HW News Marathi
महाराष्ट्र

‘तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा’, मुख्यमंत्र्यांचा तळीयेतील नागरिकांना आधार….!

महाड। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मंत्र्यांनी तळीये गावात भेट दिल्यानंतर आधार दिला आहे. तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करू. सर्वांना मदत दिली जाईल, अशा शब्दांत आधार देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये गावातील मृतांच्या नातेवाईकांना आधार दिला आहे.

चिखलातून वाट काढत

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री आदिती तटकरे, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री अनिल परब, मिलिंद नार्वेकर, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, मुख्यसचिव सीताराम कुंटे आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री भरपावसात चिखलातून वाट काढत घटनास्थळी पोहोचले.

मुख्यमंत्री भरपावसात

मुख्यमंत्र्यांकडून भरपावसात पाहणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनास्थळी येताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना घटनेची माहिती दिली. ही माहिती घेत असतानाच जोरदार पावसाला सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांनी भरपावसात हातात छत्री धरून स्थानिकांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांचं सांत्वन करत त्यांना धीर दिला.

तुम्ही काळजी करू नका

कागदपत्रांची चिंता करू नका

या दुर्घटनेत ज्यांचं नुकसान झालं आहे. त्यांचं सर्वांचं पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यांची सर्व कागदपत्रे त्यांना मिळवून देण्यात येणार आहे. तुम्ही काळजी करू नका. आम्ही सर्व मदत करू. फक्त तुम्ही स्वत:ला सावरा, असंही त्यांनी सांगितलं.

पावसाळ्यात अनपेक्षित घटना

डोंगरातील लोकांचं पुनर्वसन करणार

गेल्या काही वर्षांपासूनचा हा अनुभव आहे. आक्रित म्हणावं असं आक्रित घडत आहे. पावसाळ्यात अनपेक्षित घटना घडत आहे. त्यामुळे त्यातून शहाणे होण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षापासून चक्रीवादळानेच पावसाळा सुरू होत असल्याचं दिसून येत आहे. अनेक वस्त्या डोंगरदऱ्यात आहेत. त्यांचं पुनर्वसन करण्यात येणार आहे. आम्ही फक्त पुनर्वसनाचा विचार करणार नाही. तर त्याचा आराखडा तयार करणार आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

वॉटर मॅनेजमेंट करणार

जल आराखडा तयार करणार

दरवर्षी मुसळधार पाऊस पडतो. त्याचे प्रमाण आणि परिणाम आपण ठरवू शकत नाही. कुणीही ढगफुटीचा अंदाज वर्तवू शकत नाही. कोल्हापूर आणि सांगलीत प्रचंड पूर आला. धरणाचे गेट सोडण्यात येणार होते. त्यामुळे परिस्थिती नाजूक झाली होती. कोकणातही जोरदार पाऊस पडत असतो. त्यामुळे आम्ही वॉटर मॅनेजमेंट करणार आहोत. जल आराखडा तायर करणार आहोत. अचानक पुराचं पाणी वाढतं आणि होत्याचं नव्हतं होतं. त्यामुळेच हा जल आराखडा तयार करणार आहे, असं ते म्हणाले. महाड, चिपळूण, सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्ये पाणी भरतं. त्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे. अशा दुर्घटना होऊ नये आणि घटना घडल्या तर जीवितहानी होऊ नये म्हणून हे व्यवस्थापन करण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारकडून राज्याला मोठी मदत मिळाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला

तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 38 लोकांचा मृत्यू झाला. 35 घरांवर डोंगराचा कडा कोसळला. त्यामुळे माणसांसह घरेही जमीनदोस्त झाली. घरेच जमीनदोस्त झाल्याने संपूर्ण परिसरात चिखलाचं साम्राज्य झालं होतं. अनेकांचे संसार मातीला मिळाले होते. त्यामुळे आज तळीयेमध्ये पोहोचलेल्या मृतांच्या कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. एनडीआरएफची टीम जसजसा मातीचा ढिगारा उचलायचे तसतसं त्यातून मृतदेह आणि भांडीकुंडी निघायची. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटायचा. त्यामुळे हे विदारकर चित्रं पाहणाऱ्यांचं मन हेलावून जात होतं.

महाडमध्ये काय घडलं?

गेल्या आठवड्याभरापासून महाडमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास महाडच्या तळीये गावात दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. महाड तालुक्यातील तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 घरे दबली गेली. दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून सुरुवातीला 32 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. नंतर मृतांचा आकडा 40 वर पोहोचला. तर 80 ते 85 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.

एवढी मोठी दुर्घटना घडूनही प्रशासनाकडून कोणीही आलेलं नाही, अशी तक्रार इथल्या ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे जखमींवर त्वरित उपचार करावा, अशी मदतीची याचना स्थानिक करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काही तास बाकी वादळापूर्वीची शांतता !

News Desk

“…नाही तर सामुदायिक आत्महत्या करण्याची परवानगी द्या”, MPSC च्या विद्यार्थ्यांचा निर्वाणीचा इशारा

News Desk

तो गाल सोडला अन् ओम पुरीचा गाल पकडला! – गुलाबराव पाटील

Aprna