HW News Marathi
महाराष्ट्र

“रोज सकाळी उठून कांगावा करु नये”, फडणवीसांचा राऊतांना नाव न घेता सल्ला

मुंबई | राज्यात एकीकडे कोरोनाचा संकट असताना दुसरीकडे राज्याला रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत असल्याची तक्रार सरकारकडून केली जात आहे. या तक्रारीचा समाचार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. आज (२६ एप्रिल) मुंबईत पत्रकारांशी ते संवाद साधत होते. केंद्र सरकारने महाराष्ट्राला रेमडेसिविर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजनचा पुरवठा करताना इतर राज्यांच्या तुलनेत दुप्पट मदत केली आहे. त्यामुळे महाविकासआघाडीमधील बोलघेवड्या नेत्यांनी रोज उठून कांगावा करु नये, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. सध्या लोकं दु:खात आहेत. त्यामुळे त्यांना अशाप्रकारचे राजकारण पसंत पडणार नाही. केंद्र आणि राज्य सरकार आपापल्यापरीने महाराष्ट्राला मदत करत आहेत. त्यामुळे मदत मिळत नसल्याचा कांगावा बंद करावा, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केंद्राकडून राज्याला देण्यात आलेल्या मदतीची माहिती दिली. “केंद्र सरकारकडून रेमडेसिविरचा मोठा साठा महाराष्ट्राला मिळाला आहे. केंद्र सरकारने साडे सतराशे मेट्रिक टन ऑक्सिजन महाराष्ट्राला दिला आहे. जे बोलघेवडे लोक सातत्याने केंद्र सरकारवर बोलतात त्यांना इतकंच सांगू इच्छितो की, इतर राज्यांपेक्षा दुप्पट कोटा केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिला आहे”.

“यासोबत मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर दिले आहेत. आजही हवाई दलाच्या माध्यमातून महाराष्ट्रात इतर गोष्टी पोहोचल्या आहेत. त्यामुळे जे कांगावेखोर आहेत त्यांना माझी विनंती आहे, लोक दु:खात असून केंद्र सरकार मदत करत आहे. केंद्राची राज्याला मदत मिळत असून रोज सकाळी उठून कांगावा करु नये,” अशी अप्रत्यक्ष टीका संजय राऊत यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

“सर्व नागरिकांना लस मोफत देणार, ही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात स्पष्ट केली आहे. यासंदर्भात महाविकासआघाडी मध्ये एकवाक्यता असली पाहिजे. मात्र, एखाद्या राज्याला वाटले की त्यांना मोठ्या संख्येने लसीकरण करायचे आहे तर त्यांना बाजारामध्ये लस उपलब्ध आहे. खासगी आस्थापनांना वाटलं स्वतःचा पैसा खर्च करून लसीकरण करायचे आहे तर ते करू शकतात.

मात्र, आता महाविकासआघाडीच्या मंत्र्यांकडून वेगवेगळी वक्तव्य का केली जात आहेत? आदित्य ठाकरे यांनी ट्विट डिलीट का केले, यावर मला बोलायचे नाही. १ मेपासून आपल्याला लसीकरणाची पद्धत बदलायला हवी. कारण आता मोठ्या संख्येने लोक यात सामील होणार आहेत. त्यामुळे थोडी अव्यवस्था होण्याची शक्यता आहे. गर्दी होण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने त्यासाठी धोरण आखायला हवे”, असे फडणवीस यांनी सांगितले आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

कोरोनाच्या संकटात सुरू असलेल्या राजकारणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांवर टीका केली आहे. सध्या सगळेच या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला साथ द्या. राजकारण करू नका, असं सांगतानाच संकट ही संधी मानून महाविकास आघाडी राजकारण करत नाही, असा टोला संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना विरोधकांवर घणाघाती हल्ला चढवला. सध्या सगळेच संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रसंगी एकमेकांचे दोष काढणं योग्य नाही. मुंबईसह राज्यात कोरोनावर नियंत्रण येत आहे. त्यामुळे राजकारण करण्याची गरज नाही. सर्वांनी एकत्रं येऊन काम करावं. तरच संकटाला तोंड देता येईल. सध्याच्या काळात राजकारण करणं योग्य नाही. राजकारण करण्याची आपली परंपरा नाही आणि सध्याच्या वातावरणात राजकारण करणंही योग्य नाही, असं सांगतानाच महाविकास आघाडी संकट ही संधी मानून कधीच राजकारण करत नाही, असं राऊत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारत स्वतंत्र विचारांचा देश | प्रणव मुखर्जी

News Desk

आता नागपूर विद्यापीठाच्या नव्या अभ्यासक्रमात संघाचा इतिहास

News Desk

तब्लिगीच्या उरलेल्या ५० जणांनी स्वत:हून पुढे या, अन्यथा कारवाई करु

News Desk