HW News Marathi
महाराष्ट्र

आक्रमण म्हणजे अतिरेक ठरु नये, पण…! नाना पटोलेंच्या नियुक्तीनंतर ‘सामना’चे परखड भाष्य

मुंबई । महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांच्या नावाची शुक्रवारी (५ फेब्रुवारी) अधिकृत घोषणा झाली आहे. या घोषणेच्या अवघ्या २४ तासांपूर्वी नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. याच पार्श्वभूमीवर, आता विधानसभा अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती होणार ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असताना शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ने राज्यातील या संपूर्ण स्थितीवर भाष्य केले आहे. “काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद ५ वर्षासाठी दिलं. फक्त एका वर्षात राजीनामा देऊन नव्याने निवडणूक घेण्यासाठी नाही”, असे सामनामध्ये म्हणण्यात आले आहे. काँग्रेसच्या या निर्णयामुळे सरकार, विधानसभा, बहुमताचा आकडा, याबाबत सावध राहण्याचा इशारा देत अशा घटनात्मक पदासाठी पुन्हा पुन्हा निवडणूक टाळण्याचा सल्लाही ‘सामना’मध्ये देण्यात आला आहे.

नाना गेले, नाना आले !

प्रदेशाध्यक्षपदी झालेल्या नियुक्तीसाठी नाना पटोले यांना ‘सामना’मधून शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहेत. “नाना पटोले हे विधानसभा अध्यक्षपदावरुन गेले. पण काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राज्याच्या मुख्य प्रवाहात परत आले. म्हणजे नाना गेले, नाना आले”, असे लिहीत शिवसेनेकडून नाना पटोले यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

शिवसेनेचा नाना पटोलेंना सल्ला

मूळचे आक्रमक असलेल्या नाना पटोलेंना सल्ला देताना ‘सामना’मध्ये लिहिण्यात आले आहे की, “विधानसभा अध्यक्षपदावरुन नानांना मोकळे केले आणि त्यांच्यावर पक्ष संघटनेची धुरा सोपवली गेली आहे, त्याचा अर्थ असा की महाराष्ट्रात काँग्रेसला आक्रमक चेहरा हवा आहे. अर्थात आक्रमण म्हणजे अतिरेक ठरु नये, याचा विचारही काँग्रेसने केला असेल. फटकळपणा ही नाना पटोलेंची ताकद आहे”, असेही ‘सामना’मध्ये म्हणण्यात आले आहे.

बाळासाहेब थोरातांचे कौतुक

नाना पटोले यांना शुभेच्छा देतानाही महाराष्ट्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचेही ‘सामना’तून कौतुक करण्यात आले आहे. “२ वर्षांपूर्वी महाराष्ट्रात काँग्रेसची अवस्था अशी झाली होती, की राज्यात काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारायला कोणी तयार नव्हते. अशावेळी बाळासाहेब थोरातांनी जबाबदारी स्वीकारुन अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळवले, अशा शब्दात थोरातांचे कौतुक करण्यात आले आहे. निदान महाराष्ट्रात तरी काँग्रेसची सुकलेली मुळे बहरु लागली आहेत”, असे ‘सामना’मध्ये म्हणण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विश्वनाथ महाडेश्वर सरांनी माझा विनयभंग केला नाही !

News Desk

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या बाबतीत आज मुख्यमंत्र्यांची MMRDA सोबत बैठक होणार

News Desk

तुमच्याकडे लायक उमेदवार नाहीत का ? रोहित पवारांची भाजप-सेनेवर टीका

News Desk