HW News Marathi
देश / विदेश

#SushantSinghRajput | मुंबई पोलिसांच्या तपासावर संजय राऊतांनी व्यक्त केली नाराजी

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचे राजकारण सध्या सर्वत्र सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणाच्या तपासावरून बिहार आणि मुंबई पोलीस तसेच बिहार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात वाद रंगला. दरम्यान, याच प्रकरणाच्या तपासावरून होणाऱ्या राजकारणाच्या आणि आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज (९ ऑगस्ट) ‘सामना’च्या रोखठोक या सदरातून भाष्य केले आहे. यावेळी संजय राऊतांनी हे सूचक विधान केले आहे. “बिहारप्रमाणे काही गुप्तेश्वर पांडे महाराष्ट्र पोलिसांत आहेत व त्यांच्यामुळे अडचणीत भर पडली आहे, असा माझा अंदाज आहे”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यावेळी संजय राऊत यांनी बिहार आणि मुंबई पोलिसांच्या तपासाबाबत देखील अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

संजय राऊत काय म्हणतात ?

  • या प्रकरणात पोलिसांनी यासंदर्भात झीरो एफआयआर दाखल करून तपास सुरू ठेवायला हवा होता, (पण सुशांतच्या नातेवाईकांना तेव्हा कुणाविरुद्धही एफआयआर नोंदवायचा नव्हता व ते कुटुंब सुशांतच्या आत्महत्येनंतर सरळ पाटण्यात पोहोचले.)
  • भारतीय जनता पक्षाने या प्रकरणाचे राजकीय भांडवल करण्याचे ठरवले व मंत्रिमंडळातील तरुण मंत्र्यांचे नाव या प्रकरणाशी जोडून सनसनाटी निर्माण केली. दुसऱया बाजूला दोन इंग्रजी वृत्तवाहिन्या सुपारी घेतल्याप्रमाणे मुख्यमंत्री ठाकरे यांना सुशांतप्रकरणी आव्हान देत राहिल्या. त्यामुळे पोलीस गोंधळले.
  • हे प्रकरण ‘हाय प्रोफाईल’ होत आहे असे दिसून येताच मुंबई पोलिसांतर्फे एक दिवसाआड तपासाबाबत माहिती पत्रकारांसाठी जाहीर करायला हरकत नव्हती. यात कुणी मंत्री किंवा राजकीय व्यक्ती असेल तर पोलीस त्याचेही स्टेटमेंट घेतील, असे सुरुवातीलाच सांगायला हरकत नव्हती.
  • मुंबई पोलिसांनी हा तपास नको तितका जास्त खेचला. सिनेसृष्टीतील सेलिब्रिटीना रोज चौकशीला बोलवायचे व ‘गॉसिप’ला वाव द्यायचा. या प्रकरणाचा वापर सिनेसृष्टीत दहशत निर्माण करण्यासाठी झाला काय ते पाहायला हवे.
  • सुशांतच्या मृत्यूआधी दिनो मोरिया या अभिनेत्याच्या घरी एक पार्टी झाली. या पार्टीभोवती रहस्य निर्माण करून त्याचा संबंध सुशांतच्या मृत्यूशी जोडला गेला. दिनो मोरिया व इतर सिनेनट हे राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मित्रपरिवारातले आहेत व त्यामुळेच आरोपांच्या फैरी मुख्यमंत्री ठाकरे व आदित्य ठाकरेंवर झडत असतील तर ते चूक ठरेल. पुराव्याशिवाय बोलणे व आरोप करणे हे नैतिकतेस धरून नाही. पुरावे आहेत काय? हा पहिला प्रश्न. स्वतः आदित्य ठाकरे यांनी त्याबाबत खुलासा केला. तरीही शंका असतील तर त्यासाठी काही वृत्तवाहिन्यांना हाताशी पकडून बदनामी मोहीम राबवणे हा मार्ग आहे काय?

“या प्रकरणात ज्या बॉलीवूड कलाकारांची नावे येत आहेत त्यातील बहुतेक ‘डी’ ग्रेड मंडळी आहेत. अनेक वर्षे ती पडद्यावर दिसत नाहीत व इतर व्यवसाय करून ते जगत आहेत. यातील काही लोकांचा आदित्य ठाकरे यांच्याशी संपर्क आला म्हणून जे कुणी जमिनीवर काठ्या आपटत असतील तर ते चुकीचे आहे. या प्रकरणात सरकारविरोधी पक्षाने महाराष्ट्रापेक्षा बिहार पोलिसांची बाजू घेणे हा प्रकार धक्कादायक आहे. बिहारप्रमाणे काही गुप्तेश्वर पांडे महाराष्ट्र पोलिसांत आहेत व त्यांच्यामुळे अडचणीत भर पडली हे माझे अनुमान आहे”, असे एक खोचक विधान संजय राऊत यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मला हंगामी अध्यक्षपदाच्या जबादारीतून मुक्त करा – सोनिया गांधी

News Desk

भारतीय लष्करातील महिला कर्नलला ब्लॅकमेल प्रकरणी आयएसआय एजंटला अटक

News Desk

आसाराम वरुन काँग्रेसचा मोदीवर निशाणा

News Desk