HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीस सत्ता गेल्यापासून अस्वस्थ, सरकार स्थापन करायला तळमळतायत – एकनाथ खडसे 

मुंबई | विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यातील वाद सगळ्यांना माहित आहेच. दोन्ही नेते एकमेकांवर कायम टीका करताना दिसत असतात. आता पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीस अस्वस्थ आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी ते आजही तळमळत आहेत, अशी कोपरखळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीसांना लगावली आहे. एकनाथ खडसे यांनी आज (७ जून) पत्रकारांशी संवाद साधताना ही कोपरखळी मारली आहे. देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून अस्वस्थ आहेत. सत्तेत आलं पाहिजे म्हणून त्यांनी अजित पवारांसोबत सत्ता स्थापन केली. आजही सरकार स्थापन करण्याची त्यांची तळमळ दिसत आहे, असा चिमटा खडसे यांनी काढला आहे.

विरोधक वाट बघतच राहतील, खडसेंचा टोला

महाविकास आघाडी सरकार जन्माला आल्यापासून हे सरकार पडणार असल्याचं चंद्रकांत पाटील सांगत आहेत. सरकार पडणार असल्याच्या चंद्रकांतदादांनी दोन तारखाही दिल्या. फडणवीसांनीही तारीख निश्चित केली होती. पण काही होत नाही. सरकार काही जात नाही. विरोधक वाट बघत आहेत. ते वाटच बघत राहतील, असा टोला त्यांनी लगावला आहे. खरं सांगायचं तर राज्यातील आघाडी सरकार दिवसे न् दिवस मजबूत होत आहे. भाजपधील आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. नाराजांची संख्या वाढू नये म्हणून आपलं सरकार येणार असं आमदारांना सांगून वेळ मारून नेली जात आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.

चूक मान्य केल्यावरही संधी साधू शकतात – एकनाथ खडसे

अजितदादांसोबत सत्ता स्थापन करणे ही चूक होती असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यावरूनही खडसेंनी त्यांच्यावर टीका केली. फडणवीस अस्वस्थ आहेत. कोणत्याही कारणाने सत्तेत आलं पाहिजे म्हणून त्यांनी अजितदादांसोबत सरकार स्थापन केलं. आता त्यांनी चूक मान्य केली आहे. पण चूक मान्य केल्यानंतरही अजूनही असा प्रसंग आला किंवा एखाद्या पक्षाने त्यांना ऑफर दिली तरी ते सत्ता स्थापन करतील, असा टोला त्यांनी लगावला.

सत्तांतराचे संकेत अन् चर्चांना उधाण

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गेल्या आठवड्यात जळगावच्या दौऱ्यावर होते. यावेळी ते खासदार रक्षा खडसे यांच्या निवासस्थानीही गेले होते. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना राज्यातील सत्तांतराचे संकेत दिले होते. सध्या कोविडचा काळ आहे. आमचं सर्व लक्ष त्याकडे आहे. राजकीय सत्तांतर वगैरेकडे आमचं लक्ष नाही. देणार नाही. एकदा संकट गेलं तर बघू, असं सूचक विधान फडणवीस यांनी केलं होतं. त्यामुळे राज्यात सत्तांतर होण्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शुभमंगल होण्यापूर्वी नवरदेवाचा मृत्यू

News Desk

आरोग्य सुविधेचे ‘पुणे मॉडेल’ राज्यात लोकप्रिय ठरेल! – उपमुख्यमंत्री

Aprna

‘त्या’ विधानावर दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण….!

News Desk