HW News Marathi
महाराष्ट्र

निर्बंधांना झुगारून मनसेने दहीहंडी फोडली!

मुंबई | राज्य सरकारने दहीहंडी साजरी करू नका असं सांगितलं होतं, मात्र या निर्णयाला मनसे कार्यकर्ते आणि नेत्यांनी धाब्यावर बसवलं आहे. मुंबईसह ठाण्यात मनसैनिकांनी दहीहंडी जल्लोषात साजरी केली. मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह मुंबई आणि ठाण्यात दहीहंडी साजरी करणाऱ्या काही मनसेसैनिकांची धरपकड करण्यात आली आहे. त्यांच्यावर नौपाडा पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

बाळा नांदगावकर हे काळाचौकी मैदानात आले

मनसे नेते बाळा नांदगावकर हे काळाचौकी मैदानात आले आहेत. या ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार असून मैदानात मनसे सैनिक मोठ्या प्रमाणावर जमले आहेत. तर, पोलिसांनी कितीही नोटिसा पाठवल्या तरी आम्ही दहीहंडी उत्सव साजरा करणारच, असा निर्धार बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला होता. तसेच आम्हाला उत्सव साजरा करू द्या नाही तर आम्ही ठिय्या आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर नांदगावकर यांनी स्वत: दहीहंडी फोडत हा उत्सव साजरा केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांकडून कारवाई

ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दहीहंडी फोडून उत्सव साजरा केला. मनसे विद्यार्थी सेनेने लक्ष्मी पार्क, वर्तकनगर येथे दहीहंडी उभारत चार थराची हंडी फोडली. गोविंदांनी कोरोनाचे निर्बंध झुगारत ही हंडी फोडून मनसेचा झेंडा फडकवला. तर मनसेने नौपाडा येथील कार्यालयासमोर एक थराची हंडी फोडली. मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी ही दहीहंडी फोडली. कृष्ण जन्माष्टमी च्या दिवशी पूजाअर्चा करत मनसेच्या कार्यालयासमोर उभारण्यात आलेली दहीहंडी फोडण्यात आली.

यावेळी पोलिसांनी मज्जाव केला होता. मात्र रितीरिवाजाप्रमाणे कमी उंचीची दहीहंडी बांधून ती फोडण्यात आली. जमावबंदीचे आदेश झुगारून मनसेसैनिकांनी घोषणा देतच दहीहंडी फोडली. त्यामुळे पोलिसांनी मनसे सैनिकांची धरपकड केली. मनसे नेते अविनाश जाधव आणि अभिजीत पानसे पोलिसांना दहीहंडी शांततेत साजरी करू द्यावी म्हणून विनवणी करत होते. मात्र, पोलिसांनी घोषणा देणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे या परिसरात मोठा जमाव जमला होता. या कार्यकर्त्यांवर नौपाडा पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

सण साजरा करण्यासाठी बंदी का?

मनसे हे जे ठरवते ते करते. आम्हाला अनेक ठिकाणवरून फोन आले. उत्तर प्रदेशवरून देखील फोन आले. बाळासाहेबानंतर हिंदूंबाबत कोणी भूमिका घेतली असेल तर ती राज ठाकरे यांनीच. आम्हाला सण साजरा करण्यासाठी बंदी का? बाकी इतर कार्यक्रम होतात, पण सण का होऊ देत नाही? असा सवाल अविनाश जाधव यांनी केला आहे. आम्ही आमचे काम करणार. पोलिसांनी त्यांचे काम करावे. आता देखील काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…म्हणूनच शरद पवार साहेबांना शेतकऱ्यांचे नेते म्हटले जाते”, अजित पवारांनी मोदींना सुनावले 

News Desk

“भाजपनेच राज ठाकरेंचा गेम केला!” – महेश तपासे

News Desk

पर्यावरणाच्या रक्षणासाठी लोकसहभाग महत्त्वाचा! – अजित पवार

Aprna