HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या स्थापना का आणि कशी केली होती ?

मुंबई | २०१९ ला महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली. वेगवेगळ्या विचारसरणीचे तीन पक्ष एकत्र आले आणि महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झालं. या सरकारमधील एक महत्वाचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस. आज (१० जून) या राष्ट्रवादी पक्षाला २२ वर्ष पुर्ण होत आहेत. १० जून १९९९ साली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना झाली. आज या पक्षाचा वर्धापन दिन आहे.

राष्ट्रवादी पक्षाची स्थापना कशी झाली ?

साधारण २० वर्षांपूर्वी म्हणजे पक्षाची स्थापना होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोनिया गांधी परदेशी वंशाच्या (इटालियन) आहेत म्हणून त्यांच्याकडे काँग्रेसचे नेतृत्व देण्यास विरोध केला होता. काँग्रेसचे नेतृत्व परदेशी नागरिकाकडे देऊ नये यासाठी शरद पवार यांच्यासह त्यांचे सहकारी पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनी पक्षांतर्गत बंडखोरी करत सोनिया गांधींचा विषय लावून धरला होता आणि थेट सोनिया गांधींनाच आव्हान दिले होते. यानंतर काँग्रेसने शिस्तभंगाची कारवाई करत शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारिख अन्वर यांचे निलंबनही केले होते. काँग्रेसच्या निलंबनानंतर तात्काळ या तिघांनीही मे-जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यावेळी भारतीय समाजवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्यात आले होते.

शरद पवारांनी सोनिया गांधींच्या नेतृत्वाला विरोध करताना त्यांच्या परदेशी नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, खरे कारण शरद पवार यांची महत्वाकांक्षा असल्याचेही त्यावेळी बोललं गेलं होतं. काँग्रेसचे अध्यक्षपद आपल्याकडे येणार नाही, असे लक्षात आल्यानंतरच पवारांनी उघडउघड बंडखोरी करुन सोनिया गांधींच्या नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. हा मुद्दा उपस्थित करण्यात पवारांचे सहकारी तारिक अन्वर हे त्यावेळी आघाडीवर होते, असेही म्हटले गेले होते.

विशेष म्हणजे शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी पक्षाची स्थापना करणाऱ्या पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर या दोन्ही सदस्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ज्या मुद्द्यावर झाली, पुढे त्याच सोनिया गांधींच्या नेतृत्वातील काँग्रेससोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सत्तेत भागीदारी केली. इतकंच नाही तर राज्यासह केंद्रातही राष्ट्रवादीने पाठिंबा दिला. स्वतः शरद पवार काँग्रेसच्या नेतृत्वातील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारमध्ये कृषीमंत्री होते.

त्यामुळे पवारांनी काँग्रेसशी फारकत घेत वेगळी चूल मांडली असली तरी त्याच पक्षांसोबत आजही ते सत्तेत आहेत.शरद पवार हे राज्याच्या राजकारणातलं सगळ्यात अनुभवी नेतृत्व म्हणुन ओळखलं जातं.परंतु राष्ट्रवादीसारखा पक्ष महाराष्ट्रात एकटा सत्तेत कधीच आला नाही आणि आजवर त्यांचा मुख्यमंत्रीही झाला नाही,त्यामुळे २२ वर्षांची राष्ट्रवादीच्या आगामी काळात या दोन महत्वकांक्षा पुर्ण होतात का हे पाहावं लागेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

११ जूनपर्यंत बीड-उस्मानाबाद-लातूर विधानपरिषदेचा निकाल 

News Desk

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी बुथ कमिट्या सक्षम करा ! | नाना पटोले

News Desk

माजी न्यायमूर्ती अभय ठिपसेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश

swarit