HW News Marathi
महाराष्ट्र

“फडणवीसांचा ‘हा’ आरोप हास्यास्पद आहे याबद्दल माझ्या मनात शंका नाही”, आव्हाडांचे प्रत्युत्तर

मुंबई | आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंग आणि त्यामध्ये आलेल्या काही अधिकाऱ्यांच्या नावांसंदर्भात मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केला आहे. मात्र, या अहवालावर विरोधकांनी टीका केली आहे. “हा अहवाल सीताराम कुंटेंनी तयार केलाच नसेल, तो जितेंद्र आव्हाड किंवा नवाब मलिक यांनी तयार केला असावा”, अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

यानंतर आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, अशी शंका घेणं हा सीताराम कुंटेंचा अपमान असल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे. आपल्या ट्वीटर अकाऊंटवर देखील काही ट्वीट्सच्या माध्यमातून आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पोलिसांनंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांचं खच्चीकरण सुरू”

“५ वर्ष ज्यांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं, ज्यांचं कुशाग्र बुद्धीसाठी कौतुक केलं जातं, अशा राजकीय धुरंधरानं राज्याच्या मुख्य सचिवांबद्दल अशी शंका व्यक्त करणं हा त्या मुख्य सचिवांचा, त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीची आणि त्यांच्या आवाक्याचा अपमान आहे. पोलिसांचं तर खच्चीकरण झालं आहे. आता प्रशासकीय अधिकाऱ्यांचं खच्चीकरण करणं सुरू आहे”.

“आता सीताराम कुंटेंबद्दल आमच्या नावाने शंका उपस्थित करून त्यांना काय साध्य करायचंय? पण हे तर आहे की फडणवीसांनी किमान हे तरी मान्य केलं की आव्हाड अहवाल लिहू शकतात”, असं आव्हाड म्हणाले आहेत. “देवेंद्र फडणवीस यांचा हा आरोप हास्यास्पद आहे याबद्दल माझ्या मनात शंका नाही”, असं आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

अहवाल मी नव्हे तर नवाब मलिक यांनी फोडला – फडणवीस

फोन टॅपिंग प्रकरणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोपवण्यात आलेला अहवाल हा राज्याचे मुख्य सचिव असलेल्या सीताराम कुंटे यांनी तयार केलाच नसेल, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस केला. मी सीताराम कुंटे यांना बऱ्याच वर्षांपासून ओळखतो. ते अत्यंत साधे आणि सरळमार्गी अधिकारी आहेत. त्यामुळे हा अहवाल त्यांनी तयार केलाच नसेल, असे मला वाटते. तर जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक यांनी हा अहवाल तयार केला असावा आणि सीताराम कुंटे यांना त्यावर केवळ सही करायला लावली असेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

राज्यातील पोलीस बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल हा मी फोडला नाही. मी या अहवालाचं केवळ कव्हरिंग लेटर वाचलं होतं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी तो अहवाल प्रसारमाध्यमांना उपलब्ध करुन दिला. आता हेच नेते अहवाल फुटल्यामुळे काही अधिकाऱ्यांना मानसिक त्रास होत असल्याचे म्हणत आहेत. पण मी कव्हरिंग लेटर वगळता उर्वरित अहवाल लिफाफाबंद करुन केंद्रीय गृहसचिवांना सादर केला होता.

याउलट नवाब मलिक यांनी या अहवालाची काही पाने प्रसारमाध्यमांना दिली. त्यामुळे तो अहवाल नवाब मलिक यांनीच फोडला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तसेच या अहवालात नमूद करण्यात आल्याप्रमाणेच पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. तत्कालीन पोलीस महासंचालकांनी याप्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी, असे सुचविले होते. मात्र, ही चौकशी कोणाच्या आदेशाने थांबवण्यात आली, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज काय बंद आहे?

News Desk

फडणवीसांनी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मदत मिळवून द्यावी!

News Desk

केंद्राने GSTचे थकीत २८ हजार कोटी तातडीने द्यावे – रोहित पवार

News Desk