HW News Marathi
राजकारण

हिंदुस्थानातील विषमतेचे भयाण वास्तव ‘ऑक्सफॅम’च्या अहवालाने जगजाहीर !

मुंबई | एक टक्का गर्भश्रीमंतांकडे देशातील निम्म्याहून अधिक संपत्ती आणि उर्वरित देशातील गरीबांच्या घरात मात्र अठराविश्वे दारिद्रय़ हे हिंदुस्थानातील विषमतेचे भयाण वास्तव ‘ऑक्सफॅम’च्या अहवालाने जगजाहीर केले. हिंदुस्थानच्या समस्त जनतेने या अहवालावरून राज्यकर्त्यांना गदागदा हलवून एवढी भयंकर विषमता का? हा एका ओळीचा प्रश्न विचारायलाच हवा. ‘अच्छे दिन’ व ‘सबका साथ सबका विकास’ सारख्या घोषणा या अहवालासमोर पालापाचोळ्यासारख्या उडून जातात आणि राजशकट फक्त एक टक्का धनाढ्यांसाठीच हाकला जात आहे काय, हे प्रश्नचिन्ह उभे राहते ते वेगळेच!, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर निशाणा साधला.

सामनाचे आजचे संपादकीय

एक टक्का गर्भश्रीमंतांकडे देशातील निम्म्याहून अधिक संपत्ती आणि उर्वरित देशातील गरीबांच्या घरात मात्र अठराविश्वे दारिद्रय़ हे हिंदुस्थानातील विषमतेचे भयाण वास्तव ‘ऑक्सफॅम’च्या अहवालाने जगजाहीर केले. हिंदुस्थानच्या समस्त जनतेने या अहवालावरून राज्यकर्त्यांना गदागदा हलवून एवढी भयंकर विषमता का? हा एका ओळीचा प्रश्न विचारायलाच हवा. ‘अच्छे दिन’ व ‘सबका साथ सबका विकास’ सारख्या घोषणा या अहवालासमोर पालापाचोळ्यासारख्या उडून जातात आणि राजशकट फक्त एक टक्का धनाढ्यांसाठीच हाकला जात आहे काय, हे प्रश्नचिन्ह उभे राहते ते वेगळेच!

हिंदुस्थान लवकरच आर्थिक महासत्ता होणार, अशी अफवा अधूनमधून पसरवली जात असते. केंद्रातील सरकार कुठल्याही पक्षाचे असले तरी आर्थिक क्षेत्रात देशाचा आलेख कसा झपाट्याने वाढतो आहे, असे बेटकुळ्या फुगवून सांगण्याची आपल्या देशात प्रथाच पडली आहे. या तथाकथित आर्थिक भरारीची कुठलीही फळे पदरात पडत नसल्यामुळे देशातील जनता मात्र असे फुसके आपटी बार फोडणाऱ्यांवर तीळमात्र विश्वास ठेवत नाही, हेही तितकेच खरे! आर्थिक विकासाचे आणि देशाच्या सर्वांगीण प्रगतीचे कितीही ढोल राज्यकर्ते बडवत असले तरी सत्य परिस्थिती मात्र नेमकी विपरीत आहे. ‘ऑक्सफॅम’ या आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिष्ठाप्राप्त संस्थेने जाहीर केलेल्या वार्षिक अहवालाने ‘सबका विकास’ या दाव्याची पुरती पोलखोल झाली आहे. हिंदुस्थानातील गरीब आणि श्रीमंत यांच्यातील विषमतेची दरी झपाट्याने वाढत असल्याचे भयंकर वास्तव जगासमोर ठेवणाऱ्या या अहवालातील नोंदी प्रत्येक संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणाऱ्या आहेत. एकूणच जगाचे आणि हिंदुस्थानचेही नेमके चित्र मांडणाऱ्या या अहवालातून श्रीमंत आणि गरीब यांच्याविषयी जळजळीत वास्तव समोर आले आहे. हिंदुस्थानातील एकूण संपत्तीपैकी 51.53 टक्के इतका वाटा केवळ 1 टक्का लोकांकडे आहे. देशातील 10 टक्के लोकांकडे हिंदुस्थानातील एकूण संपत्तीच्या 77.4 टक्के हिस्सा आहे, असे हा अहवाल सांगतो. याचा सरळ सरळ अर्थ असा की, देशातील अवघ्या एक टक्का धनाढ्य लोकांच्या तिजोरीत

देशातील निम्म्याहून अधिक संपत्ती

पडून आहे. ही चक्रावून टाकणारी विषमता इथेच थांबत नाही. जो एक टक्का अतिश्रीमंत वर्ग आहे त्यांच्या संपत्तीमध्ये मागच्या वर्षभरात दररोज 2 हजार 200 कोटी रुपयांची भर पडली. त्यामुळे वर्षभरात हिंदुस्थानातील हे ‘कुबेर’ 39 टक्क्यांनी आणखी श्रीमंत झाले. याउलट आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या जनतेच्या संपत्तीमध्ये मात्र केवळ 3 टक्क्यांची वाढ झाली, असे ‘ऑक्सफॅम’ने म्हटले आहे. एका बाजूला एक टक्का धनवान आणि दुसऱ्या बाजूला दोनवेळच्या जेवणाची भ्रांत असलेली गोरगरीब जनता अशी ही कमालीची विषमता आहे. गावखेड्यांत राहणाऱ्या, वाड्या-तांड्यांवर जगणाऱ्या आणि शहरी झोपडपट्ट्यांत आयुष्य कंठणाऱ्या सामान्य गरीब जनतेला भाकरीसाठी तर संघर्ष करावा लागतोच, पण आजारपण आणि त्यासाठी करावे लागणारे औषधोपचार यासाठीही अतोनात कसरत करावी लागते. एक टक्का लोकांकडे असलेले प्रचंड डबोले, 26 टक्के श्रीमंतांकडे असलेला अफाट पैसा आणि त्याच देशातील उर्वरित जनतेची अन्नानदशा अशी पराकोटीची दरी देशात निर्माण झालेली असतानाही जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असल्याचा टेंभा आपण मिरवतो. ‘ऑक्सफॅम इंटरनॅशनल’ने नेमके त्यावरच बोट ठेवले आहे. ‘एकीकडे एक टक्का धनाढ्य आणि दुसरीकडे उर्वरित गरीब जनता ही भयंकर विषमता हिंदुस्थानची सामाजिक रचना आणि लोकशाहीचा पाया ठिसूळ करणारी आहे’

असा इशाराचऑक्सफॅमने

आपल्या अहवालातून दिला आहे. ‘लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोककल्याणकारी राज्य म्हणजे लोकशाही’ ही पुस्तकी व्याख्या अखेर कागदावरच राहिली आणि मूठभर लोकांनी मूठभर लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही, अशी विद्रूप व्याख्या राज्यकर्त्यांनी रूढ केली हाच त्याचा अर्थ. जागतिक आर्थिक परिषदेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी जगभरातील अर्थव्यवस्थांचा अभ्यास करून गरीब आणि श्रीमंत यांच्यातील विषमतेवर ‘ऑक्सफॅम’ ही संस्था अहवाल सादर करत असते. यापूर्वी सादर झालेल्या अहवालांतूनही ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ वर्गांतील विषमतेची ही दरी वारंवार समोर आली. मात्र ही विषमता कमी करण्याच्या दृष्टीने गरीबांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी ठोस उपाययोजनाही होताना दिसत नाही. त्यामुळेच विषमतेची ही दरी कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढते आहे. हिंदुस्थानातील शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार आणि निम्न मध्यमवर्गीयांच्या आत्महत्यांचे मूळदेखील या विषमतेमध्येच दडले आहे. एक टक्का गर्भश्रीमंतांकडे देशातील निम्म्याहून अधिक संपत्ती आणि उर्वरित देशातील गरीबांच्या घरात मात्र अठराविश्वे दारिद्रय़ हे हिंदुस्थानातील विषमतेचे भयाण वास्तव ‘ऑक्सफॅम’च्या अहवालाने जगजाहीर केले. हिंदुस्थानच्या समस्त जनतेने या अहवालावरून राज्यकर्त्यांना गदागदा हलवून एवढी भयंकर विषमता का? हा एका ओळीचा प्रश्न विचारायलाच हवा. ‘अच्छे दिन’ व ‘सबका साथ सबका विकास’ सारख्या घोषणा या अहवालासमोर पालापाचोळ्यासारख्या उडून जातात आणि राजशकट फक्त एक टक्का धनाढ्यांसाठीच हाकला जात आहे काय, हे प्रश्नचिन्ह उभे राहते ते वेगळेच!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी पोलीस आयुक्त अरुप पटनायकांची राजकारणात एन्ट्री

News Desk

हिंगोलीमध्ये भाजप-एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

News Desk

#MeToo : परराष्ट्र मंत्री एम.जे.अकबर यांनी दिला राजीनामा

News Desk