HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रावर टीका करण्यापेक्षा इथल्या मातीचे ऋण फेडले तर बरे होईल! – बाळासाहेब थोरात

मुंबई | महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती चिंताजनक होत असताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निर्लज्ज राजकारण न करण्याचा सल्ला दिला होता. यावरुनच कॉंग्रेसने पियुष गोयल यांना सुनावले आहे. कोरोनाच्या काळात ठाकरे सरकार हे निर्लज्ज राजकारण करत आहे. देशातील सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा महाराष्ट्राला केला जात आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राने ऑक्सिजनची मागणी कमी करावी, असा सल्ला देणारे केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी फटकारले आहे. पियूष गोयल यांनी महाराष्ट्रावर टीका करण्यापेक्षा इथल्या मातीचे ऋण फेडले तर बरे होईल, असे खडे बोल बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतचाना सुनावले आहे.

यावेळी त्यांनी पियूष गोयल यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. पियूष गोयल महाराष्ट्राने ऑक्सिजनची मागणी कमी करावी, असे सांगतात. आम्ही ऑक्सिजनची डिमांड कमी करावी, म्हणजे नक्की काय करावे, हे त्यांनी सांगावे. त्यांच्या वक्तव्याचा अर्थ आम्हाला कळलेला नाही. पियूष गोयल हे महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्यांनी राज्याला ऑक्सिजन कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करायला हवेत, असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले. आम्हाला केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. पण केंद्र सरकार आम्हाला अपेक्षित मदत करत नाही. त्यामुळे केंद्र सरकार अन्याय करत असल्याची भावना असल्याचेही थोरात यांनी सांगितले आहे.

यावेळी बाळासाहेब थोरात यांनी ब्रूक फार्मा कंपनीच्या मालकासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस ठाण्यात जाणे अयोग्य असल्याचे म्हटले. राज्यात सध्या रेमडेसिविर इंजेक्शन्सचा तुटवडा आहे. आम्ही लोकांना मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. निर्यातबंदी झाल्यानंतर रेमडेसिविर इंजेक्शन्स एखाद्या पक्षाला नव्हे तर राज्य सरकारला मिळायला हवी होती. देवेंद्र फडणवीस यांनी रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा महाराष्ट्राला मिळवून देण्यासाठी मदत करायला हवी होती. मात्र, ते फार्मा कंपनीच्या मालकासाठी पोलीस ठाण्यात गेले. ही गोष्ट मला पटलेली नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

काय म्हणाले होते पियूष गोयल?

“उद्धव ठाकरेंनी त्यांचा हा निर्लज्ज राजकारणाचा रोजचा डोस थांबवावा आणि जबाबदारी घ्यावी”, असं ट्वीट पियुष गोयल यांनी केलं आहे. नवाब मलिक यांनी रेमडेसिवीर पुरवठ्यावरून केंद्रावर टीका केल्यानंतर पियुष गोयल यांनी ट्वीट करत राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. “ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून उद्धव ठाकरेंनी चालवलेले प्रकार पाहून दु:ख झालं. केंद्र सरकार देशात जास्तीत जास्त ऑक्सिजनचं उत्पादन व्हावं यासाठी प्रयत्नशील आहे. आपण सध्या आपल्या क्षमतेच्या ११० टक्के ऑक्सिजनची निर्मिती करत असून उद्योग क्षेत्राचा ऑक्सिजन देखील वैद्यकीय वापरासाठी उपलब्ध करून दिला जात आहे”, असं पियुष गोयल म्हणाले.
पुढे त्यांनी असंही म्हटले आहे की, राज्याला (महाराष्ट्राला) सर्वाधिक ऑक्सिजन पुरवला जात असल्याचा दावा केला आहे. “आत्तापर्यंत महाराष्ट्राला देशात सर्वाधिक ऑक्सिजन पुरवण्यात आला आहे. केंद्र सरकार सातत्याने राज्य सरकारांच्या संपर्कात असून त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करत आहे”, असं गोयल म्हणाले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बिहारमधून आलेल्या अधिकाऱ्यांना गृह अलगीकरणात ठेवल्याच्या बातम्यांबाबत वस्तुस्थिती

News Desk

बालभारतीच्या ८ वीच्या पुस्तकात सुखदेव यांच्याऐवजी कुरबान हुसेन यांच्या नावाचा उल्लेख 

News Desk

“महिला मंत्री होऊ शकत नाहीत, त्यांनी मुलांना जन्म द्यावा”, नवीन तालिबानी फतवा

News Desk