HW News Marathi
महाराष्ट्र

Exclusive| रोहित पाटलांची युवक प्रदेशाध्यक्षपदाची भूमिका काय? पुढील ध्येय कोणतं?

मुंबई | नुकत्याच पार पडलेल्या आणि संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत रोहित पाटील यांची नगरपंचायतीवर एकहाती सत्ता आली. रोहित पाटील यांची ही पहिली मोठी निवडणूक होती असून अवघ्या २३ व्या वर्षी त्यांनी या निवडणुकीत विजय मिळवत विरोधकांना धूळ चारली. यानंतर रोहित पाटलांची राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली. यावर रोहित पाटील यांची नेमकी काय भूमिका आहे याविषयी त्यांनी स्वतः माहिती दिली आहे. एच. डब्ल्यू. मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

युवक प्रदेशाध्यक्ष पदाविषयी बोलताना रोहित पाटील म्हणाले, “पक्ष वाढला पाहिजे, पक्षाचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विचार रुजले पाहिजेत, ही भावना माझ्यासह सर्व तरुणांची आहे. परंतु, आबांच्या (आर. आर. पाटील) निधनानंतर मतदारसंघात विस्कळीतपणा आला होता. त्यामुळे त्याची मूठ बांधण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. तसेच पक्षश्रेष्ठी ज्या प्रकारे मार्गदर्शन करतील त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ. पण मतदारसंघात मूठ बांधणं फार महत्त्वाचं आहे ही माझी भावना आहे”, असं पाटील म्हणाले.

गावाकडे शिकलो म्हणून नुकसान झालेलं नाही


रोहित पाटील यांचे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यामुळे मुंबईत कधी आल्यावर इथल्या शाळेंचं आकर्षण वाटलं का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, मुंबई ही आमच्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्टीपुरती मर्यादित होती. आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईत यायचो. घरच्यांनाही कधी आबांकडून फार अपेक्षा ठेवल्या नाहीत. कारण आबा हे सामाजिक कार्यात व्यस्त असायचे. माझे काका घराकडे लक्ष द्यायचे. त्यामुळे आबांना कधी घराकडे लक्ष द्यायची वेळ आली नाही. आम्ही त्यांच्याकडून फार काही अपेक्षा ठेवल्या नाहीत त्यामुळे आबा बाहेर जाऊन लोकांच्या समस्या सोडवू शकले. त्याचबरोबर मी गावाकडे शिकलो याचं शल्य मला अजिबात नाहीये. तसेच गावाकडे शिकल्यामुळे माझ्या आयुष्यात माझं काही नुकसान झालं असंही मला वाटत नाही. आज गावाकडे शिकलेले अनेक युवक परदेशात शिकत आहेत, शास्त्रज्ञ आहेत, आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करत आहेत. त्यामुळे गावाकडे शिकलो म्हणून माझं किंवा माझ्या घरच्यांचं नुकसान झालेलं नाही”, असं ते म्हणाले. तसेच शहरात शिकलो असतो तर परिस्थिती काहीशी वेगळी असती असंही त्यांनी यावेळी म्हंटलं आहे.

दारोदारी फिरलो म्हणून लोकांच्या समस्या समजल्या 

या विजयानंतर पुढचं ध्येय काय असणार यावरही त्यांनी यावेळी भाष्य केलं आहे. पाटील म्हणाले, नगरपंचायतीच्यावेळी मी जेव्हा दारोदारी गेलो. त्यामुळे आज मी तिथल्या कुठल्याही भागात गेलो तरी तिथला प्रश्न, तिथली समस्या काय आहे, हे मी सांगू शकतो. प्रचार करत असताना आम्ही कवठेमहांकाळ मतदारसंघातील प्रत्येक भागातील लोकांच्या अडचणी व समस्या समजून घेतल्या. त्यामुळे जनतेला काय अपेक्षित आहे, शहराचे सुशोभीकरण तसेच महिलांसाठी स्वच्छतागृह व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संस्थांचा विकास करणं यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजेत. काही भागात पाण्याचा प्रश्न आहे. तसेच शेतकऱ्यांचा, विद्यार्थ्यांचा कसा विकास होईल व महिलांना रोजगार देणे या सर्व गोष्टी आमच्या अजेंड्यावर आहेत, असं त्यांनी सांगितलं. तसेच या दृष्टीने काम सुरू केलं असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्लास्टिक बंदी ही लोकचळवळ होणे गरजेचे !

News Desk

‘राज ठाकरेंसोबत युतीची चर्चा नाही, पण…’, देवेंद्र फडणवीस म्हणाले…..

News Desk

खासदार उदयनराजे यांना अटक

News Desk