HW News Marathi
Covid-19

“जबादारी झटकू नका, मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मदत करा!” शिवसेनेचं मोदी सरकारला मागणं

मुंबई। गेली दीड वर्ष संपूर्ण भारत देश कोरोना महामारीशी झुंझत आहे. ह्या कठीण काळात अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे मदत केली. फंड्स जमा करुन, गरजूंना अन्न, मास्क व अत्यावश्यक सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या. तसेच, अनेक जणांनी ‘PM केअर फंड’मध्ये सुद्धा योगदान दिलं. यावरुनच आता शिवसेनेच्या आजच्या सामना अग्रलेखातून सेनेनं PM केअर फंडातून लोकांना मदत करण्याची मागणी केली आहे. सध्या महाराष्ट्र मध्येच नाही तर संपूर्ण देशात कोरोनाचं संकट अद्याप थैमान घालत आहे. अशातच आजच्या (२ जूलै) सामना “अग्रलेखातून महामारी म्हणून जबाबदारी झटकू नका, PM केअर फंडात हजारो कोटी जमा आहेत. मृतांच्या नातेवाईकांना मदत द्या, अशी आग्रही आणि रास्त मागणी शिवसेनेने केली आहे.

काय लिहिले आहे अग्रलेखात?

या संकटकाळातही अनेकांनी व्यापार केला. लसीकरणातून हजारो कोटींचा नफा कमावलाच

कोरोना युद्धात अनेक डॉक्टर्स, शिक्षक, सरकारी पोलिसांनी कर्तव्य बजावताना प्राण गमावले आहेत. असंख्य पत्रकार या संकटांचे वार्तांकन करताना मरण पावले आहेत. त्यामुळे यास फक्त महामारी म्हणून सरकारला जबाबदारी झटकता येणार नाही. या संकटकाळातही अनेकांनी व्यापार केला. लसीकरणातून हजारो कोटींचा नफा कमावलाच. पंतप्रधान केअर फंडातही हजारो कोटी रुपये जमा करण्यात आले. त्याचा वापर मृतांना मदत म्हणून कसा करता येईल हे पाहायला हवे, असा सल्ला आजच्या सामना अग्रलेखातून देण्यात आला आहे.

लाखो लोक मेले, तितकेच अनाथ आणि निराधार झाले

कोरोना बळींच्या वारसांना आर्थिक मदत देणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे, असे सर्वोच्च न्यायालयानेच सांगितले आहे. कोरोना ही आपत्ती आहेच. ती राष्ट्रीय की नैसर्गिक हे सरकारने एकदा ठरवले तर बरे होईल. सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शन केलेच आहे. जनतेला दिलासा देण्याचे काम केंद्र सरकारचेच आहे. लाखो लोक मेले, तितकेच अनाथ आणि निराधार झाले. नुकसानभरपाईच्या मलमपट्टीने जखमेचा घाव भरायला मदत होईल. माणुसकीचा धर्म हेच सांगतो, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

कोरोना ही नैसर्गिक आपत्ती वगैरे नसून राज्य सरकारचे अपयश आहे

कोरोनाचे संकट हे अस्मानी की सुल्तानी यावर अधूनमधून खल सुरूच असतो. कोरोना म्हणजे नैसर्गिक आपत्ती, राष्ट्रीय आपत्ती असल्याचे जाहीर करावे, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे आधीच मांडली आहे. कोरोना ही नैसर्गिक आपत्ती वगैरे नसून राज्य सरकारचे अपयश आहे, असे महाराष्ट्रातील भाजप पुढाऱयांचे म्हणणे आहे. तसे असेल तर भाजपने ‘ईडी’, ‘सीबीआय’चे वॉरंट पाठवून कोरोना व्हायरसला अटक करणे एवढेच आता बाकी आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला स्पष्ट निर्देश दिले आहेत. कोरोना बळींच्या कुटुंबांना अर्थसहाय्य करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्रास स्पष्ट सूचना दिल्या आहेत. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांस आर्थिक मदत करा, पण मदतीची रक्कम किती असावी हे ठरविण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.

निराधार झालेल्या कुटुंबास प्रत्येकी चार लाख रुपये द्या, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर आली व मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यावर सुनावणी झाली. कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती आहे काय, असा प्रश्न न्यायालयाने सरकारला विचारला, तेव्हा सरकारने एक प्रतिज्ञापत्र दाखल करून कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती नसल्याचे सांगून टाकले. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन या काळात साफ कोसळून गेल्याचा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने काढला आहे. कोरोना म्हणजे नैसर्गिक आपत्ती नाहीच, पण राष्ट्रीय आपत्तीही नसल्याचे केंद्र सरकारने शपथेवर सर्वोच्च न्यायालयात सांगितले.

कोरोनातील मृतांना व त्यांच्या निराधार कुटुंबीयांना नुकसानभरपाई देणे सरकारला शक्य नाही

नैसर्गिक आपत्तीच्या श्रेणीत ज्या बारा विषयांना सामील केले आहे त्यात भूकंप, महापूर, वादळ अशा संकटांचा समावेश केला आहे.त्यात समाविष्ट करता येत नसल्याचे केंद्राचे म्हणणे आहे. त्यामुळे कोरोनातील मृतांना व त्यांच्या निराधार कुटुंबीयांना नुकसानभरपाई देणे सरकारला शक्य नाही व तेवढा आर्थिक भारही पेलता येणार नाही, हे सरकार म्हणत असले तरी सर्वोच्च न्यायालयाने कोरोना बळींच्या कुटुंबांना अर्थसहाय्य देण्याची जबाबदारी केंद्र सरकारचीच असल्याचे ठणकावले आहे. न्यायालयाच्या या निर्णयास माणुसकीची किनार आहे. या संकटकाळात लाखो कुटुंबांनी आपला मुख्य पोषणकर्ता गमावला आहे. त्या कुटुंबांनी कसे जगावे? हजारो कुटुंबांत आई-बाप मरण पावल्याने मुले अनाथ झाली आहेत. त्यांचे भवितव्य नक्की काय? कोरोनाच्या पहिल्या व दुसऱया लाटेत चार लाखांच्या आसपास लोकांनी प्राण गमावले आहेत.

सर्वोच्च न्यायालय जेव्हा ठामपणे सांगत आहे की, सरकारचे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन साफ कोसळल्यामुळेच मृत्यूचे तांडव झाले. त्यावर वाद का घालावा? इस्पितळांचा तुटवडा, ऑक्सिजनसाठीची मारामार, लसीकरणापासून औषधांपर्यंत झालेले अराजक हे कसले लक्षण मानायचे? सरकारचे वैद्यकीय व्यवस्थापन शिस्तीत असते तर अनेक प्राण वाचू शकले असते. अनेक ठिकाणी कोरोनाग्रस्तांवर नीट उपचार झाले नाहीत व इस्पितळांतील बिलांचे आकडे पाहून त्या धक्क्यानेच प्राण गमावले. लोकांची आयुष्यभराची जमा पुंजी उपचारात खर्च पडली, तर अनेकजण कर्जबाजारी झाले. हे कर्ज त्यांना घरेदारे गहाण ठेवून फेडावेच लागेल. यासंदर्भात वैद्यकीय कर्जमाफीची योजना अद्याप घोषित केलेली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यातील १५ हजार स्थलांतरित मजुरांची पहिली यादी तयार

News Desk

ठाकरे सरकारकडून ‘दिवाळी’साठीच्या मार्गदर्शक सूचना जारी, कशावर बंदी ? जाणून घ्या

News Desk

चक्रीवादळात मदत व बचाव कार्य करणाऱ्या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

News Desk