HW News Marathi
महाराष्ट्र

आता शरद पवार, संजय राऊत यांची तोंडं शिवली आहेत का? भाजपचा सवाल

मुंबई | दिल्लीत काल (२६ जानेवारी) शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरून आता भाजपकडून राज्यात महाविकासआघाडीला टार्गेट करण्यात येत आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आज (२७ जानेवारी) पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत आणि महाविकासआघाडी सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. तसेच, या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी शरद पवार आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘शेतकरी आंदोलनामध्ये वेगळ्या शक्तींचा वावर आहे हे आम्ही सुरुवातीपासूनच सांगत होतो. आता शरद पवार, संजय राऊत यांची तोंडं का शिवली आहेत? असा सवाल आम्ही करत आहोत. पुरस्कार वापसी आणि त्यांचं समर्थन हीच भूमिका शहरी नक्षलवाद्यांनी घेतली आहे. देशातल्या मोदी विरोधकांनी घेतली आहे. जेएनयूमध्ये बरसी साजरी होते, त्याला विरोध केला तर दिवसेंदिवस आंदोलन केलं जातं. सीएए कायद्याविरोधात आंदोलन केलं जातं. मोदी द्वेषापोटी या देशात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना अराजक आणू पाहात आहे’, असं ते म्हणाले.

“महाराष्ट्रातले शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष दिल्लीतील आंदोलनाच्या हिंसेचं समर्थन करत आहेत. ज्यांनी आंदोलनात हिंसा केली त्यांच्याविरोधात चकार शब्दही काढला जात नाही. उलट महाविकास आघाडीतील नेत्यांकडून माथेफिरुंचं समर्थन केलं गेलं. कुठे फेडणार ही पापं?”, अशी घणाघाती टीका आशिष शेलार यांनी केली आहे. राजकीय सुडापोटी देशात अराजकता पसरवू नका असं म्हणतानाच शरद पवारांकडून माथी भडकविण्याचं काम अपेक्षित नाही, असंही शेलार म्हणाले.

दिल्लीतील हिंसाचारावर शिवसेनेच्या भूमिकेवरही शेलार यांनी निशाणा साधला. “रोज वचवच करणारे संजय राऊत आज देशातील पोलिसांच्या बाजूनं का बोलले नाहीत?”, अशी तोफ आशिष शेलार यांनी डागली आहे. तर जवान आणि पोलिसांच्या बाजूनं शरद पवार यांची सोशल मीडिया पोस्ट का आली नाही?, असा सवालही शेलार यांनी यावेळी उपस्थित केला.

‘शरद पवारांकडून माथी भडकवणं अपेक्षित नाही’

दरम्यान, यावेळी बोलताना आशिष शेलार यांनी शरद पवारांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. ‘दिल्ली पोलीस आणि जवानांनी जो परमोच्च कोटीचा संयम दाखवला, तो त्यांच्या देशभक्तीचा परिचय होता. विरोधकांना गोळीबार हवा होता का? माथी भडकवण्याचं काम शरद पवारांकडून अपेक्षित नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं संयमाची भाषा करू नये. माथेफिरूंचे समर्थक म्हणून काम करू नये’.

‘पोलिसांनी दोषींसोबतच माथेफिरूंचं समर्थ करणाऱ्यांपर्यंतही पोहोचावं. पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालणं हे कोणत्या देशभक्तीत बसतं ते शरद पवार, संजय राऊतांनी स्पष्ट करावं. आंदोलनाला तीव्र रुप देणाऱ्यांची चौकशी व्हायलाच पाहिजे. पण ज्यांनी याचं समर्थन केलं, त्यांचीही चौकशी व्हायला हवी’, असं ते म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याचे आरोग्य जपण्यासाठी शासन कटीबध्द! – डॉ.तानाजी सावंत

Aprna

पाथरूड परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याचा ऊसतोड मजूरांवर हल्ला; 4 मजूर जखमी

News Desk

ठाकरे सरकारमध्ये ‘या’ मंत्र्यांना मिळाले नाही पालकमंत्री पद

News Desk