HW News Marathi
महाराष्ट्र

साहेब, सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा…. उजळेल राष्ट्रवादी केला इरादा पक्का….

अमोल मिटकरी

शिव-शाहू-फुले आंबेडकर यांच्या विचारांना देशभरात लिखाणाच्या माध्यमातून घेऊन जात असताना राज्याच्या वरिष्ठ सभागृहात विधानपरिषद सदस्य म्हणून स्थान मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांचा परिसस्पर्श लाभला व शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आशीर्वादाने व्याख्यानातून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास मांडणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमदारकी दिली तो दिवस होता 14 मे 2020 छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचा.

मला आजही आठवते 14 मे 2020 रोजी माझी व देशाचे सर्वोच्च नेते शरदचंद्रजी पवार साहेबांची मुंबई येथील सिल्व्हर ओक येथे तिसऱ्यांदा भेट होणार होती देशाचे माजी कृषिमंत्री संरक्षण मंत्री एवढेच नव्हे तर पद्मविभूषण असलेल्या शरद पवार साहेबांच्या समोर आपण काय बोलावं याच भावनेतून मनातल्या मनात माझी घालमेल सुरू होती. त्यात पवार साहेबांसोबत भेटण्यासाठी मी एकटाच असल्याने मनात कुठेतरी दडपण होतं ज्या व्यक्तीच्या राजकीय कारकीर्दीला 50 वर्षाचा प्रेरणादायी वारसा असेल त्या पवार साहेबांसोबत बोलायची हिम्मत होईल का या भीतीने मनाचा थरकाप उडाला होता.

मला सकाळी नऊ वाजता ची वेळ देण्यात आली होती मी पंधरा मिनिटात अगोदरच सिल्वर ओकला हजर झालो, पवार साहेब वेळेच्या बाबतीत किती परफेक्ट आहेत हे संपूर्ण देशाला माहिती आहे. सकाळी बरोबर नऊ वाजता शरदचंद्रजी पवार साहेब व माझी भेट झाली बाजूला खासदार सुप्रियाताई सुळे बसलेल्या होत्या. ज्या मिटकरी कुटुंबातील कुणीही आजवर साधी ग्रामपंचायतची निवडणूक लढविली नाही त्या कुटुंबातील एक व्यक्ती थेट देशाच्या सर्वोच्च नेत्यांपुढे बसलेला असताना माझ्या मनाची होणारी घालमेल तो काळच सांगू शकतो साहेब काय बोलणार हाच विचार मी मनातल्या मनात करत होतो.

लगेच साहेबांनी विचारले काय म्हणतो अकोला जिल्हा, तुम्ही कोणत्या तालुक्यातील मी अकोट तालुका म्हणताक्षणीचं,पवार साहेबांनी मी 1986 मध्ये अकोट येथील नर्सिंग महाराजांच्या प्रांगणात जाहीर सभेसाठी आलो होतो ही आठवण सांगत दहीहंडा अकोला अकोट या परिसरातील पिकांबाबत तसेच हा सर्व परिसर कॉटन बेल्ट आहे ना? असे विचारत तब्बल 34 वर्षापूर्वीची आठवण जशीच्या तशी डोळ्यापुढे मांडली होती हे ऐकून तर मी अवाकच झालो होतो.गावाची नाव जिल्ह्यातील सामान्य कार्यकर्त्यांची नाव सुद्धा साहेबांच्या आठवणीत आहेत ही किती मोठी गोष्ट म्हटली पाहिजे…

कोरोना विषयक विविध बाबींवर चर्चा झाल्यानंतर साहेबांनी मला राज्याचे वरिष्ठ व वैचारिक सभागृह असणाऱ्या विधान परिषदेत आपण प्रवेश करीत आहात त्यामुळे हे सभागृह आपल्या अभ्यासपूर्ण कार्यशैलीने गाजवावे अशी अपेक्षा व्यक्त करीत आजवरच्या राजकीय अनुभवाची आत्मीयतेने माहिती दिली. कला साहित्य क्रीडा राजकारण यासह प्रत्येक क्षेत्राचा अभ्यास असणारे शरच्चंद्र पवार साहेब मला त्याक्षणी देशातील सर्वात मोठे विद्यापीठ असल्याचा अनुभव आला.

अजून चालतोची वाट माळ हा सरेना, विश्रांतीस्थल केव्हा यायचे कळेना..

तब्बल 82 वर्षांचे योद्धे शरदचंद्रजी पवार साहेब कोरोना काळात कधीही घरात बसले नाहीत अखंड पायाला भिंगरी बांधून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन समस्या जाणून घेत होते, म्हणूनच तर युपीएच्या शिष्टमंडळाने कृषी विधेयकासंदर्भात देशाचे राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांची भेट घेतली असता या शिष्टमंडळाचे नेतृत्व शरदचंद्रजी पवार साहेब यांनी केले यावरूनच त्यांचे राष्ट्रीय स्तरावरील स्थान अधोरेखित होते..

शिक्षण, शेती, क्रीडा, साहित्य, राजकारण, संघटना, चळवळी, आंदोलनं अशा विविध क्षेत्रांत महाराष्ट्राची मुस आणि कूस घडविण्यात महाराष्ट्र राज्यातील सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून यशस्वी कारकीर्द करणाऱ्या पवार साहेबांचा योगदान खूप मोठे आहे.शेतकरी दिंडीपासून किल्लारी भूकंपापर्यंत स्वतः जातीने लक्ष घालून हजारोना हक्काचा आधार देणारे पवार साहेब देशाने अनुभवले. ना. धो. महानोरापासून ते लक्ष्मण माने पर्यंत लेखकांची कदर करणाऱ्या पवार साहेबांच काम राजकीय कर्तृत्वाच्या पूर्णत्ववाकडे जाणारा एक प्रवास थक्क करणारा आहे.

“आभाळ जरी कोसळलं,तरी त्याच्यावर पाय ठेवून उभा राहीन”हा प्रचंड आत्मविश्वास असणारे हे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आपल्या शारीरिक अडचणींना न जुमानता केंद्राच्या राजकारणात पाय रोवून आजही उभे आहेत.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर चित्रपट निघाले त्याचप्रमाणे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावरही निघावे असे प्रतिपादन करणारे शरद पवार… ९६% गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम येणाऱ्या मंगेश म्हसकर नावाच्या गरीब विद्यार्थ्याला आर्थिक मदत करणारे शरद पवार,आणि हिंदू-मुस्लिम दंगलीमध्ये जखमी झालेल्या हजारो लोकांना रक्ताची गरज भासली म्हणून माझ्यापासून

रक्तदानाला सुरुवात करा असे म्हणणारे शरद पवार साहेब…

रयत शिक्षण संस्था,विद्या प्रतिष्ठान बारामती, मातोश्री शारदाबाई पवार शिक्षण संस्था,याही पलीकडे जाऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ स्थापन करून शिक्षणाची गंगा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न शरद पवार साहेबानी केल.त्यामुळे अमेरिकेसह भारतातील अनेक विद्यापीठांनी ज्या व्यक्तित्वाला डि. लिट ही पदवी बहाल केली त्याला व्यक्तित्त्वाचं

नाव म्हणजे शरद पवार साहेब

पवार साहेबांचा राजकीय अनुभव व त्यांच्या व्यक्तिमत्वाची काय जादू आहे याचा अनुभव महाराष्ट्राने ‘याची देही याची डोळा’ बघितला तो प्रयोग म्हणजे महाविकास आघाडी सरकारचा.105 भाजपाच्या आमदारांना घरी बसवून महा विकास आघाडीचे मजबूत सरकार या महाराष्ट्राला बहाल करणाऱ्या जगावेगळ्या योद्ध्याचे नाव म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब ..

आता महाविकास आघाडीचे सरकार पुढील पंचवीस वर्षही भाजपाला महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे येऊ देणार नाही हा विश्वास आणि विचार देण्याची प्रेरणा शरदचंद्रजी पवार साहेबांमुळेच मिळाली आहे. मला तर लहानपणापासूनच शरद चंद्रजी पवार साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाची भुरळ पडलेली आहे का सारख्या छोट्याशा गावातून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला साहेबांच्या आशीर्वादामुळेच विधानपरिषदेच्या आमदारकीचा मिळालेला बहुमान ज्यासाठी आमच्या सर्व पिढ्या अखंडपणे साहेबांच्या ऋणात आहेत….

शिवारात राबणारा बोले बळीराजा,

सांगतोय झटणारा कामगार माझा,

माय बहिणीचे आली काळजाची हाक,

राष्ट्रवादी होती आहे आमच्या मनात,

साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा,

उजळेल लोकशाही केला इरादा पक्का…..

आमदार अमोल रामकृष्ण मिटकरी

विधानपरिषद सदस्य विधिमंडळ महाराष्ट्र

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिंगणघाट जळीतकांड प्रकरण | पीडितेची मृत्यूशी झुंज, आरोपीला ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

swarit

स्वतःवर आरोप झाले की सामोरं जायचं नाही हे शूरपणाचे लक्षण नाही! – दिलीप वळसे-पाटील

Aprna

‘भाजपला दादर, माहीममध्ये प्रवेश मिळणार नाही!’ सदा सरवणकरांचं मोठं विधान

News Desk