नवी दिल्ली | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात होणाऱ्या हिंसेला पूर्णपणे भाजपला जबाबदार धरले आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये भाजपला विजयी रॅली काढू देणार नसल्याचे देखील ममता यांनी सांगितले आहे. भाजप विजयी रॅलीच्या बहाण्याने राज्यात हिंसा घडवून आणत आहे, असे म्हणत राज्यात भाजपला विजयी रॅली काढू देणार नाही. तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, असे आदेशही ममता यांनी पोलिसांना दिले आहेत. लोकसभा निवडणुकांच्या एकंदर प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी यांनी भाजपविरुद्ध अत्यंत आक्रमक भूमिका घेतली होती. जी भूमिका अद्याप कायम असल्याचे दिसते.
सीआयडी आणि अन्य सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांबरोबर ममता यांनी राज्यातील हिंसा झालेल्या भागाचा दौरा केला. “देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून आता १० दिवसांहून अधिक काळ उलटून गेला असला तरीही कोणी दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर पोलिसांनी त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करावी”, असे आदेश ममता यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे, ही कारवाई करण्यास पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य असल्याचे देखील ममता यांनी सांगितले आहे. विजयी रॅलीच्या बहाण्याने हुगली, बांकुरा, पुरुलिया आणि मिदनापूर या भागांत भाजप हिंसा करत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.