HW News Marathi
महाराष्ट्र

ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही, तिथे घाईघाईने कारवाया करणं हा तपास यंत्रणांना छंद!

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. एका एपीआयमुळे महाराष्ट्राचं सरकार अस्थिर होणार नाही. चंद्रशेखर यांचं दिल्लीतील सरकार दोन हवालदारांमुळे कोसळलं होतं, मात्र महाराष्ट्रात तसं काही होणार नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला. ते दिल्लीत बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, “एका एपीआयवरुन काय घडामोडी घडणार? काल (१६ मार्च) याबाबत शरद पवारांनीही सांगितलं आहे. महाराष्ट्राचं सरकार स्थिर आहे. चंद्रशेखर आझादांचं सरकार दोन हवालदारांनी पाडलं होतं. दिल्लीत दारात उभे राहिलेल्या हवालदारांमुळे सरकार कोसळलं होतं. तसं महाराष्ट्रात सरकार अस्थिर झालंय या भ्रमातून बाहेर पडायला हवं”, असा टोलाही यावेळी राऊतांनी लगावला.

पुढे राऊत असंही म्हणाले की, मनसुख हिरेन आणि अंबानींच्या घराबाहेरील तपासाबाबत NIA, ATS तपास करत आहेत. केंद्रीय यंत्रणा तपास करत असताना हस्तक्षेप करण्यात अर्थ नाही. मात्र आमचं तपासावर लक्ष आहे. एखादी व्यक्ती पूर्वी शिवसेना किंवा राजकीय पक्षासी संबंधित असेल तर चुकीचं आहे का? शिवसेना ही बंदी घातलेली संघटना नाही. प्रत्येक मराठी माणूस शिवसेनेशी संबंधित आहे. खातेबदल हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित, कुणाला काय द्यायचं हे ते ठरवतात, पण हे तीन पक्षाचं सरकार आहे. तिन्ही पक्षाचे प्रमुख निर्णय घेतील, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

पुढे राऊत यांनी फडणवीसांवरही निशाणा साधला होता. शार्जील इमाम नावाचे सदगृहस्थ उत्तर प्रदेश सरकारचे. त्यांच्याच राज्यात आराम करत आहेत, योगी सरकारने पकडून महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात द्यावं, असं राऊत म्हणाले. शार्जील इमामवर कोणती कलमं लावावी याचं मार्गदर्शन फडणवीसांनी करावं, विरोधकांनी वकील असावं, त्यांचा वकिली बाणा पाहायला मिळाला. पैलवान चितपट झाला बोट वरती आहे, पण मी हरलो नाही असं देवेंद्र फडणवीस कोणत्या पैलवानाबद्दल म्हणाले, हे त्यांनी सांगावं. जर ते सरकारविषयी बोलत असतील तर सरकार साडेतीन वर्ष चितपट करायला कोणालाही जमणार नाही, असं राऊतांनी नमूद केलं. ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही, तिथे घाईघाईने अशा कारवाया करणं हा तपास यंत्रणांना छंद जडला आहे, असा टोला त्यांनी लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आसारामच्या आश्रमावर मुंढेंची कारवाई

News Desk

“…म्हणूनच तुमची इतकी मस्ती आणि चरबी वाढली”, संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र

Aprna

उपमुख्यमंत्री अजित पवारांची ‘त्या’ प्रकरणी CBI चौकशी करा, भाजपच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर

News Desk