HW News Marathi
महाराष्ट्र

लोकशाही तेव्हाही जिंकली, आजही जिंकली, लोकशाही जिवंत आहे !

मुंबई । लोकशाहीचे अनेकदा मुडदे पाडणाऱ्यांनी कर्नाटकात लोकशाहीची हत्या झाली असे गळे आता काढावेत ही मोठीच मौज म्हणायची! सर्वाधिक 104 जागा जिंकणाऱ्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने लोकशाहीची हुकमी युक्ती वापरली. तो टेकू आता थोडासा सरकला आणि कुमारस्वामी सरकारचा डोलारा कोसळला. कर्नाटकातील राजकीय तमाशा एकदाचा संपला आहे. काँग्रेसच्या पाठिंब्यावर चौदा महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेले सेक्युलर जनता दलाचे कुमारस्वामी सरकार कोसळले आहे. विरोधी पक्षाचे आणखी एक सरकार जमीनदोस्त झाले आहे आणि भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी कुमारस्वामी सरकारच्या शपथविधीप्रसंगी देशभरातील भाजपविरोधी नेत्यांनी एकमेकांना मिठ्या मारून आणि हात उंचावून विरोधकांच्या एकीचे दर्शन देशाला घडवले होते. मात्र ही एकजूट किती पोकळ होती हेच कुमारस्वामींच्या गच्छंतीने सिद्ध केले. मोदीद्वेषाने पछाडलेल्या विरोधकांवर काळाने उगवलेला हा राजकीय सूड आहे. एखाद्या रहस्यपटालाही लाजवतील अशा नाट्यपूर्ण राजकीय घडामोडींनंतर कर्नाटकात होऊ घातलेले हे सत्तांतर देशभरात चर्चेचा विषय ठरले. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकातील भाजपच्या विजयानंतर लोहशाहीची हत्या झाल्याची म्हणा-यावर टीकास्त्र सोडले आहे.

सामनाचा आजचा अग्रलेख

लोकशाहीचे अनेकदा मुडदे पाडणाऱ्यांनी कर्नाटकात लोकशाहीची हत्या झाली असे गळे आता काढावेत ही मोठीच मौज म्हणायची! सर्वाधिक 104 जागा जिंकणाऱ्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने लोकशाहीची हुकमी युक्ती वापरली. तो टेकू आता थोडासा सरकला आणि कुमारस्वामी सरकारचा डोलारा कोसळला. याचा अर्थ स्पष्ट आहे लोकशाही तेव्हाही जिंकली, आजही जिंकली, लोकशाही जिवंत आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानातही ती अशीच जिवंत राहील काय, एवढेच आता पाहायचे!

कर्नाटकातील राजकीय तमाशा एकदाचा संपला आहे. काँग्रेसच्या पाठिंब्यावर चौदा महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेले सेक्युलर जनता दलाचे कुमारस्वामी सरकार कोसळले आहे. विरोधी पक्षाचे आणखी एक सरकार जमीनदोस्त झाले आहे आणि भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी कुमारस्वामी सरकारच्या शपथविधीप्रसंगी देशभरातील भाजपविरोधी नेत्यांनी एकमेकांना मिठ्या मारून आणि हात उंचावून विरोधकांच्या एकीचे दर्शन देशाला घडवले होते. मात्र ही एकजूट किती पोकळ होती हेच कुमारस्वामींच्या गच्छंतीने सिद्ध केले. मोदीद्वेषाने पछाडलेल्या विरोधकांवर काळाने उगवलेला हा राजकीय सूड आहे. एखाद्या रहस्यपटालाही लाजवतील अशा नाट्यपूर्ण राजकीय घडामोडींनंतर कर्नाटकात होऊ घातलेले हे सत्तांतर देशभरात चर्चेचा विषय ठरले. जनता दल आणि काँग्रेसच्या आमदारांचे राजीनामे, राजकीय घोडेबाजार आणि आमदारांच्या खरेदीसाठी लागलेली कोट्यवधी रुपयांची बोली, सरकार बुडवण्यासाठी सरसावलेल्या आमदारांचा कर्नाटकच्या बाहेर झालेला पाहुणचार, त्या आमदारांना पळवण्यासाठी एका मंत्र्याने केलेले प्रयत्न, अल्पमत आणि बहुमताच्या लढाईतील सर्व राजकीय छक्के-पंजे यातून ‘लोकशाही म्हणजे काय?’ याचे अनोखे दर्शन देशातील जनतेला नक्कीच घडले असेल. खरे म्हणजे एकापाठोपाठ आमदारांचे राजीनामा सत्र सुरू झाले तेव्हाच कुमारस्वामी सरकारचे पतन निश्चित झाले होते. मात्र आपण बहुमत गमावले आहे याची

खात्री पटल्यानंतरही

मुख्यमंत्री कुमारस्वामी शेवटच्या क्षणापर्यंत खुर्ची वाचवण्यासाठी आटापिटा करत राहिले. तो प्रकार अत्यंत लज्जास्पद होता. एखादा दिवा विझण्यापूर्वी जी अखेरची धडपड करतो तसेच कुमारस्वामींचे सरकार गेले महिनाभर आचके देत होते. आयसीयूत गेलेले सरकार विश्वासदर्शक ठराव टाळण्याचा प्रयत्न करत राहिले. राजीनामा दिलेल्या आमदारांनी विधानसभेत उपस्थित राहणे बंधनकारक नाही असा आदेश देऊन सर्वोच्च न्यायालयाने कुमारस्वामी सरकारचा ऑक्सिजन मास्कच काढून घेतला. राज्यपाल वजुभाई वाला नवनवीन डेडलाइन देत राहिले, पण मुख्यमंत्री कुमारस्वामी बहुमत सिद्ध करण्यापासून पळ काढत राहिले. मुंबईत पाहुणचार घेणाऱ्या बंडखोर आमदारांना मंत्रीपदाची आमिषे दाखवून शेवटपर्यंत हातपाय मारत राहिले. कुमारस्वामींना त्यात यश तर आले नाहीच, पण त्यांचे हसू मात्र झाले. या राजकीय साठमारीत कोणी काय कमावले आणि कोणी काय गमावले यावरही चर्चा झडत आहेत. जनता दलापुरते बोलायचे तर या पक्षाची आधीच शंभर शकले उडाली आहेत. दक्षिणेत वळवळणारे शेपूटही आता तुटले. त्यामुळे मुख्यमंत्री पद गमावल्याने सेक्युलर जनता दलास जो काही धक्का बसला असेल त्यापेक्षाही मोठा धक्का हे सरकार पडल्यामुळे काँग्रेसला बसला आहे. काँग्रेस जरी आज भाजपवर घोडेबाजाराचा, आमदारांच्या खरेदीचा आरोप करत असली तरी त्यांना आपले आमदार का सांभाळता आले नाहीत हा प्रश्न उरतोच. शिवाय आमदार-खासदारांची होलसेलात खरेदी-विक्री आणि विरोधी पक्षांची

सरकारे पाडण्याचा प्रदीर्घ अनुभव

काँग्रेसच्या गाठीशी आहे. त्यामुळे लोकशाहीचे अनेकदा मुडदे पाडणाऱ्यांनी कर्नाटकात लोकशाहीची हत्या झाली असे गळे आता काढावेत ही मोठीच मौज म्हणायची! स्व. प्रमोद महाजनांनी चीनच्या नेत्यांना हिंदुस्थानातील लोकशाही कशी चालते हे अगदी सोप्या भाषेत सांगितले होते. खुद्द महाजनांनीच एकदा संसदेत हा किस्सा मजेशीरपणे ऐकवला होता. ‘लोकसभेत सर्वाधिक जागा जिंकणारा आमचा पक्ष विरोधी बाकांवर आहे, दुसऱ्या क्रमांकाच्या जागा जिंकणारा पक्ष (काँग्रेस) सरकारच्या बाहेर आहे, तिसऱ्या क्रमांकाच्या जागा जिंकणारा पक्ष (जनता दल) सत्तेत आहे आणि ज्या पक्षाचा केवळ एकच खासदार आहे (रमाकांत खलप) ते या सरकारमध्ये मंत्री आहेत.’ देवेगौडांच्या पंतप्रधानपदाच्या काळातील लोकशाहीचा हा किस्सा ऐकवून प्रमोदजींनी मोठाच हास्यस्फोट घडवला होता. 14 महिन्यांपूर्वी कर्नाटकातही नेमके हेच घडले. अवघे 37 आमदार असलेल्या कुमारस्वामींना काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाच्या सिंहासनावर बसवले. दुसऱ्यां क्रमांकाच्या 78 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने लोकशाही जिवंत वगैरे ठेवण्यासाठी तिसऱ्याच्या साथीने सत्तेत सहभाग घेतला. सर्वाधिक 104 जागा जिंकणाऱ्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने लोकशाहीची हुकमी युक्ती वापरली. तो टेकू आता थोडासा सरकला आणि कुमारस्वामी सरकारचा डोलारा कोसळला. याचा अर्थ स्पष्ट आहे लोकशाही तेव्हाही जिंकली, आजही जिंकली, लोकशाही जिवंत आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानातही ती अशीच जिवंत राहील काय, एवढेच आता पाहायचे!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ये कौन है भाई?, अमृता फडणवीस अन् ‘त्या’ व्यक्तीचा फोटो ट्विट करून मलिकांनी विचारले BJPचे ड्रग्ज कनेक्शन

News Desk

“फडणवीसांनी फालतू राजकारण करणं सोडावं”, राऊतांचा खोचक सल्ला

News Desk

शरद पवारांवर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी केतकी चितळेला घेतले ताब्यात

Aprna