HW News Marathi
देश / विदेश

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नवी दिल्ली | माजी अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे शनिवारी (२४ ऑगस्ट) दिल्लीतील एम्स रुग्णालयात वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले. अरुण जेटली यांच्या निधनाने अत्यंत अभ्यासू, कर्तृत्वान, कर्तबगार नेत्याला देश मुकल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळासह देशभरातून व्यक्त होत आहे. रविवारी (२५ ऑगस्ट) सकाळी ११.१५ च्या सुमारास अरुण जेटली यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानाहून भाजपच्या मुख्यालयात ठेवण्यात आले होते. नुकतेच दिल्लीतील निगमबोध घाट येथे अरुण जेटली यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, भाजप अध्यक्ष अमित शाह, व्यंकय्या नायडू, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते. अरुण जेटली यांच्यावर ९ ऑगस्टपासून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. जेटली यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अरुण जेटली यांना २ महिन्यांपूर्वी काही चाचण्या आणि उपचारांसाठी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. आपल्या प्रकृतीच्या कारणामुळे जेटली यांनी ह्यावर्षी लोकसभा निवडणूक देखील लढविली नव्हती. “नव्या सरकारमध्ये आपल्याला कुठलीही जबाबदारी देऊ नये”, अशी विनंती अरुण जेटली यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली होती.

अरुण जेटली यांचा परिचय

देशाचे माजी अर्थमंत्री व भाजप नेते अरुण जेटली यांचा जन्म २८ डिसेंबर १९५२ रोजी नवी दिल्ली येथे झाला. अरुण जेटली हे भाजपचे एक महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जात होते. अरुण जेटली हे आधी पेशाने वकील, पण त्यानंतर पूर्ण वेळ राजकारणात उरतले. अरुण जेटली यांचे वडिल महाराज किशन जेटली हे प्रख्यात वकील होते. दिल्लीतील सेंट झेव्हियर्स शाळेतून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. तर त्यांनी आपले पदवीचे शिक्षण श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून पूर्ण केले. आपल्या महाविद्यालयीन जीवनात अरुण जेटली हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते होते. १९७४ साली अरुण जेटली दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाचे अध्यक्ष बनले.

अरुण जेटली यांचा राजकीय परिचय

अरुण जेटली यांच्या राजकीय कारकिर्दीला महाविद्यालयापासूनच सुरुवात झाली. अरुण जेटली हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते होते. सुरुवातीच्या काळापासूनच वक्तृत्व आणि वादविवादावर त्यांचे प्रभुत्व होते. दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाचे ते अध्यक्ष बनले आणि त्यांचा राजकारणाचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. आणीबाणीच्या काळात अरुण जेटली यांना अटक करण्यात आली होती. जेटली यांना अंबाला येथील तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्यानंतर तेथून हलवून तिहारच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. आणीबाणीनंतर ते पुन्हा राजकारणात जोमाने काम करू लागले. १९७७ साली त्यांची अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.

अरुण जेटली हे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात ते काम पाहत. १९९० साली ते दिल्ली उच्च न्यायालयाचे वरिष्ठ विधीज्ञ म्हणून निवडले गेले होते. कायद्याच्या क्षेत्रातील त्यांचे ज्ञान आणि अनुभव पाहून १९९८ साली संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेला जाणाऱ्या शिष्टमंडळात त्यांची निवड झाली होती. १३ ऑक्टोबर १९९९ रोजी त्यांची नियुक्ती अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात करण्यात आली. त्यांच्याकडे तंत्रज्ञान आणि प्रसारण या मंत्रालयाचा पदभार सोपवण्यात आले. २००९ ते २०१४ या काळात त्यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून काम केले. मे २०१४ पासून ते नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संसदरत्न पुरस्कार ४ वेळा प्राप्त करणारे काँग्रेसचे खासदार राजीव सातव!

News Desk

भीमा-कोरेगाव, ‘एल्गार’ परिषदेचा संबंध नाही !

swarit

Air India : आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय विमानांचे ऑनलाईन बुकिंग सुरु

News Desk