HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

स्वाभिमान म्हणजे नक्की काय असतो पवारसाहेब?

मुंबई | पक्ष सोडून जाणाऱ्यांनी त्यांचा स्वाभिमान गुंडाळून ठेवला आहे, असे शरद पवार म्हणतात. हा स्वाभिमान म्हणजे नक्की काय असतो पवारसाहेब? असा सवाल सामनाच्या आज (१७ सप्टेंबर) अग्रलेखातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारला आहे. सामनामध्ये उद्धव ठाकरे म्हणाले की, पवारसाहेब, तुम्ही आज ज्यांना पळपुटे म्हणत आहात ते काल कुठून तरी पळून किंवा फुटूनच तुमच्या तंबूत शिरले होते. आता तुमचा तंबूच भुईसपाट झाला. स्वाभिमानाचे नाव का घेता? वळणाचे पाणी वळणाला गेले.

सामनाचे आजचा अग्रलेख

पक्ष सोडून जाणाऱ्यांनी त्यांचा स्वाभिमान गुंडाळून ठेवला आहे, असे शरद पवार म्हणतात. हा स्वाभिमान म्हणजे नक्की काय असतो पवारसाहेब? स्वत: पवारसाहेबांनी स्वाभिमानाच्या मुद्द्यावर सोनियांबरोबर वाद केला. आज त्याच सोनियांबरोबर मागील दीड-दोन दशकांपासून त्यांचे राजकीय ‘गुप्तगू’ सुरू आहे. पवारसाहेब, तुम्ही आज ज्यांना पळपुटे म्हणत आहात ते काल कुठून तरी पळून किंवा फुटूनच तुमच्या तंबूत शिरले होते. आता तुमचा तंबूच भुईसपाट झाला. स्वाभिमानाचे नाव का घेता? वळणाचे पाणी वळणाला गेले.

पळपुट्यांना मतदार धडा शिकवतील, असे शरद पवार यांनी सांगितले आहे. पवार यांनी सत्य सांगितले आहे. शिवसेनेतून काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत वेळोवेळी जे लोक गेले त्यांचा त्या त्या वेळी पराभव झाला आहे. छगन भुजबळ हे शिवसेना सोडून गेले तेव्हा त्यांचा माझगावात पराभव झाला. लोकसभा निवडणुकीत नाशिकला त्यांना मतदारांनी धूळ चारली. नारायण राणे यांचा कोकणात पराभव झाला व नवी मुंबईत गणेश नाईक पराभूत झाले. एखादा अपवाद वगळता भुजबळ-राणेंबरोबर गेलेले आमदार पुन्हा विधानसभेत दिसले नाहीत, पण तो इतिहास झाला. आता इतिहास बदलणारे वारे वाहत आहेत. पवार यांनी नव्याने पक्षबांधणीसाठी महाराष्ट्रभर दौरे सुरू केले आहेत. त्यांचा काम करण्याचा झपाटा मोठा आहे. महाराष्ट्रातील मेगा गळतीचा सगळय़ात मोठा फटका पवारांच्या राष्ट्रवादीला बसला आहे. ‘कोणी सोडून गेले त्याची काळजी करू नका. पक्ष सोडून जाणाऱयांनी त्यांचा स्वाभिमान गुंडाळून ठेवला आहे,’ असे शरद पवार म्हणतात. हा स्वाभिमान म्हणजे नक्की काय असतो पवारसाहेब? स्वत ः पवारसाहेबांनी स्वाभिमानाच्या मुद्दय़ावर सोनियांबरोबर वाद केला. काँग्रेस पक्षात बंड केले. आज त्याच सोनियांबरोबर मागील दीड-दोन दशकांपासून त्यांचे

राजकीय ‘गुप्तगू’

सुरू आहे. शिवसेना किंवा भाजपातील काही मंडळी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत सामील करून घेतली तेव्हा या मंडळींनी स्वाभिमानाचे कोणते शिखर जिंकले होते? त्यांनी तेव्हाही स्वाभिमान वगैरे शब्दाची ऐशी की तैशीच केली होती. शिवसेना सोडताना त्यांना काही स्वाभिमानाचे अजीर्ण झाले नव्हते व आजही पक्षांतरे करताना स्वाभिमान वगैरेची ढेकर कुणी देत नाहीत. राजकारणात सध्या सोय आणि तडजोड महत्त्वाची मानली जाते. राष्ट्रवादीच्या रथावर सध्या स्वार झालेले डॉ. अमोल कोल्हे हे शिवसेनेचेच पार्सल आहे व ते तुमच्या रथावर चढल्याने स्वाभिमानाचे वजन वाढून रथाचा टायर पंक्चर झाल्याची बातमी नाही. खरे तर ‘स्वाभिमान’ हा शब्द सध्या कोणत्याही राजकारण्याने वापरू नये. छत्रपती शिवाजी महाराज व त्यानंतर चिंतामणराव देशमुख यांनी महाराष्ट्र अस्मितेसाठी जो स्वाभिमान दाखवला त्याची सर कुणालाच येणार नाही. शिवसेनाप्रमुखांनी ताठ कण्याचा मराठी माणूस हिमतीने उभा केला. या कण्यावर प्रहार करणाऱयांनी महाराष्ट्राचा स्वाभिमानी पाठकणाच ठिसूळ करण्याचा प्रयत्न केला. तरीही महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान

शिवसेनेने जागता

ठेवला आहे. पवारसाहेबांचे असे सांगणे आहे की, ”मी माझ्या राजकीय कारकीर्दीच्या 52 वर्षांत 27 वर्षे सत्तेबाहेर होतो. सत्तेबाहेर राहून अधिक जोमाने काम केले. आता पक्षांतर करणारे विकासासाठी जात आहेत असे सांगतात तेव्हा गंमत वाटते!” पवारांना याबाबत गंमत वाटणे हीच मोठी गंमत आहे. उदयनराजे भोसले यांनी पक्षांतर करताच म्हणजे ते भाजपात जाताच त्यांची सर्व कामे मुख्यमंत्र्यांनी त्याच दिवशी केली. रस्त्यासाठी पन्नास कोटी दिले. सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर केला. सातारच्या विश्रामगृहात रात्री दीड वाजता मुख्यमंत्र्यांनी उदयनराजे यांच्या आदेशाने ही सर्व कामे चुटकीसरशी केली. उदयनराजे यांची कामे एका रात्रीत झाली, पण नवी मुंबईचे गणेश नाईक ठाण्यातील भाजप कार्यक्रमात गेले. तेथे त्यांना बसायला कुणी खुर्ची दिली नाही असे प्रसिद्ध झाले. येथे पुन्हा स्वाभिमानाचा प्रश्न येतोच. माणसे आणि वकुब पाहून विकासकामे व स्वाभिमानाचे तुरे मिरवले जातात. पवारसाहेब, तुम्ही आज ज्यांना पळपुटे म्हणत आहात ते काल कुठून तरी पळून किंवा फुटूनच तुमच्या तंबूत शिरले होते. आता तुमचा तंबूच भुईसपाट झाला. स्वाभिमानाचे नाव का घेता? वळणाचे पाणी वळणाला गेले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवार यांच्या भेटीनंतर उदयनराजे भोसले राष्ट्रवादीमध्ये राहणार ?

News Desk

राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव आज हाती शिवबंधन बांधणार

News Desk

राष्ट्रवादीचे माजी आमदार भास्कर जाधव स्वगृही परतले

News Desk