HW News Marathi
राजकारण

महिलांनी एकीचा इतिहास घडवावा, राम कदमांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे कडाडले

मुंबई | दहीहंडीच्या दिवशी भाजप आमदाराने नवेमहाभारतलिहिले व त्यावर भाजपचा एकही तोंडाळ पुढारी बोलायला तयार नाही. एरव्ही विरोधकांनी जनतेच्या व देशाच्या प्रश्नांवर आवाज उठवला तरी त्यांना देशद्रोही ठरविण्यासाठी जिभेचे पट्टे चालविणारे स्त्रियांना पळवून नेणाऱ्या आपल्या आमदाराच्या बेताल बडबडीवर तोंड शिवून बसले आहेत. महाराष्ट्र धर्म बुडाला आहे तो पापी औरंग्यामुळे नव्हे, तर भाजपच्या विकृतीमुळे. त्याविरोधात राज्यातील महिला रस्त्यांवर उतरल्या आहेत. अर्थात त्याचे राजकारण करू नका, तर ही विकृतीच मुळापासून उखडून फेका. लिंगपिसाटांचे राजकारण संपवायला हवे. महिलांनी एकीचा इतिहास घडवावा. त्यांनी एकत्र यावे व सगळय़ात मोठा दणका द्यावा. असा सल्ला सामनाच्या संपादकीय मधून उद्धव ठाकरे यांनी समस्त महिला वर्गाला दिला आहे.

सामनाचे आजचे संपादकीय

काळ मोठा कठीण आला आहे. राणी पद्मिनीने स्वतःचे चारित्र्य, प्रतिष्ठा व धर्मरक्षणासाठी हजारो रजपूत स्त्रीयांसह जोहार केला. अल्लाउद्दीन खिलजी व त्याच्या मोगली अत्याचाराविरुद्धचा हा जोहार आजही हिंदुस्थानातील नारीशक्तीस प्रेरणा देत आहे, पण आजच्या युगातही भाजपच्या ‘खिलजी’विरोधात जोहार पत्करण्याची वेळ महाराष्ट्रातील तमाम मायभगिनींवर आली आहे काय? भाजपचे एक आमदार व मुख्यमंत्र्यांचे प्रिय ‘हराम’ कदम यांनी स्त्रीयांच्या बाबतीत अर्वाच्य, मानहानीकारक शब्द उच्चारून मस्तवालपणाचे प्रदर्शन केले आहे. दहीहंडी कार्यक्रमात त्यांनी अत्यंत रुबाबात माईकवरून जाहीर केले की, ‘‘कोणती मुलगी आवडली असेल तर फक्त मला येऊन सांगा. त्या मुलीस उचलून तुमच्या हवाली करतो.’’ ही कसली भोगशाही आमच्या महाराष्ट्रात अवतरली आहे? आई-भगिनी, शेतकरी, सीमेवरील जवानांच्या पत्नींबाबत घाणेरडय़ा शब्दांत उद्धार करणारी जमात भारतीय जनता पक्षात रुजली आहे. रावसाहेब दानवे शेतकऱ्यांना मस्तवाल व साले लबाड म्हणाले. पंढरपूरचे भाजप आमदार प्रशांत परिचारकांनी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या बायकांबाबत घाणेरडे व हलकट विधान केले. त्या सगळय़ांवर आमदार कदम यांनी हरामखोरीचा कळस चढवला आहे. दुसऱ्यांच्या बायका, लेकी, सुना पळवून आणू असे सांगणारा आमदार ज्या पक्षात आजही आहे त्यांना शिवरायांचे नाव घेऊन राज्य करण्याचा अधिकार नाही. सरकार शिवरायांचे उंच स्मारक समुद्रात बांधत आहे. मात्र भाजप आमदाराच्या कालच्या विकृतीने शिवरायांचाच अपमान झाला. कल्याणच्या सुभेदाराची सून सन्मानाने खणा-नारळाची ओटी भरून परत पाठवणारे शिवाजी महाराज कोठे व राज्याच्या विधानसभेत घुसलेले

हे हरामखोर

कोठे? या गुन्हेगारांना कठोर शासन व्हावे अशी संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे. महाराष्ट्राच्या तरुण पिढीस कोणता विकृत संदेश भाजप देत आहे? हेच त्यांचे हिंदुत्व आणि हीच त्यांची संस्कृती आहे काय? निवडणुका जिंकण्याच्या लोभापायी कचरा अंगास फासला की दुसरे काय व्हायचे? गेल्या पाच वर्षांत जे पेरले तेच उगवले आहे. महाराष्ट्रातील स्त्रीशक्तीचा संताप अनावर झाला आहे. हिंदुस्थानात धर्मरक्षणाचे काम स्त्रीयांनी अधिक केले आहे. जगातला सदाचारही स्त्रीयांनीच जिवंत राखला आहे. कौसल्येच्या कुशीत भगवान रामचंद्र जन्माला आले व देवकीच्या कुशीत भगवान श्रीकृष्ण जन्मले, पण भगवान श्रीकृष्णाच्या जन्मदिवशीच स्त्रियांचे वस्त्रहरण करण्याची भाषा भाजपच्या आमदाराने केली. भगवान कृष्ण हा स्त्रीयांचा रक्षक होता. जेव्हा द्रौपदीवर राजसभेत वस्त्रहरणाचा दुर्धर प्रसंग ओढवला तेव्हा तिने श्रीकृष्णाचे स्मरण केले. श्रीकृष्णाचे स्मरण करून द्रौपदीने प्रार्थना केली की, ‘आज माझे पती हरले असताना आणि भीष्म-द्रोणादी वृद्ध तसेच इतर बंधू हे नुसते हताश होऊन पाहत राहिले असताना आता तुझ्यावाचून माझे रक्षण दुसरे कोण करील?’ या श्लोकात कृष्णाला उद्देशून जे संबोधन घातले आहे ते ‘गोपीजन प्रिय कृष्ण’ असे आहे. ‘गोपीजन प्रिय कृष्णा, ज्या तुझ्यावर गोपींची प्रीती होती आणि तुझीही गोपींवर होती, असा तू आज माझ्या रक्षणासाठी धावून ये!’ अशी प्रार्थना द्रौपदीने केली. या एका कथेवर सारे महाभारत उभे आहे. श्रीकृष्ण स्त्रीयांचा बंधू होता. त्याच नात्याने तो रक्षण करीत होता, पण श्रीकृष्ण जन्मदिनीच भाजप आमदाराने नवे ‘महाभारत’ लिहिले व त्यावर भाजपचा एकही तोंडाळ पुढारी बोलायला तयार नाही. एरव्ही विरोधकांनी जनतेच्या व देशाच्या प्रश्नांवर आवाज उठवला तरी त्यांना

देशद्रोही ठरविण्यासाठी

जिभेचे पट्टे चालविणारे स्त्रीयांना पळवून नेणाऱ्या आपल्या आमदाराच्या बेताल बडबडीवर तोंड शिवून बसले आहेत. पंतप्रधान मोदी हे तिहेरी तलाक प्रकरणात मुसलमान स्त्रीयांना न्याय द्यायला निघाले आहेत व इथे महाराष्ट्रात स्त्रीाrवर्गात भाजपच्या आमदारांमुळे घबराट पसरली आहे. मंत्रिमंडळातील एकमेव महिला मंत्री पंकजा मुंडे यांनी तरी यावर बोलावे. स्त्रीयांच्या हक्कांसाठी टी.व्ही.च्या पडद्यावर ताडताड बोलणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी तरी कोठे आहेत? राम कदमांनी जे केले ते काँग्रेसच्या आमदाराने केले असते तर एव्हाना या मंडळींनी काय गोंधळ घातला असता. राहुल गांधींना फासावर लटकवायलाच ते निघाले असते. पण ज्या महाराष्ट्राने जिजाऊ, सावित्रीबाई, अहिल्याबाई जन्मास घातल्या त्याच महाराष्ट्रात ‘नारी’ म्हणजे भोग व कचरा. कुठूनही उचला व कुठेही फेका, असे बोलले गेले. पुन्हा यावर सत्ताधारी पक्ष मूग गिळून गप्प बसला आहे. हे मौनही संतापजनक आहे. स्त्रीाr ही कुणाची माता, कुणाची भगिनी, कुणाची पत्नी आहे. कुणीही तिच्याकडे वाकडय़ा नजरेने पाहावे व राम कदमांसारख्यांनी स्त्रीयांना पळवण्याची भाषा करावी! हा सगळाच प्रकार घृणास्पद आणि लज्जास्पद आहे. या ‘हराम’ कदम यांनी आता ट्विटरवरून माफीनामा जाहीर केला आहे. अर्थात तोदेखील तीन दिवसांनी. माफी मागायला या महाशयांनी इतका वेळ घेतला यावरूनदेखील ही विकृती किती भयंकर आहे याची कल्पना येते. महाराष्ट्र धर्म बुडाला आहे तो पापी औरंग्यामुळे नव्हे, तर भाजपच्या विकृतीमुळे. त्याविरोधात राज्यातील महिला रस्त्यांवर उतरल्या आहेत. अर्थात त्याचे राजकारण करू नका, तर ही विकृतीच मुळापासून उखडून फेका. लिंगपिसाटांचे राजकारण संपवायला हवे. महिलांनी एकीचा इतिहास घडवावा. त्यांनी एकत्र यावे व सगळय़ात मोठा दणका द्यावा.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू; आज आणि उद्या शिंदे गटाचा युक्तीवाद

Aprna

“आदित्य ठाकरेंचे शिवसेनेसाठी योगदान काय?,” रामदास कदमांचा सवाल

Aprna

मुख्यमंत्र्यांना लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्याचा राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

News Desk