HW News Marathi
मनोरंजन

व्ही. शांताराम भारतीय चित्रपटसृष्टीचे पितामह

मुंबई | भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत निर्माता, दिग्दर्शक, नट व पटकथाकार यांचे संपूर्ण नाव शांताराम राजाराम वणकुद्रे आहे. व्ही शांताराम यांचा जन्म कोल्हापूर येथे १८ नोव्हेंबर १९३८ रोजी झाला असून त्यांच्या वडिलांचे किराणा मालाचे दुकान होते व कुटुंबाची आर्थिक स्थिती यथातथाच होती. त्यामुळे शालेय शिक्षण झाल्यावर सुरुवातीला त्यांनी अल्प वेतनावर नोकरी केली. अशा प्रतिकूल काळातच ते दादासाहेब फाळके यांचे चित्रपट, बालगंधर्वांची नाटके, भारतीय व पाश्चात्त्य संगीत अशा कलाक्षेत्रांकडे आकर्षित झाले. परिश्रम, कल्पकता आणि स्वयंप्रेरणा यांच्या बळावर शिकत जाऊन श्रेष्ठ दिग्दर्शक बनले.

१९१४ साली त्यांनी बालगंधर्वांच्या ‘गंधर्व नाटक मंडळी’त नट म्हणून प्रवेश केला. १९२० साली फाळके यांच्या पौराणिक मूकपटांच्या यशाने प्रेरित होऊन कोल्हापूरला प्रसिद्ध चित्रकार बाबूराव पेंटर यांनी स्थापन केलेल्या ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’त ते सामील झाले. बाबूराव पेंटर यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपट कलेची मूळाक्षरे तेथे व्ही. शांताराम गिरविली. नेपथ्य, छायाचित्रण, संकलन, अभिनय, खास दृश्ये (स्पेशल इफेक्ट्‌स) अशा प्रत्येक शाखेतील बारकावे व्ही. शांताराम यांनी तेथे अभ्यासले. याच कंपनीत असताना बाबूराव पेंढारकर यांनी त्यांचे ‘व्ही. शांताराम’ असे चित्रपटीय नामकरण केले.

महाराष्ट्र फिल्म कंपनीने त्या काळात अनेक मूकपट काढले. त्यांपैकी सुरेखाहरण (१९२१) या पौराणिक मूकपटातील कृष्णाच्या भूमिकेद्वारे त्यांनी रुपेरी पडद्यावर प्रवेश केला. विशेषतः सावकारी पाश (१९२५) या सामाजिक वास्तवाचे अत्यंत प्रभावी चित्रण करणाऱ्या मूकपटाचा शांतारामबापूंवर सखोल परिणाम झाला. १९२९ साली कोल्हापूर येथे प्रभात फिल्म कंपनीची स्थापना झाली. या नव्या कंपनीमुळे भारतीय चित्रपटसृष्टीत एका सुवर्णयुगाला प्रारंभ झाला. या कंपनीने व्ही. शांताराम यांच्या दिग्दर्शनाखाली गोपाळकृष्ण (१९२९), खुनी खंजर (१९३०), रानीसाहिबा (१९३०), उदयकाल (१९३०), जुलूम (१९३१), चंद्रसेना (१९३१) इ. पौराणिक व देमार (स्टंट) मूकपट निर्माण केले. १९३२ साली आयोध्येचा राजा हा मराठी (हिंदी अयोध्याका राजा) पहिला बोलपट निर्माण करण्यात आला. त्याचे संगीतदिग्दर्शक गोविंदराव टेंबे होते व प्रमुख भूमिका दुर्गा खोटे, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक इ. नामवंत अभिनेत्यांनी केल्या होत्या. या बोलपटातील इंद्रदरबाराचे नेपथ्य अतिशय नेत्रदीपक होते.

व्ही. शांताराम यांनी १९४२ साली प्रभात फिल्म कंपनी सोडली आणि ‘राजकमल कला मंदिर’ या चित्रसंस्थेची स्थापना केली. शकुंतला हा राजकमलचा पहिला चित्रपट (१९४३). हा हिंदी चित्रपट मुंबईच्या स्वस्तिक चित्रपटगृहात १०४ आठवडे चालला. अमेरिकेत व्यापारी दृष्ट्या प्रदर्शित झालेला हा पहिला भारतीय चित्रपट होय. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक वसंत देसाई होते व जयश्रीने त्यात शकुंतलेची भूमिका केली होती. डॉ. कोटणीस की अमर कहानी (१९४६) हा हिंदी चरित्रपट या प्रतिभावंत कलावंतांच्या कारकिर्दीतील एक यशोशिखर होय. यातील प्रमुख भूमिकाही शांताराम यांनीच केली होती. या चित्रपटाच्या द साँग ऑफ बुद्ध या इंग्लिश आवृत्तीचे प्रदर्शन अमेरिकेत व्यापारी तत्त्वावर करण्यात आले. १९४७ साली शकुंतला या चित्रपटास व्हेनिस चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट पटकथेचे पारितोषिक मिळाले, तर पुढील वर्षी कान्स चित्रपट महोत्सवात तेच पारितोषिक डॉ. कोटणीस की अमर कहानीला प्राप्त झाले.

सुश्राव्य संगीत हा व्ही. शांताराम यांच्या चित्रपटनिर्मितीच्या यशातील महत्त्वाचा घटक मानला जातो. वसंत देसाई, लक्ष्मीकांत प्यारेलाल, रामलाल, राम कदम, हृदयनाथ मंगेशकर इ. नामवंत संगीत दिग्दर्शकांनी त्यांच्या चित्रपटांना संगीत दिले. व्ही. शांताराम यांच्या ठायी असलेल्या औदार्याचे व माणुसकीचे विलोभनीय दर्शनही काही प्रसंगांतून घडते. भारतीय चित्रपटाचे पितामह चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांचे उत्तरायुष्य अतिशय विपन्नावस्थेत गेले. त्या काळात व्ही. शांताराम यांनी आत्मीयतेने त्यांचा उदरनिर्वाह काही काळ चालविला. व्ही. शांताराम यांच्या आत्मचरित्रातील या दोघांचा पत्रव्यवहार हृदयद्रावक तर आहेत, परंतु समस्त कला क्षेत्रातील मान्यवरांना अंतर्मुखही करणारा आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठी नाट्यसंमेलनाची वादाने सुरुवात

News Desk

आसमान से आया फ़रिश्ता

Gauri Tilekar

‘पियानो फॉर सेल’चा ग्रँड प्रीमियर सोहळा संपन्न

News Desk