HW News Marathi
महाराष्ट्र

खासदार उदयनराजेंनी भीक मागून जमा केलेले ४५० रुपये जिल्हाधिकाऱ्यांनी परत का केले?

सातारा | भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सरकारच्या विरोधात काही दिवसांपूर्वी भीक मांगो आंदोलन केले होते. यावेळी त्यांनी दिलेली ४५० रुपयांची रोख रक्कम कायदेशीररित्या स्वीकारता येत नसल्याचे पत्र देत जिल्हा प्रशासनाच्यावतीने उदयनराजे भोसलेंनी दिलेले पैसे त्यांना निवासस्थानी जाऊन परत देण्यात आले आहेत. साताऱ्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांनी आंदोलनातील कोणतीही रोख रक्कम स्वीकारता येत नसल्याचे सांगत ही रक्कम परत केली आहे.

दरम्यान, उदयनराजे यांनी दिलेली रक्कम ही कायदेशीररित्या स्वीकारता येत नसल्याचे एका ओळीचे पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांनी उदयनराजेंना दिली आहे. रोकड एका पाकिटात घालून तिच्यासोबत ते पत्र जोडून उदयनराजेंच्या जलमंदिर येथील कार्यालयात जमा केली आहे. तसेच, कार्यालयाची पोच देखील घेतल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

काय लिहिले होते त्या पत्रात?

जिल्हा प्रशासनाला आंदोलनातील रोख रक्कम स्वीकारता येत नाही. तशी कोणतीही कायदेशीर तरतूद नसल्याने ती रक्कम आंदोलकांना परत करण्यात आले आहे.- सुनील थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी, सातारा

काय आहे प्रकरण?

राज्य सरकारच्यावतीने संपूर्ण राज्यात वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्यात सुधारणा करत जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. जिल्हा प्रशासनाने काढलेल्या आदेशाला विरोध करत खासदार उदयनराजे भोसले यांनी १० एप्रिलला साताऱ्यामध्ये भीक मांगो आंदोलन केले होते.

या आंदोलनावेळी उदयनराजेंनी सरकारसह जिल्हा प्रशासनावर सडकून टीका केली होती. एका आंब्याच्या खाली बसून उदयनराजेंनी भीक मांगो आंदोलन केले होते. त्यांच्या थाळीमध्ये जमा झालेली रक्कम उदयनराजेंनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन प्रशासनाकडे दिली होती. तसेच लॉकडाऊन मागे घ्यावाच लागेल अन्यथा असंतोष भडकेल, असा इशाराही यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिला होता. त्यानंतरही राज्य शासनाने संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लावले. १४ एप्रिल पासून १ मे पर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली.

काय म्हणाले होते उदयनराजे भोसले?

लॉकडाऊनला विरोध करण्यासाठी आज उदयनराजे यांनी सातारा येथे हे भीक मांगो आंदोलन केलं होतं. यावेळी त्यांनी सचिन वाझे प्रकरण, करोना लसीकरण व लॉकडाउनवरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. करोना थोपवण्यासाठी लॉकडाउन हा पर्याय आहे असं कोणत्या तज्ज्ञांनी सांगितलं आहे, हे जनतेला कळायला हवं, असं म्हणत उदयनराजेंनी सरकारवर हल्लाबोल केला होता.

ज्याचं हातावर पोट आहे त्यांची लॉकडाउनमुळं काय अवस्था झाली असेल. करोनावरील लसीकरण मिळत नाही आणि ज्यांना करोना लस दिलीये ते पॉझिटिव्ह मिळत आहेत. हा काय बाजार मांडलाय का? असा सवाल त्यांनी केला आहे. तसंच, लॉकडाउन हटवून टाका असं मी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करतो. हे सगळं धुळफेक आहे. वाझे प्रकरण लपवण्यासाठी आहे,’ असा आरोपही उदयनराजेंनी केला होता. सणासुदीचे दिवस आलेत. कामगार लोक आहेत, व्यापारांनी कर्ज काढलं आहे. बँकानी त्यांच्यासमोर पैशासाठी तगादा लावलाय आणि लॉकडाउनमुळं तुम्ही त्यांना भीकेला लावणार का? असा सवाल उदयनराजेंनी सरकारला केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील एकपडदा थिएटरचालकांचे खासदार सुप्रिया सुळेंना पत्र, पुन्हा थिएटर सुरु करण्याची केली मागणी

News Desk

झूम ॲप सरकारी किंवा खाजगी वापरासाठी सुरक्षित नाही

News Desk

‘मला राँग बॉक्समध्ये उभे करू नका’, संजय राठोड यांची सगळ्यांना हात जोडून विनंती

News Desk