HW News Marathi
महाराष्ट्र

सचिन वाझेंना लक्ष्य केलं जातंय – संजय राऊत

मुंबई | राज्यात सध्या मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण गाजत आहे. आधी अंबानींच्या अँटिलिया घराबाहेर सापडलेली स्कॉर्पिओ कार आणि जिलेटिनच्या कांड्या, त्यानंतर कारचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू आणि आता सचिन वाझेंवर झालेले आरोप आणि त्यांची बदली यावरून राज्याच्या राजकारणात आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील मोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत. मंगळवारी विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं अर्थसंकल्पीय अधिवेशनात या मुद्द्यावरून मोठा गोंधळ घातला. त्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांना सचिन वाझेंची बदली केल्याचं जाहीर करावं लागलं. अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरल्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर शेलक्या शब्दांमध्ये टीका केली आहे. तसेच, सचिन वाझे यांचं देखील कौतुक केलं आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले, “सचिन वाझे हे निष्णात तपास अधिकारी आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी दोन प्रमुख प्रकरणांना हात घातला. अन्वय नाईक हे दडपलेलं प्रकरण वाझेंनी उघडकीस आणलं होतं. संबंधित व्हाईट कॉलर आरोपींना अटक केली. हा देखील अन्वय नाईक कुटुंबीयांना न्यायच झाला. त्याबद्दल विरोधी पक्ष बोलत नाहीत. टीआरपी घोटाळ्यातही त्यांनी कारवाई केली. सचिन वाझेंना लक्ष्य केलं जात आहे. या दोन प्रकरणात त्यांनी आरोपी तुरुंगात टाकले, हा मुद्दा त्यामागे असू शकतो”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“विरोधकांना राजकारण नीट कळलं नाही”

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी विरोधी पक्ष असलेल्या भाजपावर आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील खोचक शब्दांमध्ये टीका केली. “फक्त राजीनामा, बदली हेच विरोधी पक्षांचं काम आहे का? लोकशाहीत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या बरोबरीने एकप्रकारे सरकारच चालवायचं असतं. तुम्हाला जर राजीनामा किंवा बदलीमध्येच समाधान मानायचं असेल, तर महाराष्ट्राचं राजकारण विरोधी पक्षांना नीट कळलेलं नाही”, असं संजय राऊत म्हणाले.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून संजय राऊत यांनी केंद्रात सत्तेत असलेल्या आणि राज्यात विरोधात असलेल्या भाजपावर निशाणा साधला. “अंबानी उद्योगपती असतील, पण सामान्य माणसाच्या जीवाला देखील तेवढीच किंमत आहे. अन्वय नाईक, मोहन डेलकर यांच्या जीवाला किंमत नव्हती का? रोज गाजीपुरच्या सीमेवर १० ते १२ शेतकरी मरत आहेत. तिथेही कुणी स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या तरच गांभीर्य कळणार आहे का?”, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इगोपोटी राज्य सरकारने मेट्रो कारशेडचा निर्णय घेतला -फडणवीस

News Desk

२० जानेवारीपर्यंत ५० % विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालये सुरू करण्याचा विचार – उदय सामंत 

News Desk

राज्य सरकार 2500 नवीन उमेदवारांना लागलीच करणार रुजू!

News Desk