HW News Marathi
राजकारण

तुम्हाला लहान म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबू नका !

मुंबई | राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तास्थापनेवरून सध्या महायुतीचे दोन मोठे पक्ष असलेल्या भाजप-शिवसेनेतच मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमच्या विजयी आमदारांसोबतच्या बैठकीनंतर सत्तास्थापनेबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. ज्यात शिवसेनेने भाजपवर काहीसा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, शिवसेना पहिल्यापासून मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही राहिलेली आहे. निकालानंतर राज्यतील शिवसेनेची वाढलेली बार्गेनिंग पॉवर पाहता आता शिवसेनेकडूनच नव्हे तर काँग्रेसकडून देखील आदित्य ठाकरेंना “ही संधी न दवडण्याचा” सल्ला दिला जात आहे.

युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना “ही संधी दवडू नका, राजकारणात आलेली वेळ पुन्हा येत नाही”, असे म्हणत सल्ला दिला आहे. सत्यजित तांबे यांनी आपल्या “अडीच-अडीच वर्षच्या निमित्ताने” या शीर्षकाखाली लिहिलेल्या फेसबुक पोस्टद्वारे आदित्य ठाकरे यांना हा सल्ला दिला आहे. “राजकारणात आलेली वेळ परत येत नाही. संधीही पुन्हा दरवाजा ठोठावेलंच याची खात्री नाही. म्हणून एक मित्र म्हणून एवढाच सल्ला आहे, जे मिळवायचे आहे ते आत्ताच मिळवा, कुणावरही विसंबून राहू नका. लहान म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबू नका, एवढीच विनंती”, असे सत्यजित तांबे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. याचसोबत सत्यजित तांबे यांनी आपला अनुभव देखील शेअर केला आहे.

काय आहे सत्यजित तांबेंची फेसबुक पोस्ट ?

अडीच-अडीच वर्षांच्या निमित्ताने…

प्रिय आदित्यजी,

2007 सालची गोष्ट आहे. माझेही वय 24 चं होते. अहमदनगर जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत मी काँग्रेसचा जिल्हापरिषद सदस्य म्हणून निवडून आलो होतो. जिल्हा परिषदेत कॉंग्रेसचे बहुमत झाले होते. बहुतांशी सदस्यांची इच्छा मी ‘अध्यक्ष’ व्हावा ही होती. मात्र जिल्ह्यातील काही नेत्यांना कुणाला तरी दुसऱ्यांना अध्यक्ष करायचे होते. बऱ्याच ओढाताणी नंतर सव्वा- सव्वा वर्षे अध्यक्षपद वाटण्याचे ठरले.

मी पहिले सव्वा वर्ष मागितले, मात्र सर्वजण मी लहान असल्याने दुसऱ्या सदस्याला पहिले अध्यक्ष करण्याच्या मनस्थितीत होते. सर्वांचे म्हणणे होते, ‘सत्यजीतला, थोडा अनुभव मिळेल व तो सव्वा वर्षांने चांगले काम करेल’. पुढे सर्व जिल्हा मला ‘भावी अध्यक्ष’ म्हणून लागला. बोलता बोलता सव्वा वर्ष संपलं, ज्यांना अध्यक्ष केलं होतं त्या काही केल्या राजीनामा घ्यायला तयार नाही झाल्या.

पुढे अडीच वर्षाने पुन्हा जिल्हापरिषद अध्यक्षाची निवडणूक झाली. पुन्हा काँग्रेस पक्षाने मला अधिकृत उमेदवारी दिली, पुन्हा काहीतरी कारण सांगून त्याच विद्यमान अध्यक्षांनी सेना-भाजपच्या मदतीने माझा पराभव केला.

हे सर्व सांगण्याचा खटाटोप ह्यासाठी की, राजकारणात आलेली वेळ परत येत नाही. संधीही पुन्हा दरवाजा ठोठावेलंच याची खात्री नाही. म्हणून एक मित्र म्हणून एवढाच सल्ला आहे, जे मिळवायचे आहे ते आत्ताच मिळवा, कुणावरही विसंबून राहू नका. लहान म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबू नका, एवढीच विनंती.

आपलाच,

सत्यजीत तांबे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतीय सैन्याचे रक्त लागलेली पाकिस्तानची साखर कशी खायची

Adil

काँग्रेसने शेतकऱ्यांना बरबाद केले, पंतप्रधान मोदींची जहरी टीका

News Desk

अग्निशमन केंद्राच्या जागेवर सहकारमंत्र्यांचा बंगला

News Desk