रायपूर | राजस्थान विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगाल आली आहे. निवडणुकीच्या पाश्वभुमीवर काँग्रेसकडून गुरुवारी(२९ नोव्हेंबर) जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात जवळपास ४०० घोषणांचा समावेश करण्यात आला आहे. यात राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यानंतर अवघ्या दहा दिवसांत शेतकर्यांची कर्जमाफी, वृद्ध शेतकर्यांना पेन्शन, महिलांना आजन्म मोफत शिक्षण अशा घोषणा करण्यात आल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत, प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध झाला.
यावेळी सचिन पायलट म्हणाले, “हा केवळ जाहीरनामा नाही, तर आमचे वचनपत्र आहे.” आमचे सरकार पाच वर्षांमध्ये जाहीरनाम्यातील सर्व आश्वासनांची पूर्तता करणार आहे. रोजगाराची समस्या लक्षात घेता अभ्यासक्रमात नवे बदल केले जाणार आहेत. यासाठी महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये पदवीसोबत नोकरी मिळवून देतील अशा अभ्यासक्रमांचा समावेश केला जाईल. कमी व्याजदरात शेतकर्यांना कर्ज दिले जाईल. सरकारी कागदपत्रे केवळ ३० दिवसांमध्ये उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.
दोन दिवसांपूर्वीच भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये गतवेळच्या जाहीरनाम्यातील घोषणांची ९५ टक्के पूर्तता करण्यात आल्याचा दावा केला आहे. शिवाय, बेरोजगार तरुणांना महिन्याला ५ हजार रुपये भत्ता देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच आम्ही हा भत्ता देण्याची सांगितले होते. भाजपने आमचीच घोषणा चोरून तिचा जाहीरनाम्यात समावेश केला आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.