HW News Marathi
संपादकीय

कॉंग्रेस निरुपम यांना घरचा रस्ता दाखवणार का ?

पूनम कुलकर्णी | मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी संजय निरुपम यांची नियुक्ती झाल्यानंतर कुठेतरी उत्तर भारतीय मुंबईकर आणि स्थानिक मुंबईकर नागरीक यांच्यातील दरी वाढत गेली. निरुपम कॉंग्रेसच्या संस्कृतीपेक्षा वेगळे वागत असल्यामुळे तसेच त्यांच्या अहंकारी स्वभावामुळे ते अनेकदा सर्वांच्या टिकेचे धनी झाले. निरुपम यांच्याकडे मुंबईचे नेतृत्व करणार एक नेता म्हणून न पहाता मुंबईतील उत्तर भारतीय नेता म्हणून पाहिले जाते. त्यांची मुंबई प्रदेश अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींवर नाराज असलेले कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी पक्षाला रामराम ठोकला. त्यामुळे अल्पावधीत कॉंग्रेसला मोठ्या धक्क्याला सामोरे जावे लागले.

निरुपम यांच्या नियुक्तीमुळे नाराज असलेल्या कामत यांनी तीन दशकाहून अधिक काळ राजकारणात सक्रीय असूनही राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. नेहमीप्रमाणे कॉंग्रेसच्या निष्ठावंत नेत्याकडे वरीष्ठांनी दुर्लक्ष केले असेच म्हणावे लागेल. यानंतर गुरुदास कामत यांनी कॉंग्रेसचे नेते कृष्णा हेगडे हे कॉंग्रेस सोडून भाजपात जाण्याचे कारण संजय निरुपम आणि मोहन प्रकाश असल्याचे म्हटले. तसेच संजय निरुपम यांच्यासह मोहन प्रकाश यांच्या वागण्यामुळे कॉंग्रेस मधील तरुण नेतृत्व कॉंग्रेसची साथ सोडण्यास कारणीभूत असेल आणि याचे मला प्रचंड दु:ख आहे असेही ते म्हणाले होते. कॉंग्रेसच्या मुंबई अध्यक्ष पदी निरुपम यांची नियुक्ती झाल्यापासून मोठ्या प्रमाणावर कॉंग्रेसपक्षामध्ये असलेली अंतर्गत नाराजी पहायला मिळाली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या दरम्यान निरुपम आणि कामत यांच्यातील वादाला तोंड फुटले होते. दोन नेत्यांमधील अंतर्गत वादाचा अखेर अंत झाला आणि कामत यांनी कॉंग्रेसला रामराम केला. परंतु जवळपास वर्षभरापासून मुंबई अध्यक्षपदी असलेल्या निरुपम यांना अद्याप मुंबई हा महाराष्ट्राचा भाग असल्याचे लक्षातचं आले नाही. अनेकदा निरुपम यांच्या बेताल वक्तव्यामुळे त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.

 

सध्या मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या संजय निरुपम यांना पदावरून हटविले जाण्याची शक्यता आहे. तसेच निरुपम यांच्या जागी माजी आमदार कृपाशंकर सिंह यांची मुंबई अध्यक्षपदी निवड होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्याचे पहायला मिळत आहे. कदाचित आठवड्याभरात कृपाशंकर सिंह यांच्या नावाची घोषणा होईल अशी शक्यता राजकीय अभ्यासकांकडून वर्तवली जात आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचे प्रभारी म्हणून मल्लिकार्जुन खर्गे यांची नियुक्ती झाल्यापासून निरुपम यांना पदावरुन हटविण्याची मागणी जोर धरु लागली आहे. निरुपम यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर नाराज असलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मुंबईतील कॉंग्रेसचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी निरुपम यांना पदावरुन हटविण्याशिवाय पर्याय शिल्लक नसल्याचे चित्र सध्या पक्षात निर्माण केले आहे. तसेच निरूपम यांना पदावरून हटविणे हाच एकमेव उपाय असल्याचे खर्गे यांना पटवून देण्यात हे कार्यकर्ते जवळपास यशस्वी झाले आहेत असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्राचे माजी प्रभारी मोहन प्रकाश यांचे निरुपम यांच्यांशी चांगले संबंध होते. परंतु खर्गे यांची महाराष्ट्रा प्रभारी पदी नियुक्ती झाल्यापासून निरुपम यांची कोणत्याही क्षणी उचलबांगडी होण्याची शक्यता आहे.

 

कॉंग्रेसमध्ये गुरुदास कामत, मिलिंद देवरा, प्रिया दत्त, नसीम खान यांना निरुपम सुरूवातीपासून मुंबई अध्यक्षपदी नको होते. मात्र, मोहन प्रकाश यांचे संजय निरुपम यांच्याशी चांगले संबंध असल्यामुळे बाकी नेत्यांना निरुपम यांची मनमानी सहन करावी लागली. परंतु मोहन प्रकाश यांच्या जागी खर्गे यांची नियुक्ती होताच निरुपम विरोधी गटाला उभारी आल्याचे पहायला मिळत आहे. तसेच निरुपम यांच्या नियुक्तीमुळे कॉंग्रेसला मुंबई महापालिकेत पराभवाला सामोरे जावे लागलयाचे निरुपम विरोधी गटाचे मत आहे.त्यांनी पदावरुन हटविल्यानंतर कृपाशंकर सिंह यांच्या सोबत भाई जगताप यांच्या नावाची देखील चर्चा होती. परंतु भाई जगताप हे फटकळ स्वभावाचे असल्यामुळे कॉंग्रेसमध्ये असलेली सध्याची नाराजी कदाचित ते दूर करु शकणार नाहीत म्हणून कृपाशंकर सिंह यांच्या नावाला समर्थन मिळताना पहायला मिळत आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबई अध्यक्षपदी कृपाशंकर सिंह यांच्या नावाची वर्णी लागते हे पहाण महत्वाचं ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निकाह हलाला आणि बहुपत्नीत्व मुस्लिम समाजातील कुप्रथा ?

News Desk

मराठा मोर्चाचे आंदोलन भरकटले

swarit

मुंबईत २६ जुलैची पुनारावृत्ती होऊ शकते ?

swarit