HW News Marathi
महाराष्ट्र

‘उत्सव नंतरही साजरे करू!’

मुंबई | राज्यात जरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी देखील तिसऱ्या लाटेची भीती सरकारकडून दर्शवली जात आहे. सध्या गणेशोत्सवची धावपळ सुरु आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापनाची बैठक आज(६ सप्टेंबर) पार पडली. “कोरोना संसर्गात थोडीशी वाढ दिसत असून मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता, मी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करतो की, त्यांनी गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरित स्थगित करावेत. इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करू शकता, मात्र आता आपल्याला मुळात तिसरी लाट येऊच द्यायची नाही”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

निर्बंध लावावेत असे कोणाला वाटेल?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढे बोलताना ते म्हणाले, “राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सरकारला या संकटाशी सामना करण्यासाठी संपूर्ण तयारीत राहण्याच्या स्पष्ट सूचना आहेतच, पण सत्ताधारी, विरोधी अशा सर्वच पक्षांना मी आवाहन करीत आहे की, आता अधिक काळजी घ्या. गर्दीचे कार्यक्रम टाळा. सण, उत्सव आले आहेत, त्यावर निर्बंध लावावेत असे कोणाला वाटेल? पण शेवटी आपले आरोग्य, प्राण महत्त्वाचे. उत्सव नंतरही साजरे करू”.

पण त्यातून धोका वाढला

निर्बंध शिथिल करण्यासाठी अनेकांनी मुख्यमंत्र्यांकडे मागण्या केल्या आहेत. त्यावर देखील उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. “हे उघडा ते उघडा’ या मागण्या ठीक आहेत, पण त्यातून धोका वाढला आहे. प्रत्येकाने नियम आणि मर्यादा पाळल्या तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही. म्हणूनच माझ्या शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांना मी विनम्र आवाहन करीत आहे, आपण सगळ्यांनीच शहाणपणाने वागून लोकांच्या जिवाचे रक्षण करायला हवे. सण, उत्सव आज झाले नाहीत तर उद्या नक्की येतील, पण घरातला प्रत्येक माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. लोकांच्या जिवावरील विघ्न टाळायचे असेल तर, शासनाने वेळोवेळी आखून दिलेल्या आरोग्याच्या नियमांचे पालन होईल हे काटेकोरपणे पहा, गर्दी करू नका. सार्वजनिक कार्यक्रम टाळा. राजकीय सभा, संमेलनांना उत्तेजन देऊ नका, हीच त्या विघ्नहर्त्या श्री गणेशाची इच्छा असेल”, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

या लाटेत ऑक्सिजनचा मोठा तुटवडा

मला वारंवार आपणांस हे आवाहन एवढ्याचसाठी करावे लागते आहे, कारण कोविड परत वाढतोय. येणारे दिवस आव्हानात्मक असतील आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नसेल तर विशेषतः सर्व राजकीय पक्षांवर त्याची प्रमुख जबाबदारी आहे, असेही मुख्यमंत्री म्हणतात. दुसऱ्या लाटेची सुरुवात कशी झाली त्याची आपणास पूर्ण कल्पना आहे. या लाटेत ऑक्सिजनचा मोठा तुटवडा होऊन बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाला देखील यातून जावे लागले होते.

काही जणांना सगळंच उघडण्याची घाई झाली

उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना विरोधकांना टोला लगावला आहे, ते म्हणाले, “काही जणांना सगळंच उघडण्याची घाई झाली आहे. पण त्या गोष्टी दीर्घकाळ बंद ठेवायला लागू नये म्हणूनच तर आम्ही ते हळूहळू, परिस्थितीचा आढावा घेऊन उघडत आहोत, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.आम्ही राजकारण्यांनीही करोना प्रतिबंधाच्या नियमांचं पालन केलं पाहिजे. जेव्हा आम्ही बाहेर जातो, जनतेत जातो, त्यावेळी आम्हीच जर नियमांचं पालन केलं नाही तर जनतेला काय सांगणार?, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुरग्रस्तांच्या पॅकेजवर देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल!

News Desk

“आगे आगे देखो होता है क्या”, गिरीश महाजनांचे सूचक ट्विट

News Desk

आता अरविंद सावंतांच्या अवजड खात्याची जबाबदारी महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याकडे

News Desk