HW News Marathi
राजकारण

मी शीख समाजात जन्माला आले हीच माझी चूक होती का ?

मुंबई | ‘भगवान के घर देर है, अंधेर नहीं’ असे म्हणतात. इंदिरा गांधी हत्येनंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलीतील गुन्हेगारांना 34 वर्षांनंतर शिक्षा ठोठावली गेली आहे. दिल्ली छावणीतील राजनगर पालम भागात 1 नोव्हेंबर 1984 रोजी पाच शिखांची हत्या करण्यात आली होती. त्याच हत्येशी संबंधित खटल्याचा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी दिला आणि एकेकाळचे दिल्लीतील वजनदार काँग्रेस नेते माजी खासदार सज्जनकुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ‘‘माझी चूक काय होती? मी शीख समाजात जन्माला आले हीच माझी चूक होती का? माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते तर माझा भाऊ सैन्यात होता.’’ त्यांचे निवेदन महत्त्वाचे आहे. शीख समाजाने या दंगलीसाठी काँगेसला माफ केलेले नाही, पण आज पंजाबात काँग्रेसचे पूर्ण बहुमताचे राज्य आहे हेसुद्धा लक्षात घेतले पाहिजे. तरीही सज्जनकुमार आणि इतरांना दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावलेली जन्मठेप ही 1984 च्या दंगलीने शीख समाजाला दिलेल्या भळभळणाऱया जखमेवर फुंकर घालणारीच म्हणावी लागेल, अशा शब्दातून सामनाच्या संपादकीयमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शीख दंगल प्रकरणाबाब दिल्ली उच्च न्यायालायच्या निकालाचे स्वागत केले आहे.

सामनाचे आजचे संपादकीय

सज्जनकुमार यांच्या मानगुटीवरदेखील शीख दंगलीचे भूत कायम राहिले. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीवरही काही वेळा संक्रांत आली. खुद्द काँग्रेस पक्षाने आणि माजी पंतप्रधान सरदार मनमोहन सिंग यांनी शीख समाजाची माफी मागितली, पण ज्यांनी आपली रक्ताची नाती गमावली ते न्यायासाठी कायदेशीर लढाई लढत राहिले. जगदीश कौर या त्यांपैकीच एक. त्यांनी त्यांचा कायदेशीर लढा जिवंत ठेवला.

‘भगवान के घर देर है, अंधेर नहीं’ असे म्हणतात. इंदिरा गांधी हत्येनंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलीतील गुन्हेगारांना 34 वर्षांनंतर शिक्षा ठोठावली गेली आहे. दिल्ली छावणीतील राजनगर पालम भागात 1 नोव्हेंबर 1984 रोजी पाच शिखांची हत्या करण्यात आली होती. त्याच हत्येशी संबंधित खटल्याचा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी दिला आणि एकेकाळचे दिल्लीतील वजनदार काँग्रेस नेते, माजी खासदार सज्जनकुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कनिष्ठ न्यायालयाने सज्जनकुमार यांना दोषमुक्त केले होते. या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्याचाच निकाल आता लागला आहे. सज्जनकुमार यांच्याशिवाय अन्य तिघांनाही जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली असून दोघांची शिक्षा तीन वर्षांवरून 10 वर्षांपर्यंत वाढविण्यात आली आहे. तीन राज्यांतील काँग्रेसच्या विजयाच्या आनंदावर विरजण टाकणारा हा निकाल आहे व याचे राजकीय पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत. 1984 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकाने हत्या केली. हे दोन्ही अंगरक्षक शीख समाजाचे होते. त्यामुळे दिल्लीतील काँग्रेस कार्यकर्ते व पुढारी रस्त्यावर उतरून शिखांवर हल्ले करीत होते. शिखांची घरे जाळली गेली, त्यांची दुकाने नष्ट करण्यात आली, अनेकांना जिवंत जाळण्यात आले. गोध्राकांडानंतर अहमदाबादमध्ये ज्या प्रकारचा उद्रेक उसळून

रक्तपात झाला

तसाच रक्तपात दिल्लीच्या रस्त्यांवर 1984 साली झाला. इंदिरा गांधी यांच्या हत्येस संपूर्ण शीख समाज जबाबदार आहे अशा माथेफिरू विचाराने काँग्रेसचे ‘तरुण तुर्क’ रस्त्यावर उतरले होते. राजीव गांधी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेऊन काही तास उलटले, पण दंगे शांत होत नव्हते. पुन्हा यावर राजीव गांधी यांचे निवेदन असे होते की, ‘मोठा वृक्ष कोसळल्यावर जमीन हादरणारच.’ इंदिराजी म्हणजे मोठा वृक्ष हे मान्य. त्यांची हत्या हे राष्ट्रीय संकटच होते, पण त्यासाठी एका समाजाला गुन्हेगार ठरवणे योग्य नव्हते. महात्मा गांधींच्या हत्येनंतर महाराष्ट्रात ब्राह्मणांवर हल्ले झाले, त्यांच्या घरादारांची राखरांगोळी झाली. का? तर नथुराम गोडसे ब्राह्मण होता. इंदिरा गांधींची हत्या ‘खलिस्तानी’ विचारातून झाली. खलिस्तान्यांचा बीमोड करण्यासाठी इंदिरा गांधी यांनी सुवर्ण मंदिरात रणगाडे घुसवले होते. त्याचा बदला खलिस्तानवाद्यांनी त्यांची हत्या करून घेतला. सुवर्ण मंदिरात लष्कराचे ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ झाले त्यावेळी लष्करप्रमुख असलेल्या जनरल अरुणकुमार वैद्य यांनाही नंतर हौतात्म्य पत्करावे लागले. शीख दंगलीचे गुन्हेगार नंतर राजकारणात उजळ माथ्याने फिरत राहिले व हा कलंक काँग्रेसला आजन्म छळत राहिला. सज्जन कुमार यांच्या मानगुटीवरदेखील

शीख दंगलीचे भूत

कायम राहिले. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीवरही काही वेळा संक्रांत आली. खुद्द काँग्रेस पक्षाने आणि माजी पंतप्रधान सरदार मनमोहन सिंग यांनी शीख समाजाची माफी मागितली, पण ज्यांनी आपली रक्ताची नाती गमावली ते न्यायासाठी कायदेशीर लढाई लढत राहिले. जगदीश कौर या त्यांपैकीच एक. त्यांनी त्यांचा कायदेशीर लढा जिवंत ठेवला. आज त्या 77 वर्षांच्या आहेत. शीख दंगलीत त्यांचे पती, मुलगा व तीन चुलत भावांचा मृत्यू झाला. जगदीश कौर यांना साक्ष बदलण्यासाठी आठ कोटींची ऑफर देण्यात आली होती. ठार मारण्याचीही धमकी दिली गेली, पण त्यांनी अखेरपर्यंत माघार घेतली नाही. शीख दंगलीतील पीडितांसाठी त्यांनी लढा सुरूच ठेवला. त्यांनी निकालानंतर जे सांगितले ते अस्वस्थ करणारे आहे. ‘‘माझी चूक काय होती? मी शीख समाजात जन्माला आले हीच माझी चूक होती का? माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते तर माझा भाऊ सैन्यात होता.’’ त्यांचे निवेदन महत्त्वाचे आहे. शीख समाजाने या दंगलीसाठी काँगेसला माफ केलेले नाही, पण आज पंजाबात काँग्रेसचे पूर्ण बहुमताचे राज्य आहे हेसुद्धा लक्षात घेतले पाहिजे. तरीही सज्जनकुमार आणि इतरांना दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावलेली जन्मठेप ही 1984 च्या दंगलीने शीख समाजाला दिलेल्या भळभळणाऱया जखमेवर फुंकर घालणारीच म्हणावी लागेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितीश कुमार पंतप्रधान पदाचे दावेदार ?, प्रशांत किशोर-सेनेची नवी रणनीती

News Desk

रजनी पाटील यांचे निलंबन मागे घेण्याच्या मागणीवरून विरोधकांचा राज्यसभेत गोंधळ

Aprna

गोपीचंद पडळकरांनी महाराष्ट्र निवडणूक आयोगाला लिहिले पत्र

Aprna