HW News Marathi
देश / विदेश

पर्रिकर यांच्या निधनाने जननेता, सच्चा देशभक्त हरपला: मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

मुंबई : गोव्याचे मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने विश्वासू, मूल्यांवर निष्ठा असलेले आणि साध्या जीवनशैलीचा पुरस्कार करणारे आश्वासक नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, श्री. पर्रिकर हे सामान्य वाटणारे असामान्य व्यक्तिमत्व होते. जमिनीशी जुळलेले, सामान्यातून तयार झालेले, संघर्षातून उभे राहिलेले मनोहरभाई यांनी अत्यंत प्रामाणिकपणे व सचोटीने आपले संपूर्ण राजकीय आयुष्य व्यतीत केले. दीर्घ आजाराचा सामना करतानाही त्यांनी प्रचंड इच्छाशक्ती व दुर्दम्य आत्मविश्वास यांचा परिचय करुन दिला. हाती घेतलेली सर्व कामे त्याही स्थितीत पूर्ण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. गोव्याच्या राजकारणात त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. गोव्याच्या या सुपूत्राने आव्हानात्मक स्थितीमध्ये राज्याची धुरा सांभाळून गोव्याला देशातच नव्हे तर विदेशातही नावलौकिक मिळवून दिला. म्हणूनच लोकांनी त्यांच्यावर उदंड प्रेम केले.

केंद्रीय संरक्षणमंत्री म्हणूनही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. वेळोवेळी दूरदर्शी आणि कणखर निर्णय घेतले. तसेच संरक्षण खात्याशी संबंधित अनेक प्रलंबित विषय वेगाने मार्गी लावले. अत्यंत सहजतेने वावरणारे आणि कुशल संरक्षणमंत्री म्हणून ते कायम स्मरणात राहतील.

सरळ व निर्भीड स्वभावासोबत अतिशय उच्चशिक्षित असलेल्या पर्रिकरांचा विविध विषयांचा मोठा अभ्यास होता. पर्यावरणविषयक विविध प्रश्नांशी त्यांची अतूट बांधिलकी होती. आपल्या कामांप्रति असलेले त्यांचे समर्पण हे कल्पनेपलीकडचे होते. जननेता व प्रशासक म्हणून ते उजवे ठरले. अवघ्या देशात त्यांची ओळख स्वच्छ प्रतिमेचा राजकीय नेता आणि समर्पित भावनेने काम करणारा सच्चा कार्यकर्ता अशी होती. सदैव कर्तव्यतत्पर राहताना त्यांनी लोकप्रतिनिधी कसा असावा, याचा वस्तूपाठ आपल्या कार्यसंस्कृतीतून घालून दिला होता.

गोवा व महाराष्ट्र या शेजारी राज्यांचा स्नेह जपण्यामध्ये किंबहुना वाढवण्यामध्ये त्यांचे प्रमुख योगदान होते. महाराष्ट्राशी संबंधित संरक्षण खात्याचे प्रश्न सोडविण्यामध्ये त्यांचे मोठे सहकार्य होते. त्यांच्यासमवेत काम करण्याची, संवाद साधण्याची मला वेळोवेळी संधी मिळाली. त्यांच्या निधनाने एक उमदा नेता, सुसंस्कृत व सह्दयी व्यक्ती गमावला आहे, अशा भावनाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जानेवारी ते मार्च महिन्यात लग्न करण्यास बंदी

News Desk

यमुना एक्सप्रेस वेवर गॅस टँकरचा मोठा स्फोट

swarit

ही ममता बॅनर्जींची इमर्जन्सी आहे, आमची नाही !

News Desk