HW News Marathi
महाराष्ट्र

‘शिवप्रसाद’ दिला आहे, ‘शिवभोजन’ थाळी देण्याची वेळ आणू नका, ‘त्या’ राड्यावरुन संजय राऊतांचा भाजपला इशारा

मुंबई | राम मंदिराच्या मुद्द्यावरून काल (१६ जून) शिवसेना भवनासमोर भाजपाचे कार्यकर्ते आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार राडा झाला होता. त्यानंतर दोन्हीकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, काल शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपाला रोखठोक इशारा दिला आहे. शिवसेना भवन हे महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या अस्मितेचे प्रतीक आहे. त्यावर चाल कराल तर शिवप्रसाद मिळणारच असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

शिवसेना भवनासमोर काल झालेल्या राड्याबाबत प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काल शिवसेना भवनावर चाल करण्याचा प्रयत्न केला. त्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला. शिवसेना भवन ही केवळ राजकीय वास्तू नाही तर ती महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या अस्मितेचे प्रतीक आहे. त्याकडे कुणी वाकड्या नजरेने पाहिले, चाल करून आले तर त्यांना शिवप्रसाद मिळणारच. आता काल मिळालेल्या शिवप्रसादावरच थांबा, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका, आमच्यासाठी हा विषय संपला आहे, असा इशाराच संजय राऊत यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना आणि भाजपाला दिला.

भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काल राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना भवनावर मोर्चा काढला होता. त्यावेळी शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना संजय राऊत यांनी हा इशारा दिला आहे. शिवसेना भवन महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतिक आहे. हुतात्मा चौक जसं आपल्या अस्मितेचं प्रतिक आहे. मराठी माणसाचं केंद्रबिंदू आहे. तुमचे राजकीय मतभेद असू शकतात. पण तसंच शिवसेना भवन मराठी माणसाच्या अस्मितेचं भवन आहे. ती बाळासाहेब ठाकरेंची वास्तू आहे.

शिवसेना भवनावर मोर्चा काढण्याचं कारण काय? तुम्हाला लिहिता वाचता येतं का? तुमचा शिक्षणाशी काही गंध आहे का? तुम्ही सामनाचा अग्रलेख नीट वाचा. जे आरोप झाले ते नीट वाचा. आमचे प्रवक्ते काय म्हणाले ते नीट ऐका. जे आरोप झाले आहेत, त्याची चौकशी करावी. ते आरोप द्वेष बुद्धिने केले असतील तर आरोप करणाऱ्यांना सोडू नका. त्यांच्यावर कारवाई करा, असं अग्रलेखात म्हटलं आहे. त्यावरून तुम्हाला मिरच्या का झोंबल्या?, असा सवाल राऊत यांनी केला.

माहिती विचारणे गुन्हा आहे का?

आम्ही भाजपवर कुठेच थेट आरोप केलेला नाही. हा घोटाळा भाजपने केला असं म्हटलं नाही. राम मंदिरासाठीची ट्रस्ट स्वायत्त आहे. त्यातील सदस्य कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही. तरीही तुम्ही टीका करता, ट्रस्टमध्ये काय भाजपची माणसं आहेत का? ट्रस्टला जर काही प्रश्न विचारले तर त्यांनी त्याचा खुलासा करू नये का? या देशात माहिती विचारणे हा गुन्हा आहे का?; असा सवाल त्यांनी केला. काल हल्ला करणाऱ्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला आहे. मला वाटतं हा विषय प्रसादापर्यंतच मर्यादित राहिला पाहिजे. त्यांनी शिवभोजन देण्याची वेळ आणू नका, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

आरक्षणासाठी राष्ट्रीय धोरण ठरवा

आज खासदार संभाजी छत्रपती आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट होत आहे. ही चांगली गोष्ट आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी, या मताचे हे दोन्ही नेते आहेत. अशी चर्चा झाली पाहिजे. शेवटी चर्चेतूनच मार्ग सुटू शकतो, असं सांगतानाच आरक्षण हा मुद्दा नाजूक आहे. प्रत्येक जात समूह आरक्षण मागत आहे. त्यामुळे आरक्षणाबाबत केंद्र सरकारला राष्ट्रीय धोरण ठरवावं लागेल, अशी मागणीही त्यांनी केली.

काय घ़डलं?

राम मंदिराच्या जमीन खरेदीदरम्यान भ्रष्टाचार करण्यात आल्याची टीका शिवसेनेच्या सामना या मुखपत्रात करण्यात आली होती.त्याचा निषेध म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं सुरू केली. दरम्यान शिवसेना कार्यकर्तेही त्यांच्यासमोर आले. त्यामुळे दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाल्याचं दिसून आलं.आंदोलनादरम्यान शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारीची घटनाही यादरम्यान दिसून आली.विशेष म्हणजे, सत्ताधारी शिवसेनेचं मुख्यालय असलेल्या दादर परिसरातील शिवसेना भवनासमोरच हा सगळा प्रकार घडल्याने त्यामुळे राजकीय तणाव निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गृहनिर्माण संस्था पुनर्विकास योजना लवकरच मार्गी लागणार – प्रवीण दरेकर

News Desk

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे ! – दादाजी भुसे

Aprna

विधानसभा अध्यक्षपदाची निवड हिवाळी अधिवेशनातच !

News Desk