HW News Marathi
देश / विदेश

ज्येष्ठ नागरिकांमधील ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई | ज्येष्ठ नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असून त्यांच्यामधील या विषाणूचे संक्रमण टाळण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे, याबाबत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना आज (३० मार्च) जारी केल्या आहेत.

जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या विषाणूचा भारतातील वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. लॉकडाऊन आणि संचारबंदीसाख्या उपाययोजनांतून कोरोना विषाणूची संसर्ग साखळी तोडण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सोशल मीडियाद्वारे जनतेशी वारंवार संवाद साधून कोरोनाला रोखण्यासाठी घराबाहेर पडू नका, असे कळकळीचे आवाहन केले आहे.

कोरोना विरुद्धच्या लढाईत प्रत्येकाने सहभागी होऊन शासनाने घातलेल्या निर्बंधांचे पालन करणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे त्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. वयोमानानुसार कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती हे महत्त्वाचे कारण असले तरी अनेक ज्येष्ठ नागरिकांना मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनीशी संबंधित आजार, दमा किंवा श्वसनाचे विकार आदी व्याधी असतात. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाचा ज्येष्ठांना असलेला अधिक धोका टाळण्यासाठी कोरोना विषाणूच्या संसर्गापासून दूर राहावे लागणार आहे. त्यासाठी आरोग्य मंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.

कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी ज्येष्ठ नागरिकांकरिता मार्गदर्शक सूचना

हे करा (DO’s)

■ घरीच रहा. घरी येणाऱ्या कोणत्याही पाहुण्यांच्या किंवा अभ्यागतांच्या भेटी घेणे टाळा. भेटणे अगदीच आवश्यक असेल तर बोलताना किमान एक मीटरचे अंतर राखा.

■ थोड्या-थोड्या वेळाने आपला चेहरा आणि हात साबणाने स्वच्छ धुवा.

■ खोकताना किंवा शिंकताना आपल्या शर्टची बाही, हातरूमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करून तोंड झाका. खोकून किंवा शिंकून झाल्यांनतर रूमाल किंवा कपडे साबणाने स्वच्छ धुवून घ्या आणि टिश्यू पेपर झाकणबंद असलेल्या कचरा डब्यात टाका.

■ घरी बनविलेला ताजा आणि पोषक आहार घ्या, या आहारातून आपल्या कुटुंबाला योग्य पोषण मिळेल याची काळजी घ्या. शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी वारंवार भरपूर पाणी प्या. शरीराची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी ताज्या फळांचा रस प्या.

■ व्यायाम, प्राणायाम करा.

■ आपल्याला असलेली पथ्ये पाळा. डॉक्टरांनी दररोज घ्यायला सांगितलेली सर्व औषधे नियमितपणे घ्या.

■ दूर राहत असलेले आपले कुटुंबीय, नातेवाईकांबरोबर कॉल अथवा व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधा, गरज पडल्यास त्यासाठी कुटुंबियांची मदत घ्या.

■ मोतीबिंदू किंवा गुडघे प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया जर आधीच ठरल्या असतील तर त्या शस्त्रक्रिया काही काळासाठी पुढे ढकला.

■ वारंवार स्पर्श केल्या जाणाऱ्या सर्व ठिकाणांना जंतुनाशकाचा वापर करून पाण्याने नियमित स्वच्छ करा.

■ स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या. जर सर्दी, कोरडा खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास यासारखी लक्षणे आढळून आल्यास त्वरित जवळच्या दवाखान्यात जाऊन डॉक्टरांना दाखवा, त्यांचा सल्ला घ्या आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन करा.

हे करू नका – (DON’Ts)

■ शिंक किंवा खोकला आल्यास मोकळ्या हातावर किंवा चेहरा न झाकता खोकलू किंवा शिंकू नका.

■ आपल्याला ताप, खोकला किंवा सर्दी असेल तर कोणाच्याही जवळ जाऊ नका.

■ आपले डोळे, नाक, जीभ किंवा चेहऱ्याला स्पर्श करू नका.

■ आजारी किंवा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या अजिबात जवळ जाऊ नका.

■ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वत:च्या मनाने कोणतेही औषध किंवा गोळ्या घेऊ नका.

■ कोणाचीही गळाभेट घेऊ नका अथवा हस्तांदोलन सुद्धा करू नका.

■ सध्याची परिस्थिती पाहता नियमित तपासणी किंवा फॉलोअप असेल तरीही त्यासाठी दवाखान्यात जाऊ नका. अगदीच आवश्यक असल्यास फोनवरुन किंवा व्हिडिओ कॉलद्वारे (टेलिकन्सल्टिंग) आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

■ बाजारपेठ, बाग-उद्याने, धार्मिक स्थळे अशा गर्दीच्या ठिकाणी अजिबात जाऊ नका.

■ खूप अत्यावश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडा, अन्यथा अजिबात घराबाहेर पडू नका. घरातच रहा.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीत शेतकरी आक्रमक, पोलिसांचा लाठीचार्ज

News Desk

OBC आरक्षणासाठी भाजप आक्रमक ! राज्यभरात चक्काजाम आंदोलनाला सुरुवात

News Desk

रेल्वेगाड्यांना आता साहित्यकृतींची नावे!

News Desk