HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराज भेटीची कल्पना नव्हती. संभाजीराजेंची माहिती

पुणे | मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण तापलेलं असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (१४ जून) कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेऊन संवाद साधला. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या अजित पवारांनी आज कोल्हापुरातील नवीन राजवाडा येथे जाऊन शाहू महाराजांची भेट घेत चर्चा केली. अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यात जवळपास एक तास बैठक सुरु होती. दरम्यान मराठा आरक्षणावरुन सध्या आक्रमक असणारे छत्रपती संभाजीराजे यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.

संभाजीराजे यांनी पुण्यात उदयनराजेंची भेट घेऊन मराठा आरक्षणावर चर्चा केली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी भेटीसंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “अजित पवार यांना आशीर्वाद घ्यायचा असेल. त्या भेटीत काय झालं याची माहिती नाही. ही भेट होणार आहे याची मला कल्पना नव्हती. मला राजमहालातून कळवण्यात आलं होतं. पण काही सकारात्मक होत असेल तर स्वागतच आहे”.

अजित पवार भेटीनंतर छत्रपती शाहू महाराज काय म्हणाले?

आमच्यात सर्व गोष्टींमध्ये चर्चा झाली असून अजित पवार यासंबंधी सविस्तर सांगतील असं छत्रपती शाहू महाराजांनी यावेळी सांगितलं. तसंच समाजासाठी जास्तीत जास्त जे चांगलं करता येईल ते करा असं मार्गदर्शन केलं आहे अशी माहिती त्यांनी दिली. “सुप्रीम कोर्टाने निकाल दिला असून त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तो निकाल समजून घेऊन जे शक्य आहे ते सर्व केलं पाहिजे,” असं मराठा आरक्षणावर बोलताना त्यांनी म्हटलं. पुढे ते म्हणाले की, “मराठा आरक्षणाच्या इतर मागण्यांकडे सरकारचं लक्ष असून यापुढेही राहणार आहे. आंदोलनाबाबत आमच्यात कोणती चर्चा झालेली नाही”.

छत्रपती शाहू महाराजांचं मराठा आरक्षणावर मोठं विधान, म्हणाले…

“मराठा समाजाने आता स्वत: सक्षम होऊन आपल्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे,” असंही मत त्यांनी व्यक्त केलं. “सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा ज्यांनी अभ्यास केला नाही त्यांनी तो करणं गरजेचा आहे. त्याचं मराठीत भाषांतर करुन समजून घेतला पाहिजे. तसंच कोर्टाचा अवमान होता कामा नये,” असंही ते म्हणाले. “केंद्र सरकारने जर येथे लक्ष दिलं आणि त्यांना रस असला तर कायद्यात बदल करुनच तुम्हाला पुढचं पाऊल टाकता येईल हे आधीच सांगितलं पाहिजे. कायद्यात काय बसतं हे सांगायला मी काही कायदेपंडित नाही,” असं यावेळी ते म्हणाले. मराठ्यांसाठी जास्तीत करण्यासाठी ठाकरे सरकार सकारात्मक आहे असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. पण जर तुम्ही चंद्र पाहिजे, सूर्य पाहिजे म्हटलं तर कसं आणून देणार अशी विचारणाही यावेळी त्यांनी केली.

अजित पवारांची प्रतिक्रिया

“चहाच्या निमित्ताने मी गेलो होतो त्यामुळे अनेक विषयांवर चर्चा झाली,” अशी माहिती अजित पवारांनी कोल्हापुरात आयोजित बोलताना माहिती दिली. मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने निर्णय़ दिला आहे. मोदींपुढेही हा मुद्दा मांडला होता. आमची काय मागणी होती तेदेखील सांगितलं होतं. आरक्षणाच्या संदर्भात बिल आणून ते मांडून कायदा करावा अशी विनंती केली होती असंही यावेळी ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉकडाऊनपेक्षा राज्यातील मृत्यूदर कसा कमी करता येईल याचे नियोजन करा, मनसेचा सरकारला सल्ला

News Desk

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात इमारतीला आग, कोणतीही जीवीतहानी नाही

News Desk

राज्यातील दांडिया आयोजकांना प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक

Sanjay Jog