HW News Marathi
Covid-19

आदी(त्य) घोषणा अन् नंतर होमवर्क, सरकारच्या निर्णयावर शेलारांची बोचरी टीका  

मुंबई | अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर महाराष्ट्र सरकार ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा’सोबत झालेल्या बैठकीनंतर महाराष्ट्र सरकारने बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “वारंवार “परिक्षा रद्द” एवढेच जाहीर होतेय. पण ATKT असलेल्यांबद्दल निर्णयाचे काय ? निर्णय कधी याबाबत प्रसिद्धी माध्यमांना कुठलीच सूत्र माहिती देत नाहीत. दिवसागणिक विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता वाढतेय”, असे म्हणत शेलारांनी या निर्णयावरून राज्य सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच यावेळी शेलारांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना देखील अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. “आदी(त्य) घोषणा आणि मग होमवर्क.. म्हणून आता लपून-छपून बैठका घ्याव्या लागतात”, अशी बोचरी टीका आशिष शेलारांनी केली आहे.

“पदवी परिक्षा रद्द मग व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचे काय ? तेही महाराष्ट्राचेच तरुण आहेत ना? मग त्यांना का वाऱ्यावर सोडताय? ATKT असलेल्यांशी सापत्न का वागताय ? एकसंघ निर्णय घ्या. या तर महाराष्ट्र सरकारच्या पळ काढू आणि वेळ काढू भूमिका”, असेही दुसरे ट्विट आशिष शेलारांनी केले आहे. भाजपकडून सुरुवातीपासून अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. ATKT च्या विद्यार्थ्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, यापूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट देखील घेतली होती. दुसरीकडे अंतिम परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला राज्यपालांचा देखील सुरुवातीपासून तीव्र विरोध आहेच. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी अंतिम परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्यपालांनी नाराजी व्यक्त केल्याने संभ्रमही निर्माण झाला होता.

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासोबत महाविकासआघाडी सरकारची बैठक पार पडली. या बैठकीत, ‘बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय रेग्युलेटरी बॉडींना कळवण्याचा निर्णय झाला आहे.’ राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे. यावेळी, राज्यातील महाविकासआघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या बाजूने असल्याचा विश्वासही प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे.“सरकार विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. कोणतीही कायदेशीर अडचण येऊ नये यासाठी आपले सरकार योग्य ती खबरदारी घेत आहे”, असाही विश्वास प्राजक्त तनपुरे यांनी यावेळी दिला. दरम्यान, या निर्णयामुळे आता राज्य सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्याही १० हजारावर पोहोचली

News Desk

चिंता वाढली | देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ३ लाखांच्या पार

News Desk

दिलासादायक! देशात ४४,१११ नवे रुग्ण आढळले, कोरोनामुक्त होणाऱ्यांचीही वाढली संख्या

News Desk