HW News Marathi
महाराष्ट्र

नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंऐवजी दि. बा. पाटीलांचे नाव देण्यासाठी शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर

नवी मुंबई | नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी दृष्टीपथात दिसत नसली तरी नामांतरावरून मात्र वाद निर्माण झाले आहेत. सिडकोच्या माध्यमातून तयार केले जात असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला सरकारने बाळासाहेब ठाकरे नाव दिले आहे. या नामांतराला भाजपने विरोध केला असून स्थानिक प्रकल्पग्रस्त दिवंगत नेत दि बा पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. यासाठी आज (१० जून) मानवी साखळी करून सरकारचा निषेध केला जात आहे.

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव देण्यावर सरकार ठाम आहे. मात्र स्थानिकांना त्याचा विरोध आहे. या विमानतळाला रायगडमधील लोकप्रिय नेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याची कृती समितीची मागणी कायम आहे. याच मागणीसाठी आजपासून मानवी साखळी करुन आंदोलन करण्यात आलं. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या बैठकीत बुधवारी तोडगा निघू शकला नाही. आपल्या मागणीसाठी कृती समितीच्या वतीने ते आज रायगडमध्ये आंदोलन करण्यात आले.

नवी मुंबई विमानतळास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याबाबतचा ठराव सिडकोच्या संचालक मंडळाने १७ एप्रिल रोजी मंजूर केला आहे. या ठरावाला स्थानिकांचा विरोध आहे. सरकारच्या ठरावानुसार राज्यंत्रिमंडळळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देत तो केंद्राला पाठविला जाणार आहे. पण विमानतळाच्या नावावरुन सरकार आणि स्थानिक आमने सामने आलेत.

सिडकोच्या निर्णयाविरोधात आंदोलनाची घोषणा स्थानिकांनी केल्यांतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कृती समितीला चर्चेसाठी बुधवारी (९ जून २०२१ रोजी) पाचारण करण्यात आले होते. त्यावेळी विमानतळास ठाकरे यांचेच नाव देण्याचा निर्णय झाला असून दि.बा. पाटील यांच्याबाबतही सरकारला आदर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितलं.

सरकारचा निर्णय झाला असल्याने दि.बा. पाटील यांच्या नावाबाबतचा अन्य प्रस्ताव द्यावा. सरकार त्याचा नक्की विचार करेल असे सांगत मुख्यमंत्र्यांनी समितीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. विमानतळास दि.बा यांचेच नाव द्यावे अन्यथा आंदोलन छेडले जाईल अशी भूमिका आमदार प्रशांत ठाकूर व अन्य पदाधिकाऱ्यांनी घेतल्याने बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही.

आम्ही भूमिकेवर ठाम असून गुरुवारपासून सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून मानवी साखळी आंदोलन सुरु करण्यात येईल असं ठाकूर यांनी सांगितलेलं. त्याप्रमाणे आजपासून आंदोलन सुरु झालं आहे. या आंदोलनादरम्यान शेकडो आंदोलक आज सकाळी नवी मुंबईमध्ये रस्त्याच्या बाजूला मानवी साखळी करुन घोषणा देत होते.पनवेल- बेलापूर,नवी मुंबई, दिघा, ठाणे आदी ठिकाणी हे मानवी साखळी आंदोलन सुरु करण्यात आलं आहे.

नवी मुंबईत सिडकोच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय विमानतळाची निर्मिती केली जात आहे. मुंबईतील विमानतळावर मर्यादा आल्या असल्याने नवी मुंबईत देशातील सर्वात मोठे पॅसेंजर आणि कार्गो विमानतळ उभारले जात आहे. गेल्या १० वर्षांपासून विमानतळाचे कामकाज रखडले असताना सद्या विमानतळाच्या नामांतरावरून वातावरण तापले आहे.

सिडकोच्या संचालक मंडळात विमानतळाला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव पास करण्यात आला. सिडकोने पास केलेला प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला सिडकोने हिरवा झेंडा दाखवल्यानंतर आता भाजपकडून विरोध सुरू करण्यात आला आहे.

भाजप, आरपीआय आणि आगरीकोळी संघटनांनी दिवंगत प्रकल्पग्रस्त नेते दि बा पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी केली आहे. यासाठी सद्या पोस्टर वॉर नवी मुंबईत रंगले आहे. हायवेवर, टोल नाक्यावर दोन्ही बाजूने पोस्टरबाजी सुरू झाली आहे. दि बा पाटील यांनी आंदोलन केल्यामुळेच जमीनीचा मोबदला शेतकरी वर्गाला मिळाला असल्याने त्यांचे नाव देण्याची मागणी होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Pune Wall Collapse : सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख, तर जखमींना २५ हजार

News Desk

‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा तीन दिवसीय पुणे दौरा,’सिंहगड किल्ल्याला भेट देत किल्ल्याची करणार पाहणी!

News Desk

पहिल्या पावसात पैनगंगेला दुथंडी

swarit