HW News Marathi
राजकारण

राज्यात निवडणुकीदरम्यान ‘या’ घटनांमळे निर्माण झाला तणाव

मुंबई | राज्यात सोमवारी (२१ ऑक्टोबर) १४ व्या विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर, आज (२४ ऑक्टोबर) अखेर बहुप्रतीक्षित अशा या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. राज्यात कोणाची सत्ता येणार, राज्याच्या जनतेचा कौल कोणाला मिळणार आणि कोणाला या राज्यातली जनता नाकारणार हे आता थोड्याच वेळात स्पष्ट होईल. दरम्यान याच पार्श्वभूमीवर, या निवडणुकीच्या संपूर्ण प्रचाराच्या दिवसांदरम्यान त्याचप्रमाणे मतदानाच्या दिवशी देखील काही तणाव निर्माण करणाऱ्या घटना घडल्या. त्याबाबत थोडक्यात जाणून घेऊया

हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर अज्ञातांचा हल्ला

हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे लोकसभेत शिवसेना उमेदवार चंद्रकांत खैरेंचा पराभव झाल्याचे मानले जाते. “कन्नडमधील एक विश्वासघातकी… ज्याने भगवा उतरविण्यामध्ये हिरव्याची साथ दिली होती, त्याला आता अजिबात माफी नाही. चुकतोय, लहान म्हणून मी चुका पोटात घालत होतो. पण, भगव्याशी हरामखोरी मी सहन करू शकत नाही”, अशी जहरी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना मात्र हर्षवर्धन जाधव यांची जीभ चांगलीच घसरली. “तुम्हाला जर मुसलमानांबद्दल एवढं वावडं आहे तर मग अब्दुल सत्तार तुमच्या आईचा नवरा लागतो का ?”,असे म्हणत हर्षवर्धन यांनी यांनी उद्धव ठाकरेंवर अत्यंत खालच्या पातळीची टीका केली. त्यानंतर, बुधवारी (१६ ऑक्टोबर) जाधव यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना समोर आली. शिवसैनिकांनीच हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी यावेळी केला.

ओमराजे निंबाळकर यांच्यावर अज्ञात तरुणाकडून चाकू हल्ला

राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आलेली असताना उस्मानाबादमध्ये एक मोठी घटना घडली. शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर एका अज्ञात तरुणाकडून चाकू हल्ला झाल्याची घटन घडली आहे. मात्र, सुदैवाने या हल्ल्यात निंबाळकर दुखापत झाली नाही. कळंब तालुक्यातील नायगाव पाडोळी गावातील ही घटना घडली आहे. या गावातील प्रचारसभेत तरुणाकडून चाकू हल्ला करण्यात आला. उस्मानाबाद कळंब तालुक्यातील शिवसेनेचे कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ ओमराजे निंबाळकर हे नायगाव पाडोळी गावात गेले होते. त्यावेळी ओमराजे निंबाळकर यांच्यावर अजिंक्य टेकाळे या युवकाने चाकूहल्ला केल्याची माहिती मिळाली.

जालन्यात मतदानादिवशी सरपंच-उपसरपंचांच्या गटात हाणामारी

राज्यात सोमवारी (२१ ऑक्टोबर) १४ व्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यादिवशी जालना येथे मतदानावेळी सरपंच आणि उपसरपंचात चांगलाच राडा झाला. बदनापूर मतदारसंघातल्या जांभखेडमध्ये सरपंच इब्राहीम कुरेशी हे भाजपचे आहेत. तर उपसरपंच फजल कुरेशी हे राष्ट्रवादीचे आहेत. मतदार गाडीत बसवून आणल्याने दोन्ही सरपंचाच्या गटात आधी वाद झाला. त्यानंतर त्या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यामुळे वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. त्यानंतर मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

मतदानादिवशी एमआयएम-राष्ट्रवादीमध्ये हाणामारी

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील व मध्य मतदारसंघातील राष्ट्रवादी-कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार कादीर मौलाना यांच्यात बोगस मतदानावरून औरंगाबादमधील कटगेट भागातील बुथजवळ हाणामारी झाल्याची घटना यंदाच्या विधानसभेकरिता झालेल्या मतदानादिवशी म्हणजेच सोमवारी (२१ ऑक्टोबर) सायंकाळी ५ च्या सुमारास घडली. या प्रकारामुळे कटकटगेट भागात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. यावेळी, इम्तियाज जलील यांना देखील धक्काबुकी झाल्याची माहिती मिळत होती. त्यानंतर मात्र आपल्याला धक्काबुक्की झालेली नसल्याचे इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले.

बीडमध्ये मतदानादिवशी बोगस मतदानावरून संदीप क्षीरसागर आक्रमक

विधानसभेसाठी राज्यभरात झालेला मतदान प्रक्रियेच्या दिवशी सोमवारी (२१ ऑक्टोबर) बीड शहरातील एका मतदान केंद्रावर गोंधळ झाला. राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी बोगस मतदानाचा आरोप करत गोंधळ घातला. बीडमध्ये बोगस मतदानाचा आरोप करत संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. बीडमध्ये काकाविरुद्ध पुतण्या अशी लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान, मतदानादिवशी झालेला हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर संदीप क्षीरसागर यांनी “आपले काका जयदत्त क्षीरसागर यांना पराभव समोर दिसू लागल्याने पैसे वाटप केले जात आहे”, असे गंभीर आरोप केला. त्याचप्रमाणे, पैसे वाटणाऱ्या आणि घेणाऱ्यांवर कारवाईची मागणी देखील यावेळी करण्यात आली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शपथविधी सोहळ्यापूर्वी मोदींनी महात्मा गांधी, वाजपेयींच्या स्मृतीस्थळाला केले अभिवादन

News Desk

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

News Desk

अशोक चव्हाण २ मे रोजी नाणारच्या दौ-यावर

News Desk