HW News Marathi
Covid-19

प्रत्येक जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टरांची टास्क फोर्स टीम नेमावी, मुख्यमंत्र्यांचा आदेश

मुंबई | संपूर्ण देश सध्या कोरोनाचा सामना करत आहे. सुरुवातीपासूनच देशात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. त्यामुळे अर्थातच महाराष्ट्र सरकारपुढे मोठे आव्हान आहे. मात्र, दरम्यानच्या काळात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा वेगही बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आला आहे. मात्र, असे असले तरी लॉकडाऊनमध्ये शिथीतला आणल्याने काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज (१९ जून) प्रत्येक जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टरांची टास्क फोर्स टीम नेमण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे, “जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना रुग्णाच्या संपर्कातील लोकांना शक्य तितक्या जलदरित्या शोधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या कामांत अजिबात ढिलाई नको”, अशाही सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

“मुंबई येथे डॉक्टर्सचा टास्क फोर्स आपण स्थापन केला त्याचा चांगला उपयोग झाला. आता प्रत्येक जिल्ह्यात किंवा विभागात असा टास्क फोर्स करणे गरजेचे झाले आहे कारण रुग्ण संख्या वाढत, आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, यामध्ये तेथील जुने जाणते, तज्ज्ञ डॉक्टर्स असावेत आणि त्यांचा मुंबईच्या डॉक्टर्सशी देखील कायम संपर्क असावा. आरोग्य मंत्रालयाकडून उपचार पद्धती, औषधी याबाबत विविध सूचना येत असतात. त्यात बदलही होत असतात त्यादृष्टीने वरिष्ठ डॉक्टर्सचा सहभाग वाढवणे महत्वाचे आहे. वेळेत औषधे मिळाली तर रुग्ण बरे होत आहेत हे कितीतरी प्रकरणात सिद्ध झाले आहे. आपले रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही खूप चांगले आहे. प्रयोगशाळांमधून चाचणीचे अहवाल आता लगेच मिळायला पाहिजेत अशा सूचना असताना काही ठिकाणी ७२ तास लागत असतील तर ती गंभीर बाब आहे”, असे मुख्यमंत्री म्हणाले.

ट्रॅकिंग आणि ट्रेसिंगच्या बाबतीत केंद्राने आणि राज्याने व्यवस्थित मार्गदर्शिका दिल्या आहेत त्याप्रमाणे काम झालेच पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तर आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी देखील यावेळी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. “अधिक गतीने रुग्णांचे संपर्क शोधणे गरजेचे आहे. आता पावसाला सुरुवात झाली असून इतर रोगांमध्येही वाढ होऊ शकते अशा वेळी नॉन कोविड रुग्णांना त्वरित उपचार मिळणे गरजेचे आहे. जिल्ह्यांमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टर्सची देखील टास्क फोर्समध्ये मदत घ्यावी”, असे राजेश टोपे म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘या’ राज्यातून १२०० जणांना झारखंडला नेण्यासाठी पहिली नॉनस्टॉप विशेष ट्रेन रवाना

News Desk

मनसे सर्वेक्षणातून समोर आली टक्केवारी, ७० टक्के लोकांना लॉकडाऊन पूर्णपणे संपावा वाटतो

News Desk

दिलासादायक ! राज्यातील कोरोना रुग्णसंख्या घटली

News Desk