभेत तरी डेलकरांना न्याय मिळेल काय?, अशी विचारणा सामनाच्या आजच्या (२८ फेब्रुवारी) रोखठोकमधून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

सिल्वासा, दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहनभाई डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली. अभिनेता सुशांत राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात ज्यांनी देशभरात खळबळ माजवली त्या प्रत्येकासाठी डेलकरांची आत्महत्या हे आव्हान आहे. मोहन डेलकरांची आत्महत्या हे साधे प्रकरण वाटत नाही, असं राऊत म्हणाले.

डेलकरांच्या आत्महत्येमागे कोणतेच काळेबेरे दिसू नये?

गेली किमान २०-२२ वर्षे मी त्यांना जवळून ओळखतो. हा माणूस सगळ्यांना थेट भिडणारा आणि नडणारा होता. तो मैदानावरून पलायन करील असे कधीच वाटले नाही. सुशांत राजपूतने त्याच्या एका सिनेमात ‘आत्महत्या करू नये. निराश होऊ नये,’ असे संवाद फेकले. त्यामुळे सुशांतसारखा खंबीर मनाचा तरुण आत्महत्या कसा करील? सुशांतची आत्महत्या नसून हत्या असल्याची ‘पटकथा’ तयार झाली. त्या कथाकारांना डेलकरांच्या आत्महत्येमागे कोणतेच काळेबेरे दिसू नये? डेलकर यांनी त्यांची जीवनयात्रा संपवली, स्वतःचा अत्यंत दारुण शेवट त्यांनी करून घेतला याबद्दल किती जण हळहळले?, अशीही विचारणा राऊतांनी केली आहे.

… तर लोकप्रतिनिधीस पिळवणुकीच्या चरकातून जावे लागते

सिल्वासा हा केंद्रशासित प्रदेश. येथे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींपेक्षा पेंद्राने नेमलेल्या प्रशासकांचेच जास्त चालते. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा सतत संघर्ष सुरूच असतो. पुन्हा निवडून आलेले खासदार हे दिल्लीतील सत्ताधारी पक्षाचे नसतील तर त्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीस पिळवणुकीच्या चरकातून जावे लागते, रोज अपमानित व्हावे लागते. त्याची प्रचंड कोंडी होत असते. गेली काही वर्षे डेलकर याच पिळवणुकीच्या चरकातून जात होते, असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे.

दादरा-नगर हवेलीचे प्रशासनाकडून लोकप्रतिनिधींचा पावलोपावली अपमान

दादरा-नगर हवेलीचे प्रशासन माझ्यासारख्या अनेक वर्षे निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींचा पावलोपावली अपमान करते ही खंत डेलकर वेळोवेळी बोलून दाखवत. डेलकर यांनी याच भावनेचा स्फोट लोकसभेत केला तेव्हाही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. आता त्यांनी सरळ जीवनाची अखेर करून घेतली, असंही राऊत म्हणाले.

‘छोडो यार, नही तो काम करना मुश्कील होगा!’

दबंग नेता मोहन डेलकर हे सात वेळा खासदार म्हणून निवडून आले. सिल्वासा व आसपासच्या परिसरातील कामगार संघटनांचे काम ते करीत. आदिवासींच्या प्रश्नांसाठी ते लढत. दहशत व दडपशाही मार्गाने ते राजकारण करतात, विरोधकांना डोके वर काढू देत नाहीत हे आरोप त्यांच्यावर नेहमीच झाले. डेलकरांचा उल्लेख मी नेहमीच ‘दबंग’ असा करीत असे. ‘बाहुबली’ हा शब्दप्रयोग उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यांतील राजकारण्यांबाबत सर्रास वापरला जातो. पण दादरा-नगर हवेलीसारख्या केंद्रशासित भागातून काम करणारे डेलकर हे ‘बाहुबली’च्या व्याख्येत फिट बसत होते. ‘क्या बाहुबली, कैसे हो?’ असे गमतीने विचारल्यावर ‘छोडो यार, नही तो काम करना मुश्कील होगा!’ असे ते बोलत.

मराठी लोकांचा आपल्यालाच पाठिंबा आहे असं डेलकर अभिमानाने सांगायचे

मोहन रावले खासदार असताना त्यांच्या समोरच्या बंगल्यात, गुरुद्वारा रकाबगंज रोडवर ते राहत. अनेकदा गप्पा मारण्यासाठी आम्ही फुटपाथवर उभे राहत असू. दिल्लीत जाण्यासाठी विमान पकडायला ते मुंबईत येत. अनेकदा ते सहकुटुंब असत. ”डेलकर, नाम से तो आप हमेशा मराठी लगते हो। लेकिन गुजरात में चले गए।” असे मी गमतीने म्हणत असे. त्यावर डेलकर हसून म्हणत, ”आमचा भाग केंद्रशासित आहे. आम्ही थोडे मराठी आहोत आणि गुजरातीही आहोत. सिल्वासात मराठी लोकवस्ती मोठी आहे. ते सगळे माझेच समर्थक आहेत.” मराठी लोकांचा आपल्यालाच पाठिंबा आहे, असे ते अभिमानाने सांगत.

बाळासाहेबांनी डेलकर यांच्याविरोधात सभा घेतली होती….!

डेलकर हे एक अजब रसायन होते. 1990 च्या दशकात शिवसेनेने सिल्वासात लोकसभा निवडणूक लढवली. प्रचारासाठी स्वतः बाळासाहेब ठाकरे सिल्वासाला गेले. मोहन डेलकर काँग्रेसचे उमेदवार होते. प्रचार सभा डेलकरांच्याच विरोधात होती. डेलकरांच्या झुंडशाही आणि दडपशाहीविरोधात शिवसेनेने प्रचार सुरू केला. त्यात बाळासाहेब ठाकरे तेथे पोहोचणार म्हटल्यावर वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. आदल्या दिवशी संध्याकाळी फोन वाजला. फोनवर स्वतः मोहन डेलकर. ”क्या मोहनभाई, क्या चल रहा हैं?” मोहन डेलकर शांतपणे म्हणाले, ”उद्या सिल्वासात आदरणीय बाळासाहेब येत आहेत. सिल्वासात चांगली हॉटेल्स नाहीत. साहेबांची गैरसोय होऊ नये. त्यांना विनंती करा, माझ्याच बंगल्यात उतरा. नंतर प्रचार सभेला जा. सध्या कडक उन्हाळा आहे.” यावर मी विचारले, ”अरे बाबा, तुझा पक्ष तुझ्यावर कारवाई करील.”

…पण मीच जिंकणार, डेलकरांना आत्मविश्वास

”बाळासाहेबांमुळे कारवाई होणार असेल तर चालू द्या, पण मीच जिंकणार आहे.” डेलकर म्हणाले व शेवटी डेलकरच मोठ्या फरकाने जिंकले. सतत सहा-सातवेळा निवडून येणे हे सोपे नाही. डेलकरांनी त्या पट्ट्यात जम बसवला होता. ते मेहनती होते, लोकप्रिय होते. त्यांचे समांतर सरकार तेथे चालत हेते, पण गुजरातमध्ये व दिल्लीत भाजपचे शासन आल्यापासून डेलकरांच्या साम्राज्यास सुरुंग लावण्याचे हरेक प्रयत्न सुरू झाले. डेलकरांच्या बोलण्यातून ही अस्वस्थता दिसत होती. भाजपचे दिग्गज नेते डेलकरांच्या पराभवासाठी सिल्वासात येत. तरीही मोहन जिंकत राहिले.

नटाचा मृत्यू झाल्यावर खळबळ माजते पण सात वेळा खासदार झालेला माणूस जातो तेव्हा सगळे शांत

मोहन डेलकर हे हिंमतबाज होते, ते पळपुटे नव्हते. ते आत्महत्या का करतील? त्यांना जय-पराजयाची चिंता कधीच वाटली नाही. अशा डेलकरांचा मृतदेह मुंबईतील हॉटेलात फासावर लटकलेला आढळतो व सगळे चूप आहेत. एका नटाची आत्महत्या खळबळ माजवते, एका नटीचे बेकायदेशीर बांधकाम तोडल्यावर हलकल्लोळ होतो, पण सातवेळा निवडून आलेले एक खासदार मुंबईत संशयास्पदरीत्या मृत पावतात त्यावर कोणी काहीच आपटायला तयार नाही.

भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी त्यांच्यावर दबाव होता

मोहन डेलकर यांनी एक ‘सुसाईड नोट’ गुजरातीत लिहून ठेवली. ही नोट खरी असेल तर त्यात डेलकरांनी नक्की काय लिहिले? दादरा-नगर हवेलीचे प्रशासक डेलकरांचा छळ करीत होते, भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी त्यांच्यावर दबाव होता असे त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. आपल्याला विरोध करणारा राजकारणी, कलाकार, सामाजिक कार्यकर्ता, चळवळ यांची मानसिक कोंडी करून त्यांना आत्महत्येच्या कड्यावर न्यायचेच अशी काही योजना ठरली आहे काय? मोहनने आत्महत्या केली, तो खून नाही हे मान्य केले तर मग ती का केली? असा पुढचा प्रश्न उपस्थित होतो.

डेलकरांचा वाद नेमका कुणाशी होता

सिल्वासा, दादरा-नगर हवेली हा लहान केंद्रशासित प्रदेश. त्या प्रदेशातला खरा लोकनेता मोहन डेलकरच होता. अशा मोहन डेलकरांना आत्महत्या करावी लागली. मग त्यांचा वाद कुणाशी होता व शेवटचे प्रोव्होकेशन कोणाचे होते? मोहन डेलकर राजकारणात होते. ते दबंग होते म्हणून त्यांचा संशयास्पद मृत्यू दुर्लक्षित करून चालणार नाही.

डेलकर यांच्या मृत्यूची चौकशी व्हायला हवी

सात वेळा लोकसभेचे सदस्य असलेल्या मोहन डेलकर यांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हायला हवी. डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्महत्या का केली? गुजरात, दिल्लीत त्यांची घरे आहेत. पण मुंबईचे पोलीस आपल्या मृत्यूनंतर ‘सुसाईड नोट’ हा पुरावा मानून आरोपींना अटक करतील ही भावना त्यांच्या मनात नक्कीच असेल. लोकसभेत खासदार डेलकर यांना दोन मिनिटांची श्रद्धांजली वाहिली जाईल. पण तेवढय़ाने काय होणार? डेलकरांच्या आत्महत्येच्या चौकशीसाठी संपूर्ण सभागृहात आवाज उठवायला हवा.

ओम बिर्ला काय करणार?

दादरा-नगर हवेलीत खासदार डेलकरांचा बळी घेतला. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला दादरा-नगर हवेलीच्या प्रशासनाने आपल्याला कसे अपमानित केले त्याबाबत डेलकरांनी डोळ्यात पाणी आणून सांगितले. डेलकर अस्वस्थ होते व प्रशासकीय दडपशाहीने ते असहाय्य बनले. त्याच असहाय्यतेतून संसदेचा एक सदस्य, एक लोकप्रतिनिधी दुःखद आत्महत्या करतो. आपल्या झुंजारपणासाठी, स्वाभिमानासाठी एका खासदाराला प्राणाचे मोल द्यावे लागले. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आता काय करणार आहेत?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इंदापूर तालुक्यातील रुई येथे विमान कोसळले

News Desk

सरकारचा रिमोट मुख्यमंत्र्यांच्या हातात नाहीच!ते दबावाखाली काम करतात,विखेंचा आरोप !

News Desk

जेएनयूतील विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत ‘लेफ्ट अलायन्स’चा विजय

Gauri Tilekar