HW News Marathi
महाराष्ट्र

सहकार्याचा मार्ग नॅरोगेज न राहता ब्रॉडगेज असावा, उद्धव ठाकरेंची नितीन गडकरींना साद

नागपूर | नागपूर येथील नवीन रेल्वे उड्डाणपुलाचा भूमिपूजन सोहळा आज (३१ जुलै) पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे सहकार्याने काम करण्याची भावना व्यक्त केली. तसेच सहकार्याचा हा मार्ग नॅरोगेज न राहता ब्रॉडगेज असावा, अशी सादच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना घातली आहे.

नवीन रेल्वे उड्डाणपुलाच्या भूमिपूजन सोहळ्याला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नागभिडच्या नॅरोगेचं ब्रॉडगेज करण्याबाबतची शासनाची भूमिका मांडली. ही भूमिका मांडत असताना मुख्यमंत्र्यांनी केंद्र आणि राज्याने सहकार्याने काम करण्याची भूमिकाही विशद केली. केंद्र आणि राज्य सरकार नेहमीच एकत्र येऊन कोणतेही राजकीय अडथळे न येऊ देता विकासकामे करत आले आहेत. ही आपली संस्कृती आहे. ती तशीच जपत जाऊ, हा आपला सहकार्याचा मार्ग आहे. तो कुठेही नॅरोगेज न राहता तो सदैव ब्रॉडगेज असावा, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

एकदाच काय ते करू, पण व्यवस्थित करू

राज्यात अतिवृष्टी, वादळ, महापूर आदी संकटे वारंवार येत आहेत. त्यामुळे आपल्याला तात्कालिक काम करून चालणार नाही. काही ठिकाणी परमनंट काम करावे लागतील. पुढचे कित्येक वर्षे कितीही पाऊस पडला तरी त्याला काही बाधा येणार नाही, असं काम केलं पाहिजे. नागभिडचा नॅरोग्रेजचं ब्रॉडगेज करण्याचा प्रस्ताव माझ्याकडे आला होता. तेव्हा शक्यतोवर जिथे जंगल असेल तिथे उन्नत मार्ग केला पाहिजे, अशी सूचना मी केली होती. या ठिकाणी जंगलही तसंच राहील. ते शक्य आहे. पर्यावरणाला बाधा येऊ न देता उन्नत पद्धतीने केलं पाहिजे, असं सांगतानाच काही लोक म्हणतील तुम्हाला बोलायला काय जातं? त्यावर खर्च किती येईल. खर्च जरूर येईल. पण आता आपत्ती आणि त्यातून सावरण्याचा जो खर्च दरवर्षी येतो तो कित्येक पटीत आहे. म्हणून एकदाच काय ते करू, व्यवस्थित करू. म्हणजे पुढे अशी संकटं येणार नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तुमच्या सर्व टेक्नॉलॉजीची मदत हवी

यावेळी त्यांनी गडकरींकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली. नितीनजी, मला तुमची गरज आहे. सध्या जगभर कोरोनाचा संकट आहे. आपला देशही सुटला नाही. आता नैसर्गिक आपत्ती येत आहे. सुरुवातच तौक्ते वादळाने झाली. पूर अतिवृष्टी हे संकट आलं आहे. हे वारंवार घडत आहे. कोसळणाऱ्या दरडी, खचणारे रस्ते, पूर यातून आपण नक्कीच सावरू. तेवढा महाराष्ट्र समर्थ आहे. तुम्ही नवीन टेक्नॉलॉजी आणत आहात. कितीही पाऊस पडला तरी पुढची काही वर्षे त्यावर खड्डा पडणार नाही, असं तुम्ही म्हणाला होतात. आता खड्ड्यांच्या पलिकडे जाऊन रस्तेच्या रस्ते खचत आहेत. तिथे तुमची मदत हवी. या वर्षीचं संकट निभावून नेऊ. पण पुढच्या वर्षी संकट आलं तर…? यावर्षीचा पावसाळा संपला नाही. अजून दोन तीन महिने आहेत. आपले रस्ते घाट खचले, पूल वाहून गेले. मला तुमच्या सर्व टेक्नॉलॉजीची मदत हवी आहे. महाराष्ट्राला गरज आहे. जेणेकरून आता जे काही काम करू एक तर पर्यावरणाला सांभाळून करू. जे काम केलं त्यात मजबुतीकरण कसं करू याची मदत तुमच्याकडून लागेल, असं त्यांनी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“रोज सकाळी उठून कांगावा करु नये”, फडणवीसांचा राऊतांना नाव न घेता सल्ला

News Desk

दसऱ्यानंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार ?

News Desk

नाणार प्रकल्पग्रस्तांनी घेतली अशोक चव्हाणांची भेट

News Desk